Appasaheb Jagdale
Appasaheb Jagdale Sarkarnama
विशेष

Indapur Politic's : आमच्यावर शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील; पण ‘त्यांना’ राजकीय परिणाम भोगावे लागतील : आप्पासाहेब जगदाळेंचा इशारा

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : ऊसबिल न दिल्याने इंदापूर (Indapur) तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी परवानगी नाकारूनही कारखाना परिसरात घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी जगदाळे यांच्यासह २०० ते २५० शेतकऱ्यांवर इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (March for sugarcane frp in Indapur; case has been registered against 250 farmers including Appasaheb Jagdale)

दरम्यान, आमच्यावर राजकीय दबावातून गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत. शेतकरीहितासाठी शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. ज्यांनी गुन्हे दाखल करायला लावले, त्यांना भविष्यात याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला.

नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने १ डिसेंबरपासून अद्यापपर्यंत सभासदांचे उस बिल न दिल्याने आप्पासाहेब जगदाळे यांचे नेतृत्वाखाली बावडा येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लाखेवाडी ते नीरा भीमा सहकारी साखर कारखाना गेटपर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली. त्यापूर्वी आत्मक्लेश पदयात्रा आंदोलन आयोजकांची बैठक घेऊन कलम १४९ ची नोटीस देऊन त्यांना सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानगी नकारली होती.

परवानगी नाकारलेली असतानाही शेतक-यांची गर्दी जमवून कारखाना परीसरात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला; म्हणून आप्पासाहेब जगदाळे (रा. सराटी ता. इंदापुर जि. पुणे), पंडीत पाटील, विजय गायकवाड, धैर्यशिल पाटील, अजित टिळेकर, महादेव घाडगे, तुकाराम घोगरे (सर्व रा. बावडा ता. इंदापुर जि. पुणे) यांच्यासह इतर 200 ते 250 शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस शिपाई समाधान तुकाराम केसकर यांनी फिर्याद दिली होती.

राजकीय दबावातून गुन्हा दाखल

दरम्यान, शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या उसाचे बिल नीरा भीमा आणि कर्मयोगी कारखान्याकडून न मिळाल्याने नीरा भीमा कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. मात्र आमच्यावर राजकीय दबावातून गुन्हे दाखल करण्यात आले. शेतकरी हितासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील, अशी रोखठोक भूमिका आप्पासाहेब जगदाळे यांनी मांडली.

जगदाळे म्हणाले, शेतकऱ्यांना वेळेत बिले न मिळाल्याने लाखेवाडी येथून तीन किलोमीटर पायी चालत शहाजी नगर येथील नीरा भीमा कारखाना येथे आत्मक्लेश मोर्चा पोचण्याआधीच पोलिसांनी आम्हाला दूर अंतरावरच रोखले. उन्हाची तीव्रता असल्याने सावलीचा आधार मिळावा; म्हणून आम्ही झाडाखाली येऊ देण्याची विनंती केली. मात्र, प्रशासनाने एक तास विनाकारण वाद घातला. तरीही आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन देऊन आंदोलन पूर्ण केले.

असे असतानाही राजकीय दबाव आणून आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरणारे नाही. मात्र, ज्यांनी गुन्हे दाखल करायला लावले, त्यांना भविष्यात याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जगदाळे यांनी यावेळी दिला.

(Edited : Vijay Dudhale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT