Veer Savarkar Sarkarnama
विश्लेषण

Veer Savarkar : भाजप, शिवसेना, मनसेला स्वातंत्र्यवीर राजकारणासाठीच हवेत; पण त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन नकोय...

अय्यूब कादरी

Maharashtra Political News : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर मात्र वाद निर्माण झाला होता, तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राहुल यांच्यावर विखारी टीका केली होती. सावरकरांवरून राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे हे सर्वजण मात्र सावरकर यांना आपल्या सोयीनेच स्वीकारतात.

पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेकांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले होते, राहुल गांधी यांची सावरकरांवरील टीका अनाठायी होती, असे अनेकांचे मत होते. भाजपसह शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे यांनी राहुल यांच्यावर हल्लोबोल केला होता. राहुल गांधी यांचा मेंदू गुळगुळीत असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना जशास तसे उत्तर दिले होते. "दुसऱ्यांची लायकी आणि मेंदू काढणारे मेंदू नसलेले राज ठाकरे आज आम्हाला दिसून आले," असे ते म्हणाले होते. राहुल यांचे मुद्दे खोडून काढण्याऐवजी या राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती, असे दावे केले जातात, त्याचे पुरावेही दिले जातात. दुसऱ्या बाजूकडून त्याचा जोरदार प्रतिवाद करत हे दावे खोडून काढले जातात. सावरकरांवर टीका केली की पेटून उठणारे त्यांच्या वैज्ञानिक विचारांचा स्वीकार करत नाहीत, हेही सत्य आहे.

विज्ञाननिष्ठा वाढवणे हे बुद्धिवाद्यांचे कर्तव्य आहे, त्यांचा धर्म आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत. राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या एकाही नेत्याने समाजात विज्ञाननिष्ठा वाढावी म्हणून प्रयत्न केलेले नाहीत. विश्वातील सत्य हे केवळ विज्ञानच शोधू शकते, यावर सावरकरांचा दृढ विश्वास होता. विज्ञानाच्या संशोधक ग्रंथांनाच त्यांनी धर्मग्रंथ मानले होते.

राष्ट्राची इमारत धर्मग्रंथांच्या नव्हे तर विज्ञानाच्या पायावर उभी राहावी, असे सावरकर यांचे मत होते. हे विचार सावरकरांना विरोध करणारेच नव्हे, तर त्यांच्या समर्थकांनीही स्वीकारलेले दिसत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गायीवरचे विचार तर भाजप नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजय घालणारे आहेत. महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. गोव्यात भाजपचे सरकार आहे, मात्र तिकडे गोवंशहत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, 'गाय ही माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे, तो केवळ एक उपयुक्त पशू आहे. गायीची पूजा हवी तर गाढवाने करावी; पण तसे करण्याचा गाढवपणा माणसाने करू नये.' सावरकरांचे हे विचार भाजप नेते मान्य करतील का ? राजकारणासाठी उपयुक्त तितकेच सावरकर भाजप, शिवसेना आणि त्यांच्या समर्थकांनाही हवे असतात.

ज्याला जे आवडते त्याने ते खावे, असे गोमांस भक्षणावर त्यांचे विचार होते. मात्र, केवळ हिंदूंना डिवचायचे म्हणून कुणी गोहत्या करत असेल तर सावरकरांचा त्याला तीव्र विरोध होता. हिंदू धर्मातील वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित करणारे सावरकर सत्यनारायण पूजेवर टीका करतात. 'संकटातून वाचवतो म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर त्यानेच संकटात ढकलले म्हणून त्याची यथेच्छ शोभा करायला नको का ?,' असा खडा सवालही ते उपस्थित करतात.

सावरकर जसे कट्टर हिंदुत्ववादी होते, तितकेच ते विज्ञाननिष्ठ होते. हिंदूंना स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर त्यांनी ईश्वरवाद आणि दैववादाचा त्याग करून विज्ञानवादाची कास धरावी, असे ते म्हणायचे. त्यांचे समर्थक किंवा विरोधक दोघांनाही त्यांचे हे विचार मान्य होत नाहीत.

सावरकरांचे विरोधकही त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारांचा पुरस्कार करताना दिसत नाहीत आणि समर्थकही सावरकरांना सोयीनेच वापर करतात. राहुल गांधी यांच्यावरील टीकेचेही असेच आहे. त्यांच्यावर टीका करणारे भाजप, शिवसेनेचे नेते आणि मनसेचे राज ठाकरे यांना स्वातंत्र्यवीरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन मान्य आहे का ?, गायीबद्दलचे त्यांचे विचार मान्य आहेत का ?, हे त्यांनी स्वतःच समोर येऊन स्पष्ट करायला हवे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT