Shirdi BJP Convention Sarkarnama
विशेष

Devendra Fadnavis : शिर्डीच्या अधिवेशनात फडणवीसांनी लोकसभेची ‘ती’ खंत बोलून दाखवलीच; म्हणाले, ‘मनातून नापास झालो होतो’

Shirdi BJP Convention : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा दुहेरी सामाना झाला होता. त्यात महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले होते.

Vijaykumar Dudhale

Shirdi, 12 January : लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या. म्हणजे जेमतेम ३५ टक्के मार्क्स घेऊन आपण काठावर पास झालो होतो. पण, मनातून मात्र नापास होतो, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलून दाखवली.

भारतीय जनता पक्षाचे शिर्डी येथे आज राज्यस्तरीय अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जागांबाबत भाष्य करत विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिंकलेल्या यशाचे विश्लेषण केले. ते करताना काँग्रेसच्या २२२ जागांचा विक्रम आम्ही मोडीत काढल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अपयशानंतर ज्या प्रकारचे प्रयत्न आपण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो विश्वास आपण निर्माण केला. त्यामुळे विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी २३७ जागा जिंकून महाराष्ट्रात आपण इतिहास तयार केला. विधानसभा निवडणुकीत आपण ८२ टक्के गुण मिळविले आणि भाजप तर ८९ गुण मिळवून मेरीटमध्ये पास झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतका मोठा विजय मिळाला आहे की, आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात, राज्याच्या निर्मितीनंतर सत्ताधारी पक्षाला मिळालेल्या जागा २२२ होत्या. पण, महायुतीने त्याचाही रेकॉर्ड तोडून २३७ जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला हा विजय आहे, असा दावाही फडणसवीसांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, आपण पाहतो जी-२० आणि जी-७ असतं. तसं भारतीय जनता पक्षामध्ये जी-६ तयार झालं आहे. म्हणजे जे सतत तीन वेळा जिंकले आहेत, त्या राज्यांच्या म्हणजेच गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरियाणा या राज्यांच्या सोबत आता महाराष्ट्रही जोडला गेला आहे. ज्यांनी जिंकण्याची हॅट्‌ट्रीक करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे.

लोकसभा निवडणुकीत काय घडले होते?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा दुहेरी सामाना झाला होता. त्यात महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले होते. महाविकास आघाडीत काँग्रेसला १३ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ०८ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ०९ एवढ्या जागा मिळाल्या होत्या. महायुतीमध्ये भाजपने ०९ जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ आणि शिवसेनेला ०७ इतक्या जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT