Supriya Sule, Sunetra Pawar, Sunil Tatkare sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : बारामतीची निवडणूक पवार v/s सुळे; तटकरेंनी मांडलं विजयाचं गणित...

Sudesh Mitkar

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले असून आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाची सरशी होणार याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणताय सुप्रिया सुळे यांचे पारडे जड आहे. तर कोणाच्या मते सुनेत्रा पवार ही बाजी मारणार. राजकीय पक्षांकडून देखील तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. विजयाचा आकडा मात्र, सांगायला कोणीच तयार नाही. कारण बारामतीत त्यांनी यंदाची निवडणूक फारच अटीतटीची झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीच्या विजयाबाबत आपलं मत मांडलं आहे.

तिसऱ्या टप्प्यातील रायगड लोकसभा मतदारसंघाचे मतदान उरकल्यानंतर सुनील तटकरे आता पश्चिम महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झाले आहेत. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. तटकरे म्हणाले, तिसऱ्या‌ टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात महायुतीला मोठा पाठींबा मिळाला आहे. राज्यस्तरावरील नेत्यांनी बुथ स्तरावर समन्वयाने काम केले. सुरूवातील समज गैरसमज होते, मात्र नंतर महायुतीने एकदिलाने काम केले. रायगडचे मतदान उरकल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मी पुणे, मावळ, शिरूर, नगरमध्ये फिरणार आहे, असं तटकरे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा निवडणुकीबाबत तटकरे म्हणाले, " बारामती लोकसभा निवडणुकीवेळी माझी ही निवडणूक होती. त्यामुळे मी इकडे आलो नाही. दादा स्वतः सक्षम आहेत, त्यांनीच यापूर्वीच्या निवडणुका जिंकून दिल्या आहेत. या मतदारसंघाचा दादांचा चांगला अभ्यास आहे. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लक्ष घातले होते. निवडणुकीनंतर आढावा घेतला.

या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून संविधानाबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या.राहूल गांधी यांच्या सारख्या अपरीपक्व नेते देखील संविधानाबाबत बोलले. तसेच राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले गेले. मात्र, याचा निवडणुकीवरती कोणताही परिणाम झाला नसून पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महायुतीच आघाडीवरती राहिली आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

सुनील तटकरे पुढे म्हणाले, भाजप सोबत जाण्याचा निर्णय आमच्यासाठी नवीन नव्हता कारण भाजपसोबत जाण्याची चर्चा २०१४ पासून सुरू होती. भाजपने पाठींबा न मागताच २०१४ मध्ये राष्ट्रवादीने पाठींबा दिला. २०१६ मध्ये देखील भाजपसोबत जायचे होते. मात्र, या युतीमध्ये शिवसेना सोबत असेल असे अमित शहांनी Amit Shah सांगितले.मात्र शिवसेनासोबत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार नाही असा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला.

रोहित पवार यांच्यावर निशाणा

२०१९ लाही बोलणी झाली होती. नंतर शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेण्यात आला.एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही भाजपसोबत जाण्याची‌ चर्चा झाली होती. असे असताना देखील जाणीवपूर्वक आता निवडणुकीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप सोबत जायला हवं असं राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रत्येक आमदारांनी सह्या करून पत्र दिले होते. मात्र आता त्यातीलच काही पत्रकार परिषद घेऊन संभ्रम निर्माण करत आहेत, असं म्हणत सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.

या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असून त्या ठिकाणी पवारच निवडणूक जिंकली असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला यावरती कोणते पवार ?असा प्रती सवाल पत्रकारांनी केला असता तटकरे म्हणाले, निवडणूक 'पवार विरुद्ध पवार' नसून 'पवार विरुद्ध सुळे' अशीच आहे त्यामुळे पवारच विजयी होतील असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT