Jayant Patil-Eknath Shinde-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Jayant Patil : अजितदादांनी तुकोबांबरोबर ‘एकनाथाला’ही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय; जयंतरावांनी पुन्हा टायमिंग साधलं!

Maharashtra Budget Session 2025 : उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरले आहेत. कारण अजितदादांनी अकरावा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतोय सावरकर तुम्ही मध्ये बोलू नका, असे म्हणत रणधीर सावरकरांना पहिल्याच वाक्यात जयंतरावांनी टोला लगावला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 11 March : मागील अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग उद्‌धृत केले होते. या वेळी मात्र अजितदादांनी तुकोबांना थोडसं दूर केलेलं आहे. अजितदादा तुकोबांपासून एवढे दूर का गेले? असा प्रश्न आहे. पण, ठीक आहे, त्याबाबत काही हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता ‘एकनाथा’लाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे (या वेळी सभागृहात एकच हशा पिकतो), असा टोला लगावताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परफेक्ट टायमिंग साधले.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जयंत पाटील हे बोलत होते. जयंतरावांनी आपल्या भाषणात जोरदार चिमटे काढत टोमणे मारले. ते म्हणाले, एकनाथरावांनी मुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले होते. त्यात आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरीक तीर्थाटन योजना आणल्या होत्या. त्याला काही तरतूद झाल्याचे या अर्थसंकल्पात दिसत नाही, हे देखील या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरले आहेत. कारण अजितदादांनी अकरावा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतोय सावरकर तुम्ही मध्ये बोलू नका, असे म्हणत रणधीर सावरकरांना पहिल्याच वाक्यात जयंतरावांनी टोला लगावला. अजितदादांचे अभिनंदन करत असताना, या अर्थसंकल्पाचे वर्णन दुर्दैवाने मला बडा घर पोकळ वासा, असे करावे लागत आहे. या सरकारच्या पाठीमागे 232 आमदारांचं बहुमत आहे. ज्यांनी बहुमत दिलं, ती महाराष्ट्रातील जनता मोठ्या आशेने अर्थसंकल्पाकडे पाहत होते. पण त्यांच्या पदरी निराशा आली, असेही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील म्हणाले, अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी अनेक महापुरुषांचा उल्लेख केला. त्यांना मीही वंदन करतो. पण दादांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख केला. अहिल्यादेवींनी धार्मिक स्थळांना आणि शेतकऱ्यांना भरभरून मदत केली. त्यांच्या नावाचा उल्लेख दादांनी केला म्हणून हा प्रश्न आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाने काय दिले. अहिल्यादेवी होळकरांच्या खजिन्यामध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती. महाराष्ट्राच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे. आज आपण महापलिकांनाही कर्ज देऊ शकत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. कारण आपणच मोठ्या प्रमाणात कर्ज काढलेले आहे.

महाराष्ट्रावर २०२०-२१ मध्ये पाच लाख १९ हजार कोटी इतकं होतं, या वर्षी ते नऊ लाख ३२ हजार कोटींपर्यंत पोहोचणार आहे. अजितदादांनी अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही कविता केली. मग मीही विचार करायला लागलो, एखादी कविता सुचतेय काय बघत होतं. मी कवितांच्या मार्गावर नाही; पण मला चार ओळी सुचल्या आहेत.

सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार नाही I

महाराष्ट्र आता थांबणार नाही II

गुन्हेगारी थांबणार नाही, रक्तपात रोखणार नाही I

महाराष्ट्र आता थांबणार नाही II

पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही, जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही I

महाराष्ट्र आता थांबणार नाही II

आश्वासने पूर्ण करणार नाही, विकासाची वाट धरणार नाही I

महाराष्ट्र आता थांबणार नाही II

रोजगार देणार नाही, शिक्षण आणि आरोग्याची सेवा सुधारणार नाही I

महाराष्ट्र आता थांबणार नाही II

जयंतरावांनी या कवितेतून सरकारला शालजोडे लगावण्याचे सोडले नाही. या कवितेच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंंकल्पाची आपल्या शैलीत चिरफाड केली. त्यांच्या भाषणावेळी सभागृहात पीन ड्रॉप सायलेन्स होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT