jayant patil sharad pawar narendra modi sarkarnama
पुणे

Jayant Patil News : "मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून...", पाटलांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर

Akshay Sabale

Pune News : महाराष्ट्र राज्य एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या खेळाला एका नेत्यानं 45 वर्षांपूर्वी सुरुवात केली.

ज्या लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, अशी माणसं दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीत, असा हल्लाबोल मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केला होता. ही टीका राष्ट्रवादीतील नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जशास तसं प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी यांना दिलं आहे.

"नरेंद्र मोदी यांना मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवार यांच्याकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे," असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सभेचे आयोजन केले होते. या वेळी जयंत पाटील बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रात आल्यानंतर केवळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करणं, याशिवाय पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयीपर्यंत अनेकांची भाषणं ऐकली. पण, विरोधकांवर नाहक टीका करण्याचं काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेलं नाही. आपलं काम न सांगता टीका करणं नरेंद्र मोदी यांना शोभत नाही, असं मला वाटतं."

"प्रत्येक निवडणुकीपूर्वी आणि नंतर वेगवेगळे अनुभव आपण घेतले आहेत. पण, यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी साम-दाम-दंड भेद वापरून सत्तेवर यायचे ठरवलं आहे. त्यांचा भारतभर फिरणारा अश्वमेधाचा वारू हा महाराष्ट्राता शरद पवार यांनी अडवला आहे. त्यामुळे रात्रंदिवस पंतप्रधान मोदी शरद पवार यांच्यावर टीका करतात," असं पाटील यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

"महाराष्ट्र राज्य एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे, अशी टीका पंतप्रधानांनी पुण्यातील जाहीर सभेत केली. या खेळाला एका नेत्याने ४५ वर्षांपूर्वी सुरुवात केली. ज्या लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, अशी माणसे दुसऱ्याची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीत.

असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बिघडवितात. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला. काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. विरोधकांबरोबरच देश, राज्य, पक्ष आणि कुटुंबही या आत्म्याने अस्थिर केले.

भाजपचे सरकार पाडण्याचा प्रयत्नही या आत्म्याने केला. या परिस्थितीत देशाला स्थिर सरकार हवे आहे. या अतृप्त, भटकत्या आत्म्यांपासून देशाला वाचविण्याची आवश्यकता आहे. भाजप-रालोआ सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल," असं मोदी यांनी पुण्यातील सभेत सांगितलं होतं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT