Jaydattaji Kshirsagar  sarkarnama
विशेष

Jaydattaji Kshirsagar : राजकीय डावपेचात माहीर जयदत्त क्षीरसागरांनी ‘हातचा राखला’; अपक्ष लढण्याचीही शक्यता

Dattatrya Deshmukh

Jaydattaji Kshirsagar News : पंचायत समिती सदस्य ते पाच वेळा आमदार आणि राज्याचे कॅबीनेट मंत्री असा राजकीय प्रवास केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मागची साडेचार वर्षे ‘राजकीय बॅड पॅच’चे ठरले. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कमबॅक केले. जयदत्त क्षीरसागर यांनी आगामी भूमिका ठरविण्यासाठी कार्यकर्ता मेळावा घेतला. मात्र, या मेळाव्यात पुढील निर्णयाचा ‘हातचा राखून’ ठेवला.

जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र राजकीय डावपेचांत माहीर असलेले क्षीरसागर आता ‘राजकीय वाऱ्याची’ दिशा पाहून अपक्ष लढण्याचीच तयारी करतील, असा अंदाज आहे.

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर Jaydattaji Kshirsagar पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमंत्री आणि राज्याच्या विविध खात्यांचे कॅबीनेटमंत्री असा राजकीय प्रवास केला. जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या क्षीरसागरांची राजकीय भूमिका आष्टीत धोंडे तर गेवराईत बदामराव पंडितांना आणि बीडमध्ये सय्यद सलिमांना आमदारकीच्या खुर्चीवर पोचविण्यास मदत करणारी ठरली. स्वत: देखील जुना चौसाळा (आताचा केज) व बीड अशा दोन विधानसभा मतदार संघातून स्वत:च्या विजयाची क्षमता ठेवून होते.बाजूच्या गेवराई आणि दुरवर असलेल्या आष्टी मतदार संघातील राजकीय घडामोडींत देखील क्षीरसागर भूमिका निभावत.

एकेकाळी जयदत्त क्षीरसागर राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांमधील एक. दरम्यान, काँग्रेसची विचाराचे क्षीरसागर घराणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवारांसोबत गेले. राष्ट्रवादीने देखील त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली. मात्र, जिल्‍ह्यात अजित पवार यांचा गट प्रबळ होत असल्याने शरद पवार व छगन भुजबळ यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर ‘मर्यादा’ लादल्या जाऊ लागल्या.

धनंजय मुंडे यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेस NCP प्रवेशानंतर जयदत्त क्षीरसागर यांचे अधिकच खच्चीकरण होत गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून जयदत्त क्षीरसागर एकमेव विजयी होणारे पक्षाचे आमदार होते. मात्र, पक्षातील एक गट त्यांच्याशी बंडखोरी करणारे पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ देत असल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत थेट भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार केला आणि शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, त्यांच्या पराभवानंतर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आले. परंतु, जेष्ठ नेते शरद पवार यांचा सरकारवर प्रभाव आणि क्षीरसागरांवर ‘खप्पामर्जी’ असल्याने क्षीरसागर सत्ताकेंद्रापासून दूरच राहीले. यात त्यांचे तीन वर्षे गेले. तर, बीड शहरातील 79 कोटी रुपयांच्या रस्ते व नाली बांधकामांचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने करुन घेतल्याचा तोटा जयदत्त क्षीरसागर यांना झाला. त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले.

त्यानंतर बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी पराभूत झाली आणि 40 वर्षे ताब्यात असलेली त्यांची सत्ताही गेली. राज्यातील नव्या राजकीय समिकरणानंतर (राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत गेल्यानंतर) त्यांच्या सोबत असलेले पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर देखील त्यांच्यापासून दुरावले. दरम्यान, या सर्व प्रकारात साडेचार वर्षे काहीसे राजकीयदृष्ट्या मागे पडलेले जयदत्त क्षीरसागर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चांगलेच राजकीय प्रवाहात आले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या मागे आपली ताकद उभा केली.

बीड मतदार संघातून सोनवणेंना तब्बल 62 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे सोनवणेंचा विजय सुकर झाला. बीड विधानसभा मतदार संघातील इतरही नेत्यांनी सोनवणेंसाठी ताकद लावली होती. परंतु, क्षीरसागरांची भूमिकाही राजकीय लक्षवेधी ठरल्याने आता त्यांच्या भविष्यातील भूमिकेकडे लक्ष लागून हेाते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज (रविवारी) समर्थकांचा मेळावा घेतला.

या मेळाव्यात ते कोणत्या पक्षात जायचे याची भूमिका जाहीर करतील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, त्यांनी ‘योग्य वेळी योग्य भूमिका’ घेऊ, असे जाहीर केले. निर्णय हातचा राखून ठेवल्याने आता जयदत्त क्षीरसागर राज्यातील नवीन ‘राजकीय वारे’ कोणत्या दिशेने वाहते त्यानुसार निर्णय घेतील असे मानले जाते. जयदत्त क्षीरसागर राष््रटवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, असे अंदाज बांधले जात आहेत. मात्र या पक्षात त्यांचे राजकीय विरोधक पुतणे संदीप क्षीरसागर आमदार असल्याने ते बीडमधून अपक्ष विधानसभा लढणच्याच दृष्टीने बांधणी करणार असल्याचे निकटवर्तीयांचा अंदाज आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT