devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar sarkarnama
विशेष

Vidhan Parishad Election News : मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडी;कोणाचे आमदार फुटणार?

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आगामी काळात होऊ घातलेल्या आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेले फोडाफोडीचे राजकारण थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.

त्यातच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता असून त्यामुळे या फोडाफोडीचा फटका सर्वच पक्षांना बसणार आहे. विधानपरिषदेच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांना फोडाफोडीचा धोका असून यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडू शकतो.

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीत उत्साह आहे. येत्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या संपर्कात सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार असल्याची चर्चा जोरात आहे. या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे पक्ष त्यांच्या संपर्कात असलेले आमदार एक्स्पोज करणार का ? याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा एकदा फोडाफोडीची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडे येणाऱ्यांचा ओढा वाढलेला दिसत आहे. सद्यपरिस्थितीत शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत व ठाकरे गटासोबत किती आमदार आहेत याबाबत संभ्रम आहे.

त्यासोबतच पक्ष सोडून येण्याच्या तयारीत असलेली मंडळी आता लगेचच येण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे सत्ताधारी पक्षासोबत राहून जेवढी कामे करायची आहेत.ते कामे पूर्ण करून घेतील अन् येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ते ज्या पक्षासोबत जायचे त्यांच्यासोबत जातील,असे वाटते.

त्यामुळे आताच या आमदारांना सोबत घेऊन एक्स्पोज करायचे की नाही ? याबाबतचा राजकीय निर्णय या पक्षांना घ्यावा लागणार आहे.या सगळ्या फोडाफोडीमध्ये विरोधी पक्षाचा उमेदवार पडला तर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर एक महाविकास आघाडीला (MVA) आलेला मोमेंटम कुठंतरी डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण कोणाचे आमदार फोडणार? याबाबत उत्सुकता आहे.

विरोधकांनी येत्या काळात जर एक्स्पोज होण्याचे ठरवले अन सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पाडला तर सत्ताधारी मंडळींसाठी लोकसभा निवडणुकीनंतर आणखी एक नामुष्की असणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक झाली तर दोन्ही पक्षांसाठी ही रिस्कच असणार आहे.

या निवडणुकीत विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा आहे. काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत तर शरद पवार यांच्याकडे 10 तर उद्धव ठाकरे गटाकडे असणारे 15 संख्याबळ पाहता तीन उमेदवार निवडून येईल एवढे संख्याबळ आहे. ऐनवेळी फोडाफोडी झाली तर त्यांना फटका बसणार आहे.

शरद पवार गटाने यापूर्वीच शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचा उर्वरित कोटा व शरद पवार गटाची मते जयंत पाटील यांच्या पारड्यात पडणार आहेत तर ठाकरे गटाच्या मतांवर मिलिंद नार्वेकर यांना निवडून यावे लागणार आहे. ठाकरे गटाकडे सध्या 15 आमदार आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांना छोटे पक्ष व अपक्ष अशी सात ते आठ मतांची जोडणी करावी लागणार आहे. तरच त्यांना या निवडणुकीत विजय मिळवणे शक्य होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) चंद्रकांत हंडोरे काँग्रेसकडे पुरेसे मते असूनही पराभूत झाले होते. त्यामुळे ते यावेळेस कुठलीही रिस्क घेतील असे वाटत नाही. काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना ते पूर्ण कोटा देऊन उर्वरित मते जयंत पाटील यांना देतील. त्याशिवाय दुसऱ्या पसंतीचे ते मते जयंत पाटील अथवा मिलिंद नार्वेकर यांना देतील, असे वाटते.

दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील भाजपने पाच उमेदवार जाहीर केले तर अजित पवार गटाने दोन तर शिंदे गटाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत.त्यामुळे सध्या तरी यापैकी कोणी माघार घेईल, असे वाटत नाही. अजित पवार गटाकडे संख्याबळ कमी आहे. मात्र, ते त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा करतात. त्याशिवाय काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा ते करतात. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे मोठा घोडेबाजार रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात कोण माघार घेणार का ? दोन वर्षांपूर्वीप्रमाणे या निवडणुकीत पुन्हा एकदा फोडाफोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT