milind narvekar, amol mitkari  Sarkarnama
विशेष

Milind Narwekar News : तुमची मते मिळाल्यानंतर अभिनंदन करा; मिलिंद नार्वेकरांचा मिटकरींना मिश्किल टोला

Sachin Waghmare

Political News : राज्यसभेत जाण्यासाठीच्या तयारीत असलेले ठाकरेंच्या शिवसेनेत राहून राजकरणामागचे राजकारण घडविणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे राज्यसभेत जाण्याऐवजी विधानपरिषदेत जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्जही भरला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी मिलिंद नार्वेकर (Milind Narwekar) विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. ते सरळ विधानभवनाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विधानपरिषदेच्या सभागृह असलेल्या ठिकाणी आले. त्यामुळे याठिकाणी उभे असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले.

यावेळी कोकण पदवीधरमध्ये विजयी झालेले आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांचे त्यांनी अभिनंदन केले. त्याचवेळी डावखरे यांनी देखील नार्वेकरांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी या दोघांमध्ये चर्चा रंगली असतानाच याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते तथा अमोल मिटकरी (Amol Mitakari) त्याठिकाणी आले. त्यांनी ही नार्वेकरांचे अभिनंदन केले.

त्यानंतर या दोघांमध्ये बराचवेळ चर्चा रंगली होती. त्यावेळी नार्वेकरांनी शाब्दिक कोट्या करून मिटकरींना हसवले. त्यानंतर मिटकरींना अभिनंदन करताच हजरजबाबीपणे उत्तर देताना 'तुमची मते मिळाल्यानंतर अभिनंदन करा' अशी मिश्किल प्रत्युत्तर नार्वेकर यांनी दिले.

नार्वेकर यांनी अशा प्रकारचा टोला अमोल कोल्हे यांना लगावल्याने खरोखरच या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे आमदार फुटणार का ? या चर्चेला काहीसा आधार मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळ आवारात आमदार फुटणार अशी चर्चा रंगली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने फोडफोडीचे राजकारण रंगण्याची शक्यता असताना पुन्हा एकदा विधिमंडळ आवारात सुरु असलेल्या या चर्चेमुळे त्याला कुठेतरी बळ मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार विधानपरिषद निवडणुकीत फुटणार का ? याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आगामी काळात होऊ घातलेल्या आमदारातून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेले फोडाफोडीचे राजकारण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता असून त्यामुळे या फोडाफोडीचा फटका सर्वच पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा आहे. काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत तर शरद पवार यांच्याकडे 10 तर उद्धव ठाकरे गटाकडे असणारे 15 संख्याबळ पाहता तीन उमेदवार निवडून येईल एवढे संख्याबळ आहे. ऐनवेळी फोडाफोडी झाली तर त्यांना फटका बसणार आहे. शरद पवार गटाने यापूर्वीच शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचा उर्वरित कोटा व शरद पवार गटाची मते जयंत पाटील यांच्या पारड्यात पडणार आहेत तर ठाकरे गटाच्या मतावर मिलिंद नार्वेकर यांना निवडून यावे लागणार आहे.

ठाकरे गटाकडे सध्या 15 आमदार आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांना छोटे पक्ष व अपक्ष अशी सात ते आठ मतांची जोडणी करावी लागणार आहे. तरच त्यांना या निवडणुकीत विजय मिळवणे शक्य होणार आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील भाजपने पाच उमेदवार जाहीर केले तर अजित पवार गटाने दोन तर शिंदे गटाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे सध्या तरी यापैकी कोणी माघार घेईल, असे वाटत नाही.

दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे काँग्रेसकडे पुरेसे मते असूनही पराभूत झाले होते. त्यामुळे ते यावेळेस काँग्रेस कुठलीही रिस्क घेईल असे वाटत नाही. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे मोठा घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात कोण माघार घेणार का ? दोन वर्षांपूर्वीप्रमाणे या निवडणुकीत पुन्हा एकदा फोडाफोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT