Chandrakant Patil
Chandrakant Patil  Sarkarnama
पुणे

Pune Politics : कोथरूडमधूनच का लढलो; चंद्रकांतदादांनी अखेर सांगितले खरे कारण!

सरकारनामा ब्यूरो

Pune BJP News : विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने अनेक चर्चा नेहमीच होत राहतात. त्यातही पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चंद्रकांतदादांच्या उमेदवारीबाबत कायमच चर्चा सुरू असते. या पार्श्वभूमीवर स्वत: चंद्रकांत पाटील यांनीच मंगळवारी खुलासा केला. कोल्हापूर जिल्ह्यातील चार मतदारसंघातून निवडून येण्याची खात्री होती.

तसे सर्व्हेपण आले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मला पुण्यातून कोथरूडमधूनच लढण्याचा आदेश दिला. त्यामुळे मी कोथरूडमधून लढलो. त्यात माझा वैयक्तिक आग्रह काहीच नव्हता. उलट मी कोल्हापूर जिल्ह्यातून लढण्यास अधिक उत्सुक होतो, असे पाटील यांनी सांगितले.

पुण्यातून लढण्यामागे त्यावेळची काही राजकीय समीकरणे होती. त्याची जाहीर चर्चा करता येत नाही. मात्र, पक्षातील वरिष्ठांनी काही राजकीय समीकरणे आखली होती. त्यानुसार मला कोथरूडमधून निवडणूक लढावी लागली, असे पाटील यांनी सांगितले. एका खासगी वाहिनीशी बोलताना त्यांनी कसब्याच्या पराभवापासून आगामी निवडणुकांच्या संदर्भाने भूमिका स्पष्ट केली.

चंदगडसह चार विधानसभा मतदारसंघातून माझी तयारी होती. निवडून येण्यासारखे पोषक वातावरण होते. चंदगडच्या लोकांनी तर आग्रह केला होता. मात्र, त्यावेळीदेखील कुठून लढयाचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे मी सांगितले होते, असे पाटील यांनी सांगितले.

कोथरूडमधून मी लढावे, हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा होता. यापुढच्या काळातदेखील मी कुठून लढायचे हे श्रेष्ठीच ठरवतील, असेही पाटील यांनी सांगितले. कसब्यातील निवडणुकीच्या पराभवाची कारणे पाटील यांनी सांगितली. मात्र, या पोटनिवडणुकीत पराभूत झालो तरी यापुढच्या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार नक्की निवडून येईल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

कसब्यात तिसरा उमेदवार उभा करता आला नाही हे आमच्या पराभवाचे खरे कारण असल्याचे सांगत तांत्रिकदृष्ट्या निवडून येण्यासाठी आणखी सहा हजार मतांची आवश्‍यकता होती. आम्ही तिसरा उमेदवार उभा करण्यात यशस्वी झालो असतो तर त्या उमेदवाराने सहा-सात हजार मते घेतली असती. परिणामी आमचा उमेदवार निवडून आला असता. मात्र, आम्ही तिसरा उमेदवार उभा करू शकलो नाही.

ब्राम्हणविरोधी असल्याची प्रतिमा तयार करण्यात येत आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. माझी पत्नी कोकणस्थ ब्राम्हण आहे. त्यामुळे ब्राम्हणविरोधी असल्याचे वातावरण केवळ राजकीय दृष्टीकोनातून केले जात आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही.

पुण्यातील राजकारणात सर्व समाजाला स्थान देण्याचा प्रयत्न नेहमीच भाजपाकडून केला जातो. आमच्या पक्षात पक्ष सांगेल. त्याचे पालन सर्वजण करीत असतात. त्यामुळे यापुढच्या काळात निवडणूक कुठून लढायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT