शिवसेनेची मुहुर्तमेढ मुंबईत रोवली गेली. मुंबईनंतर ठाण्यात, कोकणात आणि पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रसार झाला. गाव तेथे शाखा स्थापन झाल्या. जसे शिवसेनेला मुंबईने मोठे नेते दिले तसे ठाण्यानेही दिले. त्यापैकी एक होते सतीश प्रधान. ठाणे शहरातीलच नव्हे तर तत्कालीन ठाणे जिल्ह्यात प्रधान यांचा दबदबा होता. ठाणे शहराचे नगराध्यक्ष, महापौर खासदार तर ते होतेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते शिवसेनेचे Shivsena नेते होते.
त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. मातोश्रीवर त्यांचे वजनही होते. आज ठाणे Thane शहराचा जो चेहरा तयार झाला आहे, त्यात प्रधान यांचाही मोठा वाटा आहे. हे शहर सुंदर करण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर राहिले. ठाण्याचे महापौरापेक्षा ते पक्षाचे नेते म्हणून महाराष्ट्राला अधिक परिचित होते. Leaders who cultivated Shivsena in Thane Satish Pradhan Anand Dighe Eknath Shinde
शिवसेनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात ते नेहमीच आघाडीवर राहिले. पण राजकारणात चांगले दिवस कायम राहात नसतात. ‘गुड बुक’मध्ये असलेले नेते एकेदिवशी ‘बॅड’ होऊन जातात. पक्षांना त्यांचे महत्व वाटेनासे होते. त्यांचा उपद्रव वाटू लागतो. हे चित्र शिवसेनेत नेहमीच पाहाण्यास मिळाले.
वास्तविक प्रधान हे तसे हाडाचे शिवसैनिक होते. बाळासाहेबांवर त्यांची निष्ठा होती. पक्षाचे जे काही मेळावे होत मग ते शिवाजी पार्क असेल किंवा महाराष्ट्रातील कोणतीही सभा व्यासपीठावर प्रधान आधी दिसायचेच. त्यांचे भाषणंही रंगायची. कार्यकर्त्यांना खिळवून ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. आपली वेगळी ओळख पक्षात म्हणून ते निर्माण करू शकले.
त्यांची पक्षातील घौडदौड सुरूच होती. त्यांचे समकालीन नेते म्हणजे मो.दा.जोशी, साबीरभाई शेख, गणेश नाईक, अनंत तऱ्हे आणि आनंद दिघे. या सर्व नेत्यांनाही घडविण्यात किंवा मोठे करण्यात प्रधान यांची भूमिकाही राहिली आहे.
हे देखिल वाचा-
आनंद दिघे यांनी राजकारणाची सुरूवात मुळी सतीश प्रधान यांचे बोट धरून केली. पुढे दिघे यांनी आपल्या गुरूला मागे टाकले. दिघे आणि प्रधान यांचे पटेनासे झाले. प्रधान यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले. एका महापौर निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर प्रधान यांचे जे निकटवर्ती होते भास्कर पुसाळकर वगैरे मंडळींना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘गद्दारांना माफी नाही’, असे विधान त्यावेळी दिघे यांनी केले.
पुढे श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. दिघेंना तुरूंगात जावे लागले. त्याच वेळी नेमकी प्रधान यांची पीछेहाट झाली तर दिघे प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले. पुढे आनंद दिघे म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे समीकरणच होऊन बसले. शिवसेनेला ठाण्याने काय दिले असे जर कोणी म्हटले तर असे म्हणावे लागेल की पहिले सतीश प्रधान, दुसरे आनंद दिघे आणि तिसरे एकनाथ शिंदे.
म्हणून इतर नेत्यांचे महत्त्व कमी होते असे म्हणण्याचे कारण नाही. येथे महत्त्वाची गोष्ट आहे की शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री बनले आणि पक्षप्रमुखही बनले ते सतीश प्रधान हयात असताना. त्यांनी असे स्वप्न कधीही पाहिले नसेल. शिवसेनेचा जेव्हा जेव्हा सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये ठाणे आणि येथील नेत्यांचा उल्लेख हा करावा लागेल.
प्रधान तसे पक्षात वरिष्ठ तर आनंद दिघे कनिष्ठ होते. शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी नेहमीच दिघे यांना गुरू मानले. त्यांचा शब्दही कधी खाली पडू दिला नाही. या नेत्यांमधील एक असलेले प्रधान गेल्याने एक तारा आता निखळला आहे. शिंदे यांनी तर प्रधान आणि दिघे या दोघांची कारकीर्द जवळून पाहिली आहे.
हे सर्व येथे सांगण्याचे कारण असे आहे की प्रधान, दिघे असो की शिंदे या सर्वांनी शिवसेना मोठी केली. ठाणे हा बालेकिल्ला केला. या बालेकिल्ल्याचा कधी बुरूजही ढासळू दिला नाही. प्रधान पक्षापासूनही दूर गेले होते. पण त्यांचे योगदान विसरता येणार नाही.
गेल्या ५९ वर्षांत एक प्रति शिवसेना होऊन गेली पण तिचा इतका गाजावाजा झाला नाही. आज दोन शिवसेना आहेत. दोन पक्षप्रमुख आहेत. एक भाजप विरोधात लढत आहे तर दुसरी शिवसेना त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी आहे. दोन्ही शिवसेना भविष्यात एकत्र येतील का हे आज सांगता येणार नाही.
मात्र दोन्ही पक्षाची आकडेवारी पाहीली तर आजही शिवसेनेची राज्यात ताकद असल्याचे दिसून येते. ही ताकद आणखी कशी वाढवायची हे दोन्ही पक्ष प्रमुखांना ठरवावे लागेल. राजकारण बदलत आहे. नवे कार्यकर्ते घडवण्याचे आव्हानही असणार आहे. शिवसेनेची चौथी पिढीचे व्हिजन कसे असेल आणखी पाच वर्षांनी पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी पक्ष बांधणीच महत्त्वाची ठरणार आहे आणि हेच खरे आव्हान आहे. नाही तर नेते उदंड आणि कार्यकर्त्यांची वानवा असे होऊ नये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.