Vasudev Kale-Kanchan Kul- Harshvardhan Patil
Vasudev Kale-Kanchan Kul- Harshvardhan Patil Sarkarnama
विशेष

बारामतीत भाजप कोणाला मैदानात उतरवणार? हर्षवर्धन पाटील, काळे की कांचन कुल?

मिलिंद संगई

बारामती : बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघ जिंकायचाच, या दृष्टीने भाजपने (BJP) तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यावर सोपवून भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनेक लाटांमध्येही पवारांनी (Pawar) बारामतीचा गड कायम राखला आहे, त्यामुळे तो जिंकणे भाजपला तेवढेसे सोपे नाही. मुळात भाजप नेतृत्वाशी पवार कुटुंबीयांचे असलेले संबंध पाहता उमेदवाराला किती ताकद मिळते, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. प्रत्येक वेळी नवा उमेदवार, संघटनात्मक पातळीवर ताकद नसणे, बारामती विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य न तुटणे, ही भाजपच्या अपयशाची प्रमुख कारणे आहेत. मात्र, तोडीचा उमेदवार दिल्यास बारामतीची लढतही तुल्यबळ होऊ शकते. सध्या इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांपासून (Harshvardhan Patil) दौंडच्या कांचन कुल (Kanchan Kul), वासुदेव काळेंपर्यंत (Vasudev Kale) अनेकांची नावे चर्चेत आहेत. (Who will BJP nominate from Baramati?... Harshvardhan Patil, Vasudev Kale or Kanchan Kul?)

लोकसभेच्या निवडणुकांना दोन वर्षांचा अवकाश असतानाच भाजपने महाराष्ट्रात मिशन-४५ सुरू केले आहे. त्या अंतर्गत बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनीही लागलीच कामाला सुरुवात केली असून त्या स्वतः तीन दिवस मतदारसंघात तळ ठोकणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हर्षवर्धन पाटील, कांचन कुल, वासुदेव काळे यांची नावे चर्चेत आली आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर १९८४ ते १९८९ या काळात शरद पवार, १९८९ ते १९९१ या दोन वर्षांच्या काळात शंकरराव पाटील, १९९१ पासून ते थेट २००९ पर्यंत शरद पवार हेच बारामतीचे खासदार म्हणून निवडून गेले होते. २००९ पासून ते आजतागायत सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा बारामतीच्या खासदार राहिलेल्या आहेत. दुसरीकडे २००४ मध्ये पृथ्वीराज जाचक यांना भाजपने पाठिंबा देऊ केला होता. त्यानंतर २००९ मध्ये कांता नलावडे या भाजपच्या उमेदवार होत्या, तर २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना लढत देण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा २०१९ मध्ये कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली होती.

बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर व खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सध्या बारामतीमध्ये अजित पवार, इंदापूरमध्ये दत्तात्रेय भरणे हे दोन राष्ट्रवादीचे, पुरंदरमध्ये संजय जगताप व भोरमध्ये संग्राम थोपटे हे दोन कॉंग्रेसचे, तर दौंड व खडकवासला येथे राहुल कुल व भीमराव तापकीर हे भाजपचे दोन आमदार आहेत.

सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर, भोर व पुरंदरमध्ये मताधिक्य मिळते. खडकवासला मतदारसंघात त्या पिछाडीवर असतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. बारामतीत मिळणारे मताधिक्य हे सुप्रिया सुळे यांच्या विजयात सर्वात जास्त महत्वाचे ठरते. इंदापूरमध्ये विधानसभेला काहीही झाले, तर लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळते, असा आजवरचा अनुभव आहे. भोरमध्येही त्यांना मताधिक्य मिळते, त्यामुळे त्यांचा विजय सुकर होतो.

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याची आता उत्सुकता आहे. भाजपमधून अनेक नावांबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षात नेमकी कोणाला संधी मिळणार, हे गुलदस्त्यात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार असणार हे निश्चित असताना भाजपकडे उमेदवाराच्या नावाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय होत नाही, हेही भाजपच्या अपयशाचे एक प्रमुख कारण म्हणावे लागेल. कांता नलावडे व कांचन कुलांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिल्यानंतर त्यांना मतदारसंघापर्यंत पोहोचताही आले नव्हते. त्याचा फटका त्यांना बसला होता. आज हर्षवर्धन पाटील यांच्यापासून वासुदेव काळे यांच्यापर्यंत अनेक नावांची भाजपमधून चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात दिल्लीतून या जागेबाबत काय निर्णय होतो, याचीच उत्सुकता आहे.

निवडणुकीपुरते नेत्यांचे होणारे दौरे आणि नंतर मतदारसंघाकडे फारसे लक्ष न देणे, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे पवार कुटुंबीयांशी असलेले सलोख्याचे संबंध, भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला फारशी ताकद न देणे, संघटनात्मक पातळीवर अनुत्साह, अशा अनेक बाबींचा भाजपच्या अपयशाशी संबंध जोडता येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येणार असल्या तरी त्यांना या भागाची फारशी माहिती नाही, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनेच त्यांना दौरा करावा लागणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघात ओळखीचा असा चेहरा भाजपला पुढे आणावा लागेल, त्याला ताकद द्यावी लागेल, ऐंशीच्या दशकापासून बारामतीवर असलेला पवार कुटुंबाचा प्रभाव एका झटक्यात कमी करणे, हे आव्हानात्मक काम आहे, याची जाणीव भाजप नेतृत्वालाही आहे, त्या मुळेच त्यांनी या मतदारसंघावर काम करण्याची तयारी सुरु केली आहे. अजित पवारांसारखे सक्षम नेतृत्व राष्ट्रवादीकडे असल्याने व लोकसभा मतदारसंघावरही त्यांची मजबूत पकड असल्याने त्या पातळीवरही भाजप कशी रणनीती आखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

देशात किती लाटा आल्या आणि गेल्या; पण बारामती विधानसभा असो किंवा लोकसभा मतदारसंघात काही परिवर्तन झालेले नाही. भाजपने आता या परिवर्तनाचा ठाम निश्चय केलेला दिसत असून संघटनात्मक पातळीवर आता त्याची तयारी सुरु झाली आहे. आगामी काळात भाजप बारामतीबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT