Vijay Shivtare
Vijay Shivtare Sarkarnama
पुणे

Ajitdada Vs Shivtare : शिवतारेंची बदला घेण्याची भाषा; ‘अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय’

Vijaykumar Dudhale

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवडच्या याच पालखीतळावरून ‘विजय शिवतारे, तू निवडून कसा येतो, तेच मी पाहतो,’ असे म्हटले होते. तो शिवतारेंचा अपमान नव्हता, तर पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान होता. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत शिवसेना नेते तथा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजितदादांच्या विरोधात रणशिंग फुंकले. याच भाषणात अजित पवारांनी पालखीतळावर येऊन माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पालखीतळावर महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी पवारांविरोधात लढण्याची भाषा केली. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवतारे यांना तू निवडून कसा येतो, तेच मी पाहतो, असे आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत शिवतारेंचा पराभव झाला होता. शिवतारेंचा तो राग अजूनही गेलेला दिसत नाही. त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याचे दिसून येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, जनतेच्या प्रश्नावर मी मोठमोठ्यांशी पंगा घेतला आहे. आज मी तुम्हाला एकच संदेश देऊन जातो. लोकसभेची निवडणूक समोर येऊन ठेपली आहे. बारामतीत सुप्रियाताई अन्‌ सुनेत्राताई यांच्यात लढत चालली आहे. बारामती हा देशातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. तो काही कोणाचा सातबारा नाही. सतत बारामतीचा ५० वर्षे खासदार का पाहिजे? तो पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे. आम्ही त्यांना पाच-पाच, दहा-दहा वेळा का मतदान करायचं. काय मिळालं आहे आम्हाला? आता आपल्याला विचार करावा लागणार आहे.

अजित पवार यांनी याच सासवडच्या पालखीतळावर विजय शिवतारे यांचा अपमान केला नाही, तर त्यांनी पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा अपमान केला आहे. ‘तू कसा निवडून येतो, ते पाहतो,’ असे अजित पवार म्हणाले होते. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. येत्या दोन ते चार दिवसांत मी त्याबाबत सांगेन. पवारांचं सहा लाख ८६ हजार मतदान आहे आणि पाच लाख ८० हजार मतदार पवार विरोधकांचं आहे. ते तुमचं आमचं सर्वांचं आहे. पाच लाख ८० हजारांमध्ये दोन लाख मतदान एकट्या विजय शिवतारेंचे आहे, असा दावाही शिवतारे यांनी केला.

ते म्हणाले, ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतला आहे. आपल्याला आता कोणाची गुलामी नको आहे. किती वर्षे आम्ही तुम्हाला परत परत मतदान करायचं. ते आता होणार नाही. याच पालखीतळावरून अजित पवार यांनी अपमान केला आहे, त्याचा बदला घेतला पाहिजे. याच पालखीतळावर येऊन अजित पवार यांनी पुरंदरच्या जनतेच्या माफी मागावी लागेल. विमानतळाचं काय करणार?, गुंजवणीच्या पाण्यासाठी हजार कोटी रुपये कधी देणार ते सांगा. मार्केट कधी होणार ते सांगा, त्याबाबतचा शब्द पुरंदरच्या जनतेला या पालखीतळावर येऊन द्या.

ही लढाई माझ्यासाठी नव्हे; तर लोकांसाठी आहे. पुढचं रणांगण मोकळं आहे. दोन पवार व्हर्सेस विजय शिवतारे. भोर, इंदापूर, पुरंदर सगळे. याला पाड, त्याला पाड, आता सगळ्यांनी मिळून एकदा यांना (पवारांना) पाडा. होऊद्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या. या पुरंदरने मोठमोठे इतिहास घडविले आहेत. तसाच इतिहास पुन्हा एकदा घडू द्या, असे आवाहनही शिवतारे यांनी केले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT