Tukaram Mundhe-Tanaji Sawant
Tukaram Mundhe-Tanaji Sawant Sarkarnama
विशेष

मुंडेंशी वाद झालेल्या राजकारण्यांचे पुढे काय झाले? साबणेंपासून सुरू झालेला सिलसिला सावंतांपर्यंत पोचतो...

प्रमोद बोडके

सोलापूर : वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) आणि लोकप्रतिनिधींशी संघर्ष हे अनेक वर्षांचे समीकरण आजही कायम आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यातील छुपा संघर्ष समोर आला आहे. अवघ्या दीड महिन्यात मुंडे यांना या पदावरून बाजूला करण्यास मंत्री सावंत यांचा हात असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात रंगत आहे. मंत्री सावंत यांची जन्मभूमी सोलापूर, मुंडे यांची जन्मभूमी बीड आणि या दोन्ही जिल्ह्याच्या मध्ये असललेल्या उस्मनाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा-वाशी मतदारसंघ मंत्री सावंत यांची कर्मभूमी असल्याने या संघर्षाचे पडसाद आगामी काळात उमटण्याची दाट शक्यता आहे. (Fallout of Tukaram Mundhe-Tanaji Sawant dispute will be felt in Bhum Paranda)

मंत्री सावंत यांची जन्मभूमी सोलापूर जिल्ह्यात आहे, तर तुकाराम मुंडे आयएएस झाल्यानंतर परीविक्षाधिन अधिकारी म्हणून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातूनच सेवेला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांशी मंत्री सावंत व मुंडे यांचा कमी अधिक प्रमाणात थेट कनेक्ट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंडे यांची बदली नागपूरवरून मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आली होती. तब्बल तीन वर्षे साईड पोस्टला असलेले मुंडे या कालावधीत ना चर्चेत होते, ना कोणत्या वादात होते.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर डॉ. सावंत यांच्याकडे जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागात मुंडे यांच्याकडे कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकपद देण्यात आले. या दोघांच्याही कार्यपद्धती व स्वभाव शैलीमुळे नक्कीच खटके उडणार? अशी शक्यता मंत्री सावंत व मुंडे यांना जवळून ओळखणाऱ्यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. मुंडे यांनी ज्या ज्या विभागांत व जिल्ह्यांत काम केले, त्या त्या ठिकाणी त्यांना विरोध करणारा आणि मानणारा वर्ग तयार झालेला आहे.

मुंडे यांच्या बदलीशी माझा काहीही संबंध नसल्याचे आरोग्यमंत्री सावंत सांगत असले तरीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राचा दाखला देऊन मंत्री सावंत यांनीच ही बदली करायला लावली असल्याचा करेक्ट मेसेज देण्यात आला आहे. मुंडे यांची ज्या पदावरून बदली झाली, त्या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही आणि मुंडे यांनाही पोस्टिंग दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात त्या पोस्टच्या बाबतीत आणि मुंडे यांच्या बाबतीत सरकारच्या मनात आहे तरी काय? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मुंडेंबरोबर खटके उडालेले राजकारणी....

तुकाराम मुंडे यांचा ज्या लोकप्रतिनिधींशी खटके उडाले, त्यातील काही जण पराभूत तर काहीजण राजकारणाच्या बाहेर गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हा योगयोग आहे की आणखी काय? हे जरी ठामपणे सांगता येत नसले तरीही देगलूर (जि. नांदेड) येथून तत्कालिन आमदार सुभाष साबणे यांच्यापासून सुरु झालेला हा घटनाक्रम नागपूरचे माजी महापौर व नागपूर पदवीधर मतदार संघात २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीचे भाजप उमेदवार संदीप जोशी यांच्यापर्यंतचा आहे. मोहोळचे राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार रमेश कदम यांनी आमदार झाल्यापासून ते तुरुंगात जाण्यापर्यंत सोलापूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशी पंगा घेतल्याचे या जिल्ह्याने पाहिले आहे. माजी आमदार कदम सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पॉलिटिकल करिअरच्या बाबतीत सध्या जे घडले आहे, त्याला जबाबदार असलेल्या इतर कारणांमध्ये मुंडे-कदम या वादाचीही किनार असल्याचे दिसते.

आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण कोणाला नकोय

दिल्लीचे मुख्यमंत्री सरकारी शाळा आणि सरकारी दवाखान्यांचे सक्षमीकरण करून देशापुढे नवे मॉडेल आणत आहेत. या मॉडेलला पंजाबच्या जनतेने स्वीकारले. मुंडे यांच्या येण्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागात सुधारणा होऊ लागली होती. स्वत: सरकारी नोकरी करत असलेले सरकारी दवाखाने ओस आणि स्वत:चे व नातेवाईकांचे खासगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश होऊ लागला होता. सरकारी आरोग्य यंत्रणेत बदलाच्या दिशेने सुरुवात होऊ लागली होती. दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातीलही आरोग्य यंत्रणा सक्षम होण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. दिल्लीतील केजरीवाल सरकार आरोग्य यंत्रणेला एवढे महत्व देत असताना महाराष्ट्र सरकार आरोग्य यंत्रणा सुधारविण्यासाठी का महत्व देत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

सर्वपक्षीय नेत्यांना मुंडेंचा तिटकारा का?

मुंडे यांची आतापर्यंत १७ वर्षे सेवा झाली आहे. त्यातील अकरा वर्षे साईड पोस्टला, तर सहा वर्षे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी या ठिकाणी त्यांना संधी मिळाली आहे. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जायकवाडी (नाथसागर जलाशय) धरणातून जालन्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण केले. स्टील उद्योगातील प्रदूषण थांबविले. पाणंद रस्त्यांचा विषय मार्गी लावला. सोलापुरात आल्यानंतर त्यांनी पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकरावर निवास, मंदिरातील महत्वाच्या सुधारणा, जलयुक्त शिवार हे विषय राबविले. आयुक्त असताना नवी मुंबईत ६० सेवा ऑनलाईन केल्या. नागपूरमध्ये पाच हजार बेडचे कोविड सेंटर उभारले. नाग नदीचे पुनरुज्जीवन केले. जनतेने स्वीकारलेल्या मुंडेंचा सर्वपक्षीय नेत्यांना तिटकारा का, असा सवाल मात्र उपस्थित होतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT