Milind Narvekar-Devendra Fadnavis
Milind Narvekar-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Y+Escort Security : नार्वेकर-फडणवीस बहुत ही याराना लगता है’!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकरांचे (Milind Narvekar) राजकीय ‘वजन’ शिवसेना-भाजप युती, महाविकास आघाडी आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वाढत असल्याचे त्यांच्या भोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेवरून दिसत आहे. सत्तासंघर्षात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांच्या सुरक्षेत कपात करण्याचे डावपेच टाकले जात असताना नार्वेकरांची सुरक्षा मात्र गेल्या १७ वर्षांत वाढत गेली आहे. विशेष म्हणजे, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच नार्वेकरांकडे पोलिसांचा पहारा तगडा ठेवल्याचे उघड आहे. (Fadnavis connection behind increasing Milind Narvekar's security)

याआधी युतीत फडणवीस मुख्यमंत्री असताना नार्वेकरांना ‘वाय प्लस’ची सुरक्षा व्यवस्था होती. आता पुन्हा गृहमंत्री बनल्यानंतर फडणवीसांनीच नार्वेकरांना अधिक ‘सुरक्षित’ केले आहे. नव्या व्यवस्थेतून नार्वेकरांच्या दिमतीला पोलिसांसह आणि 'एस्कॉर्ट' ही राहणार आहे, त्यामुळे फडणवीस-नार्वेकर यांच्यात 'बहुत ही याराना लगता है' असे बोलले जात आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांपासून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत म्हणजे, सात मुख्यमंत्र्यांनी नार्वेकरांची काळजी घेतल्याच्या नोंदी आहेत.

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता येताच महाविकास आघाडी सरकारचे निर्णय फिरविण्यात येत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री, आमदार आणि काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यापासून ती काढण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकार घेत आहे. त्यावरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील राजकारण तापत आहे. अशांत मात्र, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे विश्वासू नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. त्यावरूनही नार्वेकर हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी आले आहेत.

शिवसेनेचे सरकार नसताना म्हणजे २००५ मध्ये नार्वेकरांना पहिल्यांदा सुरक्षा पुरविण्यात आली. या टप्प्यांत ना 'एक्स' दर्जाची सुरक्षा होती. याच काळापासून नार्वेकरांचे प्रस्थ वाढत राहिल्याने त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानंतर राजकीय बदल्यांना वेग आला आणि नार्वेकरांचे शिवसेनेसोबतच, तेव्हाचा मित्रपक्ष भाजप आणि विरोधी पक्षांतही महत्त्व वाढत गेले. त्यांच्या कामाचा आवाका पाहून नार्वेकरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला.

राष्ट्रवादी काँग्रेस-कॉंग्रेस आघाडीतही नार्वेकरांच्या सुरक्षा व्यवस्थेला धक्काही लागला आहे. या काळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बंडानंतर देशमुख, तत्कालीन दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नार्वेकरांना पहिल्यांदा सुरक्षा दिली. त्यापुढे म्हणजे, युतीत म्हणजे २०१४ ते २०१९ या पाच वर्षात फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना 'वाय प्लस' सुरक्षा पुरविण्यात आली.

शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारमधील नेत्यांच्या सुरक्षेत कपात झाली. तेव्हाही नार्वेकरांची व्यवस्था कायम ठेवण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा विरोधी बाकांवरच्या नेत्यांकडे पोलिस कमी करण्यात आले; तर 'काहींची व्यवस्था रद्दही केली आहे. त्याला नार्वेकर हे अपवाद ठरले आहेत. त्यांच्याकडे आता 'वाय प्लस'वरून वाय प्लस आणि एस्कॉर्टही राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांना भेटत राहिल्याने या सरकारमध्ये नार्वेकरांना महत्त्व असल्याचे दिसून आले. त्याचवेळी फडणवीस हे गणेशोत्सवात नार्वेकरांच्या घरी आल्याने या दोघांमधील मैत्री उघड झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीनंतर; तर मिलिंद नार्वेकर साऱ्यांचे मित्र असल्याने ते चांगल्या मतांनी जिंकल्याचे फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यातच सुरक्षा व्यवस्था वाढविल्यानेही फडणवीस-नार्वेकरांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT