Manoj Jarange Patil Sarkarnama
विशेष

Kopardi Incident : ‘कोपर्डीची घटना ही मराठ्याच्या हृदयाला लागलेला बाण; आरोपीला फाशी द्या’

Vijaykumar Dudhale

Jalna News : कोपर्डीची घटना ही प्रत्येक मराठ्याच्या हृदयाला लागलेला बाण आहे. ती प्रत्येकाच्या घरातील मुलगी आहे. तिला न्याय मिळाला पाहिजे. त्या खटल्यातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथील बैठकीत केली. (Death sentence should be given to accused in Kopardi incident : Manoj Jarange Patil's demand)

मराठा समाजाची आज अंतरवाली सराटी येथे बैठक झाली. त्या बैठकीत जरांगे पाटील यांनी कोपर्डीचा मुद्दा उपस्थित केला. आरक्षणाच्या मागणीवर लढण्यासाठी त्यांनी आज तेरा मुद्दे सांगितले. त्यातील सातव्यात मुद्यात त्यांनी कोपर्डीचा उल्लेख केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले की, नगर जिल्ह्यातील कोपर्डीचा खटला तत्काळ मार्गी लावला पाहिजे. तरच अशा घटना पुन्हा होणार नाहीत. आमच्या पोरांना काही न करता जेलमध्ये टाकले जाते आणि कोपर्डी खटल्यातील आरोपीला जेलमध्ये शिकवता, व्वा रे सरकार. या खटल्यातील आरोपीला पुस्तकं घेऊन दिली आहेत. त्याच्या हातात हातोडा द्या ना. त्याला जरा दगडं फोडू द्या ना. पण, त्याच्या हातात पेन दिला आहे, म्हणजे त्याला कारागृहात शिकवत आहेत. बाहेर आल्यावर त्याला नोकरीला लावतात की काय, असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.

कोपर्डीची खटल्यातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे होती. पण, ती केस अजूनही उच्च न्यायालयात सुरू झालेली नाही. फास्ट ट्रॅकमध्ये सेशन कोर्टात चाललेली केस वरच्या कोर्टात एक वर्षाच्या आतमध्ये संपवावी लागते, असा नियम आहे. जर एखादी केस खालच्या कोर्टात फास्ट ट्रॅकमध्ये चालली असेल तर वरच्या कोर्टात त्या केसचा निकाल एक वर्षाच्या आतमध्ये लावावा लागतो. त्या प्रकरणाला आता तीन वर्षे झाली आहेत. अजूनही मंत्रालयातील विधी व न्याय विभागातून अर्ज गेलाच नाही. व्वा रे सरकार. असा तुम्ही मराठ्यांना न्याय देणार. अशा घटना थांबवणार कशा? असा सवालही त्यांनी केला.

आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, आता फक्त गर्दीने नव्हे; तर बुद्धीने निर्णय घ्यायचा आहे. ही लढाई ताकदीने आणि युक्तीने लढाईची आहे. अंतरवालीसह राज्यातील सर्व केसेस मागे घेण्यात येतील, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, सरकारने आतापर्यंत केसेस मागे घेतल्या नाहीत. एकालाही अटक करणार नाही, असे सांगितले होते. पण, अंतरवाली सराटीतील आंदोलकांना विनाकारण अटक करण्यात आली आहे. तुम्हाला शब्द पाळायचा नाही तर तो तुम्ही दिलाच कशाला?

आमच्याशी खोटं वागू नका. तुम्हाला आम्हाला आत टाकायचे आहे, तर आम्ही सर्व सहा कोटी मराठे आतमध्ये येऊन बसतो, असेही आव्हान जरांगे यांनी सरकारला दिले. ते म्हणाले की, अंतरावलीमधील लोकांना नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर आणखी काही लोकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकतर अटक करायची आहे म्हणा किंवा नाही तर गुन्हे तरी मागे घ्या. येत्या सात ते आठ दिवसांत गुन्हे मागे घेण्यात यावेत, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT