Balasaheb Thackeray  Sarkarnama
विशेष

Shiv Sena Foundation Day 2024 : मराठी माणूस बाजूला पडला होता, बाळासाहेबांनी न्याय मिळवून दिला

Sachin Waghmare

Shivsena Anniversary : मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी व हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी, प्रखर राष्ट्र विचाराचा जागर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच्या धगधगत्या विचारांतून जन्म घेतलेला शिवसेना पक्ष आज, म्हणजे 19 जूनला 58 वर्षांचा झाला आहे.

मराठी अस्मितेसाठी सुरू झालेल्या शिवसेनेला पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा डोस देऊन मराठी अस्मितेच्या परिघाबाहेर नेले. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या 18 जणांच्या साक्षीने शिवसेनेची (Shivsena) स्थापना केली. मराठी माणसांचे हित जोपासण्याची शपथ घेणाऱ्या बाळासाहेबांना त्यानंतर काही राजकीय खेळीही खेळाव्या लागल्या. शिवसेनेचा सामाजिक संघटना ते राजकीय पक्ष हा प्रवास कसा होत गेला. त्यानिमित्त थोडंस...

1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर वसाहतवादाच्या काळातील प्रादेशिक प्रशासकीय विभाग हळूहळू बदलले गेले आणि भाषिक सीमांचे पालन करणारी राज्ये निर्माण झाली. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये, मराठी भाषिक लोकांसाठी राज्याच्या निर्मितीसाठी एक प्रचंड लोकप्रिय लढा सुरू झाला. (Shivsena Foundation Day 2024 News)

1960 मध्ये अध्यक्षपद गुजरात आणि महाराष्ट्र या दोन भाषिक राज्यांमध्ये विभागले गेले. शिवाय, पूर्वीच्या हैदराबाद राज्यातील मराठी भाषिक भाग महाराष्ट्राशी जोडले गेले. बॉम्बे, अनेक प्रकारे भारताची आर्थिक राजधानी, महाराष्ट्र राज्याची राजधानी बनली. एकीकडे, शहरातील बहुसंख्य उद्योग, व्यापारात गुजराती समाजाचे लोक होते. दुसरीकडे, दक्षिण भारतीय स्थलांतरितांचा प्रवाह सतत वाढत होता. हे लोक व्हाईट कॉलर नोकऱ्या घेण्यासाठी येत होते.

1960 मध्ये मुंबईस्थित व्यंगचित्रकार बाळ ठाकरे (Balasaheb Thckeray) यांनी मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. या प्रकाशनाद्वारे त्यांनी स्थलांतरविरोधी भावना पसरवण्यास सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे रणशिंग फुंकले गेल्यानंतर हा लढा प्रामुख्याने त्याचे नेतृत्व करणाऱ्या मोठ्या हिंमतीच्या नेत्यांभोवती केंद्रित झाला. एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, माधवराव बागल, वा. रा. कोठारी अशा अनेकांनी आपले पक्षाभिनिवेश कायम ठेवूनदेखील संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून मराठी माणसाचा आवाज एकदिलाने पुकारला.

त्याकाळात प्रामुख्याने आचार्य अत्रे ‘मराठा’च्या आणि बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’च्या माध्यमातून या लढ्यात अग्रेसर राहिले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेते विखुरले गेले. काहींनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाची कास धरली. स्वतंत्र राज्य मिळवूनही त्याचे नेतृत्व करणे समितीला साधता आले नाही.

समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष आदींना त्यानंतर कधी राज्यपातळीवर जाता आले नाही. त्यावेळी मुंबईत मोठ्या संख्येने येणारे परप्रांतीयांचे लोंढे आणि त्यामुळे मराठी भाषक राज्यात मराठी माणसाचीच गळचेपी सुरू होती. या सार्वत्रिक समजुतीचा आधार घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे विविध टप्प्यांवर प्रसंगानुरूप भूमिका घेत नव्वदच्या दशकात शिवसेनेला राज्यभर नेऊन सत्ता मिळवून दिली.

शिवसेनेचा विस्तार मुंबई, ठाणे, पुणे या महानगरांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात सर्वदूर झाला आहे. प्रबोधनकारांच्या खोलीत शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. शिवसेना स्थापनेचा नारळ फोडताना 18 जण उपस्थित होते. या नव्या संघटनेचे नामकरण प्रबोधनकारांनी केले. भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शपथ घेतली.

मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत उपस्थितांनी शपथ घेतली. आपली मालमत्ता परप्रांतीयांना विकू नये, मराठी ग्राहकांशी विनयाने वागावे, मराठी नोकर नेमावे, मराठी शाळा, संस्थांना मदत करावी, मराठी बांधवांची गृहरचना संस्था काढावी, मराठी सण-समारंभांत भाग घ्यावा, मराठी बांधवांच्या मदतीला धावा याबरोबरच इंग्रजी टायपिंग शिकावे, आळस झटका, उडपी हॉटेलवर बहिष्कार टाकावा, मराठी व्यावसायिकांची उमेद वाढवा, त्याला नामोहरम करू नका, राज्यात कोठेही काम करण्याची मानसिकता जोपासा ही शपथपत्रातील कलमे तेव्हाच्या शिवसेना नेतृत्वाच्या मानसिकतेची आजही साक्ष देतात.

बाळासाहेबांच्या स्थलांतरविरोधी वक्तृत्वाने अनेक बेरोजगार मराठी तरुणांना शिवसेनेकडे आकर्षित केले. शिवसेनेचे कार्यकर्ते दक्षिण भारतीय समुदायांवरील विविध हल्ल्यांमध्ये सामील झाले, दक्षिण भारतीय रेस्टॉरंटची तोडफोड करण्यात आली. मराठी माणसाला कामावर घेण्यासाठी मालकांवर दबाव टाकण्यात आला.

पक्षस्थापनेनंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्यात (1966) ‘राजकारण म्हणजे गजकर्ण’म्हणणारे बाळासाहेब त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले. रस्त्यावरील हाणामाऱ्यांमुळे राजकारणात शिवसेनेला पूर्वी मित्र मिळत नव्हते. जून 1970 मध्ये कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या झाली.

शिवसेनेतील दगाबाजीनंतर एप्रिल 1989 मध्ये ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांचा निर्घृण खून झाला. 1970 मध्ये भिवंडीत दंगल झाली. यासारख्या घटनांमुळे शिवसेनेला जवळ करणे इतर राजकीय पक्षांना गैरसोयीचे वाटत होते. त्याचकाळात बाळासाहेबांनी हिंदुत्वाला अग्रभागी आणले.

त्यानंतरच्या काळात मुंबई, ठाणे महापालिकांतील शिवसेनेने शिरकाव केला. या भागात शिवसेनेचा विस्तार करण्यावर भर दिला गेला. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून या क्षेत्रांत शिवसेनेने आपुलकी मिळवली. विशेषतः गिरणी कामगारांच्या संपात सहभागी होत मोठी सहानुभूती त्याकाळी मिळवली. त्याचा फायदा शिवसेनेला मोठ्या प्रमाणात झाला.

त्यानंतरच्या काळात शिवसेनेने भाजपशी (Bjp) युती केली. शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर 1984 मध्ये विलेपार्लेतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा खुलेआम पुरस्कार करून हे कार्ड चालू शकते याचा राजकीय संदेश दिला. राजकारणातील पक्षाची अस्पृश्यता मिटवून टाकली. गेल्या पाच दशकांत झालेल्या विविध निवडणुकांत शिवसेनेच्या राजकीय भूमिका बदलत गेल्या आहेत.

1992-93 च्या मुंबई दंगलीतील शिवसेनेने घेतलेली भूमिका महत्वाची ठरली. त्यापूर्वी 1991 मध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला. छगन भुजबळ यांनी केलेल्या बंडामुळे 13 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. 1995 च्या निवडणुकीत राज्यात युतीची सत्ता आली. मनोहर जोशी 1995 मध्ये शिवसेनेचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. सध्या शिवसेनेचे दोन गट आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून एकनाथ शिंदे 40 आमदारांसह बाहेर पडले आणि भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री बनले आहेत. शिवसेनेतील फूट ही कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी ठरली आहे.

SCROLL FOR NEXT