Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News Sarkarnama
विशेष

शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

विष्णू सानप

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनासोबत केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तांतर झालाच. मात्र शिवसेनेत (Shivsena) मोठी उभी फूट पडली आहे. भाजपच्या साथीने शिंदेंनी नवं सरकार स्थापन केलं आणि राज्याचा कारभारही ते हाकत आहेत.

दरम्यान, सद्यस्थितीत शिवसेनेला खिंडीत पकडण्याची आणि उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंची अडचण वाढवण्याची कुठलीही संधी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सोडली जात नाही, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून विरोधकांचे शाब्दिक हल्ले परतून लावणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची शिवसेनेला आणि ठाकरेंना उणीव नक्की भासत असणार,असे चित्र आजघडीला दिसते. (Sanjay Raut Latest News)

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत हे ऑर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम आहे. सातत्याने मिडियामध्ये दिसणाऱ्या राऊतांची सुटका कधी होणार? एवढीच चर्चा आज माध्यमांमध्ये होत असते.

राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसेनेकडून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या शाब्दिक हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, नीलम गोरे, भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे हे निकराने प्रतिकार करत आहेत. मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या फौजेपुढे शिवसेनेचा प्रतिकार राऊतांविना फिका पडतोय. हे तितकच खरं.

2019 ला भाजप आणि शिवसेनेची मुख्यमंत्री पदाच्या वाटपावरून युती तुटल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन ते त्यांची सत्ता स्थापन होईपर्यंत राऊतांचा वाटा मोठा होता. नेमकी हीच सल भाजपच्या मनात कायम राहिली. त्यामुळेच शिवसेनेच्या पतनाला संजय राऊतांची माध्यमांमार्फत केली जाणारी जहरी टीका जबाबदार असल्याचा भाजपकडून वारंवार प्रचार आणि टीका करण्यात आली. मात्र ठाकरेंनी त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत राऊतांना अधिक जबाबदारी देत ताकद दिली होती. पुढे एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतरही तीच री ओढत हेच कारण पुढे केलं आणि ऱाऊतांच्या अडून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.

बंडानंतर सुरुवातीला थेट 'मातोश्री' आणि ठाकरेंवर टीका न करता पद्धतशीरपणे शिंदे गटाने राऊतांना लक्ष केलं होतं. मात्र भाजप आणि शिंदे गटाचे शाब्दिक हल्ले राऊतांनी मोठ्या खुबीने परतून लावले. यानंतर राऊतांना पत्राचाळ गैरव्यव्हार प्रकरणी ईडीची नोटीस आली. यावर राऊतांना उगीच फसवले जात असल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सांगितले होते. मात्र यानंतर काही काळाने राऊतांवर प्रत्यक्ष कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली.

बंडानंतर शिंदे गटाने आमचीच खरी शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्हही आमचंच, असा दावा ठोकायला सुरुवात केली आहे. हा वाद अद्यापही सर्वोच्च न्यायालयमध्ये प्रलंबित आहे.

शिंदेंनी केलेल्या बंडानंतर सेनेची मोठी हानी झाली आहे. यामुळे 'मातोश्री'वर ओढावलेल्या या नाजूक परिस्थितीत आणि संकटात राऊत मात्र उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढताना दिसले. मात्र त्यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांवर ही जबाबदारी आली. मात्र शाब्दिक हल्ल्याची जी धार राऊतांकडे होती. ती आज घडीला दिसत नाही. यामुळे शिवसेनेचे नेते आणि खुद्द उद्धव ठाकरेंना राऊतांची आठवण नक्की येत असणार, हे खरं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT