Jayant Patil  Sarkarnama
पुणे

Jayant Patil : जयंत पाटलांची ‘त्या’ विधानावर पुन्हा सारवासारव; म्हणाले, ‘आता माझी बोलायचीही चोरी झालीय, मला कुठंतरी ढकलायचंच ठरवलेलं दिसतंय’

Jayant Patil Controversial Statement : माजी खासदार राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून उभं राहायला सांगत होतो. पण त्यांनी माझं ऐकलं नाही.

Vijaykumar Dudhale

Baramati, 14 March : ‘माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही’ असे विधान करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 14 मार्च) बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना माध्यमांवरच खापर फोडले आणि काही केलं तरी मला कुठेतरी ढकलायचं, असे ठरवलेलं दिसतंय, असा आरोप त्यांनी केला.

जयंत पाटील (Jayant Patil) आज बारामती दौऱ्यावर आले होते. कृषी विज्ञान केंद्राने शेतीत एआय तंत्राचा केलेला वापर याची पाहणी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत केली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी ‘माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही’ याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे.

ते म्हणाले, मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बाहेर बोलायचीही चोरी झाली आहे. माझ्या भाषणाचा संदर्भ तुम्ही बघा. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मी बोलत होतो. तुम्ही शेवटपर्यंत लढणार आहात का? राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हे आंदोलन हातात घेतलं आहे, त्यामुळे काही काळजीचं कारण नाही, असे मी सांगत होतो.

माजी खासदार राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीकडून उभं राहायला सांगत होतो. पण त्यांनी माझं ऐकलं नाही, त्यामुळे ‘माझी ग्यारंटी घेऊ नका; माझं काही खरं नाही.’ तुम्ही तुमचं आंदोलन कायम सुरू ठेवा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातील माझी भावना होती, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले, त्या वाक्यावरून मी नाराज आहे, इथपासून पक्ष बदलण्यापर्यंत माझी गाडी गेली. त्याचं स्पष्टीकरण मी खरं तर त्याचवेळी तासाभरानंतर विधान भवनात आल्यानंतर तातडीनं दिलं होतं. तेच स्पष्टीकरण आज येथे बारामतीतही देत आहे. त्यामुळे सर्व प्रसार माध्यमांनी ठरवलेलं दिसतं की, काही केलं तरी मला ढकलायचं कुठेतरी.

जयंत पाटील हे सर्वांना हवे हवेसे वाटतात, या सुप्रिया सुळे यांच्या विधानावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, माझे सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत, त्या भावनेतून त्या बोलल्या आहेत. राजकारणात सर्वांशी चांगले संबंध ठेवणे, वैयक्तिक वैर न घेणे, हे मी शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे, त्यामुळे त्या म्हणतात ते योग्यच आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT