Nana Patole, Uddhav Thackeray, Ajit Pawar
Nana Patole, Uddhav Thackeray, Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Dispute in MVA on Resignation : पटोलेंच्या 'त्या' राजीनाम्यावरून आघाडीत कलगीतुरा; खरं कोण ? खोटं कोण ?

सरकारनामा ब्यरो

Nana Patole and Ajjit Pawar : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गुरुवारी (ता. ११) दिला. त्यात न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याबाबत झाला असता. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालानंतर ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आज वेगळे चित्र असते, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर राज्यात आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यायला नको होता, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यावरूनही पटोले यांच्यावर टीका झाली. पटोले अध्यक्षपदी असते तर गुवाहटीला गेलेल्या आमदारांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई केली असती. परिणामी महाविकास आघाडीचे सरकार वाचले असते, अशाही चर्चा राज्यभर झडली आहे. (Dispute in MVA)

नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा फेब्रुवारी २०२१ मध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिला होता. त्यानंतर या पदावर कुणाचीही निवड करण्यात आली नाही. महाविकास आघाडीत विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले होते. त्यानुसार अध्यक्षपदासाठी भोर-वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र या निवडीला महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांनी विरोध केला. परिणामी ही निवड रखडली. दरम्यान, अध्यक्षांचे सर्व अधिकार उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे होतेच.

न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे यांचा राजीनामा ही मोठी चूक ठरल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्यांच्या 'लोक माझे सांगती' या पुस्तकात ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोट ठवले आहे. आता मात्र नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसचा थोपटेंना विरोध, त्यानंतर ठाकरे यांचा राजीनाम्यावर चर्चा झडू लागल्या आहेत. दरम्यान, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पटोले यांच्यावर टीकाही केली.

पवार म्हणाले, "माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारताच राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर माहिती दिली. त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यामुळे पुढील घटना टाळता आल्या असत्या." त्यानंतर पवार (Ajit Pawar) यांनी अध्यक्षपदी कुणाचीतरी निवड करण्यात आम्ही कमी पडल्याचीही कबुली दिली. ते म्हणाले, "पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवड करायला हवी होती. अध्यक्षपदी निवड करून तो विषय संपवायला हवा होता. मात्र तेही दुर्दैवाने आमच्याकडून झाले नाही."

अजित पवारांनी केलेले सर्व आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी फेटाळले आहेत. नाना पटोले म्हणाले,"विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेसमधील काही नेत्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कल्पना दिली होती. त्यावर त्यांनी राजीनाम्यास नकार दिला होता. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मी राजीनामा दिला. ही गोष्ट त्यांना माहिती होती. आता ते खोटे बोलतात. माझ्या राजीनाम्यानंतर सर्व अधिकार उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zilwal) यांना होते. ते अपात्रतेचा निर्णय घेऊ शकले असते. मात्र त्यांनी तो अधिकार वापरला नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT