Pune News : "काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या बिहारमध्ये मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत फिरत आहेत. पण त्यांनी आधी काँग्रेस पक्षाची अंतर्गत यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष द्यावे. पक्षाची बूथ स्तरावरील यंत्रणा पूर्णपणे कमकुवत झाली आहे. पक्षाची अवस्था ढासळल्यानंतर इतरांवर दोषारोप करणे चुकीचे आहे," अशी खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत गोरे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "काँग्रेसने आपली संघटना बळकट करावी, बूथ समित्या आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क सुधारावे. केवळ व्यवस्थेला दोष देणे योग्य नाही. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही मतदार यादी तपासणीला कोणताही अडथळा नाही. काँग्रेसची बूथ स्तरावरील यंत्रणा जवळपास निष्क्रिय आहे, तर दुसरीकडे भाजपची बूथ स्तरावरील यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. त्यामुळे नवमतदार नोंदणीत भाजपने निवडणूक आयोगापेक्षा अधिक चांगलं काम केलं"
गोरे पुढे म्हणाले, "मतचोरीचा मुद्दा पुढे करून देशात अशांतता आणि अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपने १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची बूथ स्तरावर नोंदणी केली आहे. काँग्रेसकडे अशी यंत्रणा आता अस्तित्वात नाही. भाजपची यंत्रणा सतत सक्रिय असते, त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतो" तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गोरे म्हणाले, "गोरक्षण व्हायला हवे, पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे."
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत विचारलं असता गोरे म्हणाले, "जरांगे हे आंदोलन का करत आहेत, याची मला माहिती नाही. पण हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून चालवले जात आहे, असे दिसते. मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी फडणवीस यांनी १० टक्के आरक्षण दिले आहे. आंदोलनामुळे निर्माण होणारी परिस्थिती योग्य नाही, असे मला वाटते."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.