Mumbai News : विधानसभेच्या निकालाआधी महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्रित बसून घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. पण महायुतीच्या पारड्यात घवघवीत यश दिल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन पडद्यामागं बरंच घमासान सुरू होतं. पण एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडल्यानं आता भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच अजितदादांनी आधीच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर करुन शिवसेनेच्या दाव्यातील हवाच काढून टाकल्याची चर्चा होती. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दूर लोटणं भाजपसाठी परवडणारं नाही. किंबहुना अजितदादांपेक्षा शिंदेंच भाजपला जास्त महत्त्वाचे आहेत. यामागं 5 प्रमुख कारणं आहे.
अडीच वर्षांपूर्वी भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वानं सर्वात मोठा पक्ष असूनही कमी जागा असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.खरंतर संपूर्ण महाराष्ट्राला चकवा देणारा हा निर्णय होता.
एव्हाना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढवल्या गेल्या. त्यामुळे आता महायुतीला दणदणीत विजयानंतर तर पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी शिंदे शिवसेना आग्रही होती. पण भाजपकडून हा आग्रह मोडीत काढत भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्टपणे सांगण्यात आलं. यामुळे शिंदेंसह शिवसेना नाराज असल्याची कुजबुज राज्याच्या राजकारणात होती.
एकनाथ शिंदेंनी आपला महायुतीत कोणताही अडसर नसेल, मोदी, शाह महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घेतील तो आम्हांला मान्य असेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.पण शिंदेंना डावलणं भाजपसाठी शक्य नाही. कारण शिंदे यांच्याकडे महायुतीतील सर्वात मोठा मराठा चेहरा म्हणून पाहिले जाते.
मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून निकाली निघालेला नाही.मनोज जरांगेंनी सत्तास्थापनेनंतर पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा तीव्र करतानाच मराठा समाजाला सामूहिक उपोषणाची हाक दिली आहे. त्यामुळे महायुतीपुढं या आंदोलनाला रोखणं हे नवं आव्हान असणार आहे.जर शिंदेंना डावललं गेलं तर मराठा समाजाची नाराजी ओढावू शकते.जर हे होऊ द्यायचं नसेल तर शिंदेंना साथ तितकीच महत्चाची असणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मुंबई,ठाणे, पुणे, नाशिक,छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसारख्या महत्त्वाच्या 28 महापालिका निवडणुका होणार आहे.
त्यात एकनाथ शिंदेंची मदत तितकीच आवश्यक असणार आहे. त्यात मुंबई महानगर पालिका गेली 25 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असून आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का देत बीएमसी काबीज करण्यासाठी शिंदेंना डावलण्याची चूक भाजप पक्षश्रेष्ठी करणार नाही.
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्यानं 105 जागा जिंकूनही भाजपला विरोधात बसावं लागलं. पण एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि भाजपची सत्तेत एन्ट्री झाली.पण आता त्यांच्यासह निवडणुका लढवल्यानंतर मोदी- शाहांकडून शिंदेंना दूर लोटलं गेलं तर चुकीचा मेसेज महाराष्ट्रात जाईल.
देवेंद्र फडणवीसांनी आमची शिवसेनेसह शिंदेंसोबतची युती वैचारिक तर अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबतची युती राजकीय असल्याचं स्टेटमेंट केलं होतं. त्यामुळे महायुतीत अजितदादांपेक्षा एकप्रकारे शिंदेंवर आमचा विश्वास अधिक असल्याचं हे द्योतक होतं. तसेच अजितदादांनी काही गडबड करु नये यासाठी कायम दबावतंत्राचा भाग म्हणून शिंदे उपयुक्त ठरू शकतात. त्यातच तब्बल 57 जागा जिंकल्यानंतर शिंदेंची ताकद आता काहीएक पटींनी वाढली असून त्यांचीच शिवसेना खरी असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे.
त्यामुळे महायुतीत जर एकनाथ शिंदे नाराज राहिले तर लोकांमध्ये नकारात्मक संदेश जाऊ शकतो. आधीच भाजपवर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जातात. महायुतीपासून शिंदे वेगळे झाल्यास भाजपने सत्तेसाठी शिंदे यांचा वापर करून घेतला असा प्रचार होऊ शकतो. ज्याचा फटका भाजपला आगामी काळात बसू शकतो.
आता खरंतर महायुतीतल्या तीनही पक्षांपैकी कुणीही वेगळी भूमिका घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे आता दिसून येत आहे. तरीदेखील शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारून महायुतीकडून महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आले तर विरोधकांना टीकेसाठी मोठा मुद्दा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी शिंदेंचा वापर केल्याचा आरोपही भाजपवर होऊ शकतो. म्हणून एकनाथ शिंदे भाजपसाठी तितकेच फायदेशार आहेत.
महाराष्ट्रात भाजपाला कडवं आव्हान हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं असणार आहे.त्यांच्याकडून मोदी, शाह, फडणवीस हे नेहमीच टार्गेट राहिले आहेत.अशावेळी शिंदेंच्या रुपाने उद्धव ठाकरेंचा एक कडवा प्रतिस्पर्धी म्हणून आजपर्यंत समोर आले आहेत.त्यात ठाकरेंना नामोहरम करण्यासाठी शिंदेंची साथ भाजपसाठी महत्त्वाची असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.