Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विशेष

Vidhan Parishad Election : पुन्हा फोडाफोडी होणार; विधान परिषद निवडणुकीत महाआघाडी तिसरा उमेदवार देणार?, बड्या नेत्याचे विधान

Vijaykumar Dudhale

Mumbai, 02 July : राज्यात पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार रिंगणात उतरविण्याची भूमिका शेकापचे जयंत पाटील यांनी मांडली आहे, त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ मानली जात आहे. असे होणार असेल पुन्हा एकदा घोडेबाजार रंगणार हे स्पष्ट आहे.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad )11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (ता. ०२ जुलै) शेवटचा दिवस आहे. गरज पडली तरच 12 तारखेला मतदान होणार आहे. कारण, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा होत असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विधान परिषदेत तीन उमेदवार देणार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा वेग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात माजह मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार परिणय फुके, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही दोघांना उमेदवार दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि परभणीचे राजेश विटेकर यांना संधी देण्यात आली आहे.

महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता त्यांचे नऊ उमेदवार निवडून येतील, अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीकडेही 63 आमदारांचे संख्याबळ आहे. त्या संख्या बळाच्या आधारे त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, आता तिसरा उमेदवार रिंगणात उतरवण्याचे संकेत मिळाल्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार रंगणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

याबाबत शेकापचे जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत. यात मी (जयंत पाटील) काँग्रेसकडूना प्रज्ञा सातव आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर अशी तिघांची नावे निश्चित झाली आहेत. मिलिंद नार्वेकर यांनीही सोमवारी (ता. ०1 जुलै) भेट झाल्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळाल्याचे सांगितले होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

आमच्याकडे तीन उमेदवार निवडून एण्याएवढे संख्याबळ असून आम्ही महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.

शिंदेंच्या बंडाची आठवण

मागे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली होती. सर्व आमदारांना घेऊन शिंदे गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लागली तर पुन्हा कोणाची फुटाफूट हेाते, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT