Pimpri Chinchwad News Pcmc
Pimpri Chinchwad News Pcmc Sarkarnama
पुणे

PCMC News : होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑ़़डिटची सूचना अंमलात आणली असती, तर पाच निष्पाप जीव गेले नसते..

सरकारनामा ब्यूरो

PCMC News : वादळी अवकाळी पावसामुळे परवा (ता. १७) सायंकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत होर्डिंग अंगावर पडून पाच निष्पाप जीवांचा बळी गेला. तर, तिघे गंभीर जखमी झाले.पिंपरी-चिंचवड महापालिकेला सांगूनही त्यांनी जाहिरात धोरण पाच वर्षानंतरही तयार न केल्याने हा अपघात झाल्याचे आता समोर आले आहे.

दरम्यान, वरील दुर्घटनेनंतर आता हे जाहीरात धोरण तयार करण्याच्या हालचाली पिंपरी पालिका प्रशासनाने सुरु केल्या आहेत. हे त्यांना सुचलेले उशिराचे शहाणपण म्हणावे लागेल.२०१५ च्या लेखापरिक्षणानंतर राज्य लेखा समितीने पिंपरी पालिकेला दरवर्षी होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि ऑडिट करण्यासाठी २०१७ ला पत्र दिले होते. मात्र, त्याची दखलच न घेतली गेली नाही.

त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्ज शहरात उभी राहिली. त्यातून परवाची दुर्घटना घडली. त्यामुळे ही दुर्घटना व त्यात बळी गेलेले पाच निष्पाप जीव यांच्या मृत्यूला पालिकेचा आकाशचिन्ह परवाना विभाग जबाबदार असल्याचा `आऱटीआय` कार्यकर्ते विजय पाटील यांनी दावा केला आहे. त्यामुळे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात या विभागालाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी `सरकारनामा`शी बोलताना केली.

पाटील यांच्याप्रमाणेच या जीवघेण्या होर्डिग दुर्घटनेला पिंपरी पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेनेही केला आहे. पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातील संबंधित अधिका-यांना सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव यांनीही केली आहे.

या विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त निलेश देशमुख, कार्यालयीन अधिक्षक तुकाराम जाधव, परवाना निरीक्षक सुभाष मळेकर यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे ही होर्डिंग दुर्घटना घडली तेव्हा आकाशचिन्ह परवाना विभागाचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी हे रजेवर होते. ते या दुर्घटनेनंतरही हजर झालेले नाहीत. त्यांनी आपला कार्यालयीन मोबाईल फोनही बंद ठेवलेला आहे. त्यांच्याकडे नुकतीच या विभागाची जबाबदारी आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी सोपविली होती.

आयुक्तांनी आल्यापासून गेल्या आठ महिन्यात अनेकदा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांत वरचेवर फेरबदल केले आहेत. त्यामुळे विभागप्रमुख म्हणून एखाद्या खात्यावर मांड ठोकण्यापूर्वीच सबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी काढून घेतली जात आहे.

नुकतेच (ता.१३)त्यांनी तब्बल १८ उपायुक्त, सहाय्यक आय़ुक्त आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप केले होते. त्यातून नाराज झालेले अनेकजण हे रजेवर गेले आहेत. त्यात जोशी यांचाही समावेश आहे.त्यामुळे काल आय़ुक्तांनी कामकाज फेरवाटपाचा पुन्हा नवा एक आदेश काढला. त्यानुसार जोशी यांचा पदभार तथा जबाबदारी तात्पुरती करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT