Ravindra Chavan-Chandrashekhar Bawankule-shrikant Shinde Sarkarnama
विशेष

Shivsena-BJP Dispute : रवींद्र चव्हाणांची समजूत घालू; श्रीकांत शिंदेंनीही वाद सोडावा,कल्याणमधील वादावर भाजपची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

Thane News : मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बगाडे यांच्यावरून ठाणे-कल्याणमध्ये शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. बगाडे यांची बदली होईपर्यंत शिवसेनेचे काम करायचे नाही, असा ठरावच भाजपने केला आहे, तर आपण कल्याणच्या खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे आव्हान खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले. त्यावर आता भाजपची अधिकृत प्रतिक्रिया आली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची समजूत घालणार आहेत. (Chandrashekhar Bawankule will mediate on the BJP-Shiv Sena dispute in Kalyan)

बावनकुळे म्हणाले की, कल्याणमधील शिवसेना (Shivsena)-भाजपमधील (BJP) वाद हा अनेक वर्षांपासून आहे. काही स्थानिक नेत्यांमध्ये हा वाद आहे. मात्र, हा काही राज्याचा वाद नाही. मी रवींद्र चव्हाण यांना भेटणार आहे. त्यांना समजावून सांगणार आहे.

आम्ही शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढविणार आहोत, त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी वाद सोडून द्यावेत. श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून निवडणूक लढणार आणि जिंकणार आहेत. आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू. त्यामुळं आमच्यात काही वाद नाही. रवींद्र चव्हाण यांना जागा ठरविण्याचा अधिकार नाही. हा अधिकार केंद्रीय नेतृत्वाला आहे, त्यामुळं काही ठराव केला असेल तर त्याला अर्थ नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले. कारण राष्ट्रवादी काँग्रेस वाढणार होती आणि शिवसेना कमी होणार होती. त्याचा प्लॅन तयार झाला होता, म्हणून आमच्या हिंदुत्ववादी मतावर निवडून आलो. राष्ट्रवादीचा जयजयकार करावा लागतोय, त्यामुळं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेल्या आमदारांसोबत आम्ही सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचा यात काही संबंध नाही

एकनाथ शिंदे यांना किती जागा द्यायच्या, हे एकनाथ शिंदे हेच ठरवतील. त्यामुळे जागावाटपाचा विषय सामोपचाराने मिटवला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले की, नांदेड आठ क्लस्टरमध्ये आहे, त्यामुळे नांदेडमध्ये सभा होत आहे. त्या सभेला 50 हजारांच्या वर लोकं येतील. त्या सभेत पक्ष प्रवेश आहेत. कर्नाटकसारखे महाराष्ट्रात होईल, हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात आमच्याकडे रोज पक्षप्रवेश होत आहेत.

श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटले होते?

नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे, त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. पण, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना-भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असे खासदार डॉ़. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT