Chandrakant Patil-Ajit Pawar
Chandrakant Patil-Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

चंद्रकांत पाटलांनी पुरावे द्यावेत; उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : हेलिकॉप्टरमधून मी जमिनी बघत फिरतो, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) करतात. पण, हेलिकॉप्टरने फिरायला परवानगी घ्यावी लागते, किती प्रवासी असतात, त्यांची माहिती द्यावी लागते. जिल्ह्यातील कलेक्टरकडे त्याबाबतचा रेकॉर्ड असते, त्यांनी सांगावं की मी कधी असं खास हेलिकॉप्टर घेऊन गेलो होतो. उचलली जीभ लावली टाळ्याला, असे त्यांनी करू नये, असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. (Ajit Pawar's reply to Chandrakant Patil's allegation)

मुंबईतील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. मी हेलिकॉप्टरमधून जमिनी बघत असतो, असा आरोप ते करतायत, त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. ते त्यांनी बंद करावे.

लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण, हे किती गांभीर्याने घ्यावे, हे जनता ठरवेल. मी माझे काम करत आहे. मी पुण्यात काम करतांना कोणत्या पक्षाचा विभागाचा हे न पाहता प्रशांची सोडवणूक करतो. कोरोनाबाबत टास्कफोर्सशी चर्चा करूनच आम्ही पुण्याबाबत निर्णय घेतो, असे सांगून पवार म्हणाले की, इतर पक्षात कोणी जाऊ नये, यासाठी आपल्याला इतर पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घ्यावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले की, त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. राज्यात दाट लोकवस्तीची शहरे आहेत. धारावीत कोरोनाचे संकट आटोक्यात आणणे आव्हानात्मक काम होते. तरीही विविध मार्गाने आम्ही कोरानाचे सावट आटोक्यात आणले. मात्र, काही जण राजकीय भूमिकेतून बोलतात.

कोरोनाच्या काळात मजूर गावाकडे जात होते, त्यात गर्भवती महिला, लहान मुलेही चालत जात होती. आम्ही माणुसकीच्या नात्यातून मदत केली. मजुरांची आपण व्यवस्था केली होती, पण त्यांना त्यांच्या गावी जायचे होते, त्यामुळे त्यांची व्यवस्था करावी लागली. गुजरात आणि महाराष्ट्रातून किती रेल्वे सुटल्या, याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. जिथे गरज होती, तिथे एसटी बसही सोडल्या हेात्या. रेल्वे ज्या सुटल्या, त्या गुजरातमधून किती सुटल्या. दुसऱ्या राज्यातून किती सुटल्या, तेही बघावे. त्यांच्या पक्षाच्या लोकांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचे रेल्वे सोडल्याबद्दल आभार का मानले, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.

मंत्रीमंडळ बैठकीत नागपूर अधिवेशनाचा विषय आला होता. राज्यपालांचे अभिभाषण होत असते, त्यासाठी तिथे मोठं सभागृह नाही. हिवाळी अधिवेशन आपण ५ दिवसात संपवले आणि त्यानंतरही ५० ते ६० आमदार पॉझिटिव्ह आले होते. अनेक अधिकारीही पॉझिटिव्ह आले होते, असेही त्यांनी नागपूर अधिवेशनाबाबत नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT