New Delhi, 08 February : तब्बल दहा वर्षे सत्तेत राहिलेल्या आम आदमी पार्टीला विधानसभा निवडणुकीत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मानहानीकार एवढ्यासाठी की आपचे राष्ट्रीय संयोजक तथा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही मोठ्या पराभावाचे तोंड पाहावे लागले आहे. माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पराभवामध्ये काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांचा मोठा वाटा आहे. केजरीवालांचा पराभव घडवून संदीप दीक्षित यांनी आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतल्याचे मानले जात आहे.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाची या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होत आहे. नवी दिल्ली येथे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा भाजपचे प्रवेश वर्मा यांनी पराभव केला. प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा ४ हजार ८९ मतांनी पराभव केला आहे. केजरीवाल यांच्या पराभवात माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आणि काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहूनही केजरीवाल यांच्या पराभवात संदीप दीक्षित यांनी मोठा वाटा उचलला आहे.
भाजपने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत सत्ता मिळविली आहे. तसेच, नवी दिल्ली या मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा 12 वर्षांनंतर पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या परवेश वर्मा यांच्याकडून ४,०८९ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचे संदीप दीक्षित 4,568 मते मिळाली आहेत. म्हणजेच केजरीवाल यांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे, तेवढीच मते संदीप दीक्षित (Sandeep Dixit) यांना मिळाली आहेत. म्हणजे आप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली असती तर केजरीवाल विजयी होऊ शकले असते.
दरम्यान, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आताचा नवी दिल्ली आणि पूर्वीचा गोल मार्केट या मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक जिंकली होती. शीला दीक्षित यांनी 1998 आणि 2003 मध्ये गोल मार्केट मतदारसंघातून, तर पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या नवी दिल्ली या मतदारसंघातून 2008 मध्ये शीला दीक्षित यांनी विजय मिळविला होता.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेची २०१३ ची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत आप नेते केजरीवाल यांनी तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षित यांना पराभूत केले होते. त्या पराभवानंतर शीला दीक्षित यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अंताला सुरूवात झाली होती. तसेच, आपच्या या विजयाने काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली, ती पुन्हा सत्तेत येऊच शकली नाही.
शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनी २०२५ च्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाला हातभार लावला. संदीप दीक्षित यांना जेवढी मते मिळाली आहेत, जवळपास तेवढ्याच मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे संदीप दीक्षित यांनी आईच्या पराभावाचा बदला घेतल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.