Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : " आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या..." ; बारामतीतील अजितदादांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

Deepak Kulkarni

Someshwarnagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जाहीर सभा होती. या सभेप्रसंगी मराठा आरक्षण समर्थक तरुणांनी अजितदादांना निवेदन देण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. सभामंडपातून बाहेर जाताना या आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना सभामंडपाबाहेर काढत त्यांची समजूत घातली आणि आंदोलक परतले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मंगळवारी हस्ते झाला. पवार यांची कारखान्याने व परिसरातील तरुणांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्याबद्दल सोमेश्वर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. या प्रसंगी आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, विश्वास देवकाते, संभाजी होळकर, सतीश काकडे, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे उपस्थित होते. सभा सुरू होण्यापूर्वीच सगळे लोक पवार यांना अनेक निवेदने देत होते. लोकांकडून निवेदन घेऊन पोलिस पवार यांच्यापर्यंत पोचवत होते. पवार हे प्रत्येक निवेदन वाचतही होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) आंदोलक तरुणांनी स्वतःच पवार यांना निवेदन द्यायचे आहे, अशी मागणी केली.

सभागृहात आंदोलक तरुण आणि पोलिसांशी वाद - प्रतिवाद झाला.अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे हे आंदोलकांची समजूत घालत होते. मात्र, तरुणांनी आम्ही दोघेच निवेदन देतो अशी मागणी केली.

मात्र, पोलिसांनी निवेदन आम्ही पोचवतो ही भूमिका कायम ठेवली. यानंतर आंदोलक तरुणांना पोलिसांनी बाजूला घेतले. यानंतर मात्र परतत असताना तरुणांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा दिल्या. गेटबाहेर आल्यावर पुन्हा आंदोलक पोलिस यांच्यात आम्हाला निवेदन द्यायचे आहे, हीच हुज्जत झाली आणि आंदोलक परतले.

अजित पवार काय म्हणाले...?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलनावर महत्त्वाचे भाष्य केले. ते म्हणाले, आता मुलं घोषणा देऊन गेली. उद्यापासून मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी काही भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर समाज एसटीमधून आरक्षण मागतोय. आदिवासी म्हणतात आमचं सोडून द्या. मराठा समाजातील काहीजण सरसकट कुणबी द्या म्हणतात. ओबीसी म्हणतात आमचं सोडून द्या, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, आम्ही राज्य सरकार म्हणून काही चुकीचं करत नाही. मुळात एससी अथवा एसटी आरक्षण देणे हा अधिकार राज्याचा नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने का नाकारलं, यावर विधिज्ञ लोकांची समिती काम करते आहे. घाईगडबडीने याबाबत निर्णय घेतला आणि पुन्हा नाकारलं तर पुन्हा दिशाभूल केली असं म्हटलं जाईल.आरक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहेच. ते कुणाच्या बापाचं नाहीच. मात्र, कायद्याच्या नियमात बसवून द्यावं लागेल, असेही अजित पवारांनी सांगितले.

" मराठे समाजाचे एवढे आमदार, पण..."

सोमेश्वरनगर येथील संतोष शेंडकर म्हणाले, मराठे समाजाचे एवढे आमदार, पण आरक्षण देत नाहीत असे म्हणत काहीजण शिव्यांची लाखोली वाहत आहेत. पण आम्ही मुद्दाम का करू? लोकशाहीत एक बाजू ऐकून घेऊन चालत नाही. जातीय सलोखा सांभाळावा लागतो. सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथिगृहात झाली होती.

त्यावेळी बहुसंख्य लोकांचे म्हणणे आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता उरलेल्या 38% मध्ये द्या. नाहीतर उद्या पुन्हा कोणी कोर्टात जातील. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिलंच होतं. आता या विषयावर कोणी बोलत नाही. मात्र, वास्तवाचा विचार केला पाहिजे. वाटल्यास आरक्षणाचे जाणकार आणि विधितज्ज्ञ यांचीही चर्चा घडवून आणू, असेही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT