<div class="paragraphs"><p>Education minister Varsha Gaikwad</p></div>

Education minister Varsha Gaikwad

 
Sarkarnama
राज्य

टीईटी पेपरफुटी वर्षा गायकवाडांना आली जाग, घेतला हा निर्णय..

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या टीईटी (TET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर, तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी यामध्ये दोषी आढळेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिला आहे.

गायकवाड म्हणाल्या, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून ही समिती काही दिवसातच चौकशी अहवाल देईल, असे त्यांनी सांगितले.

टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला व त्यानंतर कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पेपर फुटीचे सत्र सुरू आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर मोठी नामुश्की आली आहे. सैनिक भरती पेपरमध्ये गैरव्यवहार झाल्यावर या प्रकरणाचा तपास करतांना यामध्ये सहभागी असलेल्यांचा सहभाग हा राज्यातील आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या पेपरफुटीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर लगेचच राज्यातील गृहनिर्माण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या म्हाडाच्या परिक्षेत सुद्धा गैरव्यवहार होणार असल्याचे लक्षात आल्यावर तोही पेपर ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नेमका त्याच प्रकरणाचा तपास करत असतांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परिक्षेसंदर्भातील कागदपत्रे म्हाडा परिक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखच्या घरात सापडले होते. यानंतर हा सर्व गैरव्यवहार आता बाहेर येत आहे.

आज (ता.17 डिसेंबर) या प्रकरणी टीईटी परीक्षेतील साखळीचा छडा पुणे पोलिसांनी लावला आहे. या परीक्षेत गैरप्रकार केल्यावरून पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यास अटक केली. त्यानंतर रात्री त्याच्या घरी छापा टाकला असता सुमारे 88 लाख रुपयांची रोकड सापडली. ती जप्त करण्यात आली आहे. सुपे याने प्रीतीश देशमुख आणि परिषदेच्या तांत्रिक विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर याच्यासह सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची रक्कम लाटल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या आरोपीनी उमेदवारांकडुन 4 कोटी 20 लाख रूपये जमा करुन ते आपापसांत वाटून घेत विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केल्याचे उघड झाले आहे. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रीतिश देशमुख 1.25 कोटी आणि अभिषेक सावरीकर यास 1.25 कोटी रुपये घेतल्याचे चौकशीत कबूल केले आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी फिर्याद दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT