Yogi Adityanath-Atique Ahemad
Yogi Adityanath-Atique Ahemad Sarkarnama
विशेष

Yogi Government Decision : मोठी बातमी : अतिकने बळकावलेल्या जमिनी मूळ मालकांना परत मिळणार : योगी सरकार लवकरच निर्णय घेणार

सरकारनामा ब्यूरो

लखनऊ : गॅंगस्टार अतिक अहमदच्या ताब्यातील जमीन पीडित मूळ मालकांना परत करण्याचा विचार योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारकडून करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकार (State government) एक आयोग स्थापन करणार आहे. त्या आयोगाच्या अहवालावरून ताब्यात घेतलेल्या जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. माफिया अतीक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी प्रयागराजसह अनेक शहरांमध्ये दादागिरी करून जमिनी बळकावल्या होत्या किंवा त्या लोकांकडून कवडीमोल भावाने घेतल्या होत्या. (Lands grabbed by Atique Ahmed will be returned to original owners : Yogi government will take a decision soon)

माफियांनी बळकावलेल्या जागा चिन्हांकित करून त्या लोकांना परत करण्याचा विचार केला जात आहे. योगी सरकार याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर जमीन गेलेल्या लोकांच्या तक्रारी पोलिसांकडे अचानक वाढल्या आहेत. त्यादृष्टीने अधिकारी आराखडा तयार करत आहेत.

यूपी एसटीएफने १३ एप्रिल रोजी अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याला चकमकीत ठार केले होते. त्याच दिवशी, यूपी प्रशासनाने एक आकडा जाहीर केला, ज्यामध्ये अतीकने दादागिरीच्या जोरावर किती संपत्ती जमा केली, हे दर्शविते. कारण, दहावी नापास अतिक अहमदकडे इतकी संपत्ती कशी आणि कुठून मिळाली? असा सवाल उपस्थित होतो आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अतिक अहमदच्या बेकायदेशीर मालमत्तांवर योगी सरकारकडून बुलडोझर चालविण्यात येत आहे. अतिकचा काळा पैसा अनेक शहरांमध्ये सापडला आहे. सरकारी आकडेवारीनुसार १३ एप्रिलपर्यंत अतिक अहमदच्या ताब्यातून सुमारे ११६९ कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता सोडविण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये छापे टाकण्याचे काम सुरू आहे. अतिकने त्रास दिलेले लोक हळूहळू पुढे येऊन तक्रार करू लागले आहेत.

यूपी सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रशासनाने अतिक अहमदची ४१७ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे, तर सुमारे ७५२ कोटी रुपयांचे अवैध अतिक्रमण पाडण्यात आले आहे. एकूण ११६९ कोटी रुपयांच्या बेकायदेशीर संपत्तीचा आतापर्यंत खुलासा करण्यात आला आहे.

सोनिया गांधींच्या नातेवाईक आणि पॅलेस टॉकीजच्या मालक वीरा गांधी यांच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील मालमत्तेवर अतिकने २००७ मध्ये अतिक्रमण केले होते. प्रयागराजमधील प्रभावशाली लोकांमध्ये वीरा गांधींच्या कुटुंबाचाही समावेश होतो. अतिकने वीरा गांधीची जमीन ताब्यात घेऊन आपल्या गुंडांच्या मदतीने त्याला कुलूप लावले होते. वीरा गांधींची ही मालमत्ता पॅलेस टॉकीजच्या मागे होती. अतीक तेव्हा फुलपूरचा समाजवादी पक्षाचा खासदार होता.

वीरा गांधी यांना जेव्हा ही माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी यूपी सरकार आणि जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची विनंती केली होती. पण त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यावेळी सोनिया गांधी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या अध्यक्षा होत्या. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे अतिक यांना जमीन सोडण्यास भाग पाडण्यात आले.

माजी पोलिस महानिरीक्षक लालजी शुक्ला म्हणाले की, वीरा गांधींच्या कुटुंबाकडे प्रयागराजमध्ये अनेक जमिनी आहेत. पॅलेस टॉकीजच्या मागे ही जागा असल्याने अतीकला ती जागा ताब्यात घ्यायची होती. प्रयोग म्हणून त्यांनी ही मालमत्ता ताब्यात घेतली होती. त्यात तो यशस्वी झाला असता, तर वीरा गांधींच्या कुटुंबाच्या मालकीच्या इतर जमिनीही ताब्यात घेण्याचा त्याचा डाव हेाता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT