Devendra Fadnavis-Rahul Narwekar-Bhaskar Jadhav Sarkarnama
विशेष

Assembly Winter Session : पहिल्याच मिनिटांत जाधवांनी सरकारला चूक कबूल करायला लावले...फडणवीसांनीही मान्य केले...

Vijaykumar Dudhale

Nagpur News : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहातच येताच प्रश्नोत्तरांचा तास घोषित केला. तोच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उठून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणावरील चर्चा संपल्यानंतर त्यावर उत्तर दिले आहे की नाही, याचा उल्लेख ‘ऑर्डर ऑफर डे’मध्ये नाही, अशी चूक जाधव यांनी लक्षात आणून दिली. ती चूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करताच नार्वेकर यांनी शुद्धीपत्रक काढण्याची घोषणा केली. (Within the first few minutes, Bhasakar Jadhav made government admit its mistake)

विधानसभेच्या कामकाजाला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सरकारची चूक पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, माझा हा म्हटलं तर पॉईंट ऑफ प्राेसिजर, म्हटलं तर पॉईंट ऑफ इन्फर्मेशन आपल्याला जो काही अर्थ लावायचा आहे, तो लावा. पण गेली कित्येक वर्षे आपण कामकाज पाहत असताना एखाद्या १०१ च्या किंवा २९३ च्या प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली आणि सरकारच्या वतीने त्यावर उत्तर देण्यात आलं नाही, तर त्याचा उल्लेख ‘ऑर्डर ऑफ डे’मध्ये उल्लेख असतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेली तीन दिवसांपासून आरक्षणावर विशेषतः मराठा, ओबीसी व इतर समाजाच्या आरक्षणासंदर्भाने चर्चा करण्यात येत आहे. मध्यरात्री ही चर्चा सव्वा एक ते दीडच्या सुमारास संपली. त्या चर्चेवर आज उत्तर येणार असेल किंवा नसेल तरीही तो विषय आज ‘ऑर्डर ऑफ डे’ वर यायला पाहिजे होता. तो विषय ‘ऑर्डर ऑफ डे’वर आलेला नाही, असा मुद्दा भास्कर जाधव यांनी मांडला.

ते म्हणाले की, मला जाणून घ्यायचे आहे की, आपण काही नवीन प्रथा पाडली आहे का? की मराठा आरक्षणाच्या संदर्भात रात्री कधी उत्तर देण्यात आले आहे. मराठा आरक्षणावरील चर्चा संपली आहे, त्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असे आपले धोरण आणि सरकारचा विचार आहे का?, असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी केला.

भास्कर जाधव यांना प्रश्न संपवताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर द्यायला उठले आणि चूक कबूल केली. ते म्हणाले की, आमदार भास्कर जाधव यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे. आपण, मराठा आरक्षणावरील चर्चा संपली की त्यावर मंत्र्यांचे उत्तर असे दर्शवायला पाहिजे होतं. मला वाटतं, तशी सुधारणा करून घेतली पाहिजे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चूक कबूल करून उत्तर देताच विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनीही शुद्धिपत्रक काढण्यात येईल, असा शब्द दिला. त्यानंतर विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT