Pramod Mahajan, poonam Mahajan, uddhav thackeray
Pramod Mahajan, poonam Mahajan, uddhav thackeray  Sarakarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray Vs BJP : मतदानाच्या काही तास आधी ठाकरेंचं मुंबईत 'मास्टर कार्ड'; पूनम महाजनांवरून भाजप 'बॅकफूट'वर ?

अय्यूब कादरी

Political News : दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन-राव यांना भविष्यात पक्षाची मोठी संघटनात्मक जबाबदारी मिळू शकते, असे संकेत पक्षाची राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढल्यामुळे तावडे यांना हे स्पष्टीकरण द्यावे लागले आहे, असे स्पष्टीकरण देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला भाग पाडले आहे.

भाजपचे (Bjp) दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांचा भाजपच्या विस्तारात मोठा वाटा आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती त्यांच्याच पुढाकाराने आकाराला आली होती. त्यामुळे तर त्यांना युतीचे शिल्पकार म्हटले जाते.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यात मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी प्रमोद महाजन यांची आठवण काढून भाजपला मोक्याच्या क्षणी कोंडीत पकडले आहे. (Bjp News)

लोकसभा निवडणुकीचा प्रचार कोणत्या मुद्द्यावर, कोणत्या दिशेने जाणार, हे गेल्या दोन निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच ठरवत असत. मोदी एखादा मुद्दा उपस्थित करायचे आणि विरोधी पक्ष त्याच्यावर टीका-टिपण्णी करत राहायचे. त्यामुळे विरोधकांची दमछाक होत असे आणि निवडणुकीत 'ड्रायव्हिंग सीट'वर कायम भाजप बसलेला असायचा. या निवडणुकीत पहिल्यांदाच हे चित्र बदलल्याचे दिसत आहे.

आता विरोधक नॅरेटिव्ह सेट करत आहेत आणि पंतप्रधान मोदी, भाजपचे अन्य नेते त्याला उत्तरे देत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा, हिंदू-मुस्लिम आदी त्याची काही उदाहरणे आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षही भाजपला आपल्या 'पीच'वर येऊन खेळायला भाग पाडत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

प्रमोद महाजन यांच्या कन्या भाजपमध्ये सक्रिय आहेत. युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये त्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. भाजपमध्ये धक्कातंत्र वापरण्याची एक प्रकारची 'क्रेझ' आहे. त्यानुसार किंवा आणखी काही कारणाने या निवडणुकीत पूनम महाजन यांची उमेदवारी कापण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पूनम महाजन यांनी तो निर्णय अत्यंत संयमाने, शांतपणे स्वीकारला. दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळे मी पक्षाची आभारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अशी पक्षशिस्त सध्या भाजपमध्येच पाहायला मिळते. अन्य पक्षात असे झाले असते तर संबंधित नेत्याने थयथयाट केला असता.

पूनम महाजन यांची उमेदवारी कापल्याचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी ऐन मोक्याच्या वेळी भाजपला डिवचले. यापूर्वी कल्याण मतदारसंघात झालेल्या सभेतही ठाकरे यांनी पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपचा विस्तार करण्यात प्रमोद महाजन यांचा मोठा वाटा होता. असे असतानाही भाजपने त्यांच्या कन्येचेच तिकीट कापले आहे, असे ते म्हणाले होते.

मुंबईतील 17 मे रोजीच्या सभेतही ठाकरे यांनी अशीच टीका केली. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी राजकीय नेते विविध प्रकारच्या चाली खेळत असतात. तशीच खेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खेळली. त्याच दिवशी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सभेसाठी उपस्थित होते. प्रमोद महाजन हयात असते तर ते पंतप्रधान झाले असते आणि नरेंद्र मोदी यांचा उदय झाला नसता, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपने पूनम महाजन यांना डावलून अड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचे आव्हान आहे. या मतदारसंघातील शिवसेनेची (ठाकरे गट) मते काँग्रेस उमेदवाराकडे वळती व्हावीत, यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोर लावला आहे. त्यातच पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा मुद्दा पुढे करून त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपमध्ये भूमिपुत्रांऐवजी बाहेरून आलेल्यांना संधी दिली जाते, असाही संदेश ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना तातडीने समोर यावे लागले. या प्रकरणातही भाजपला उद्धव ठाकरे यांच्या 'पीच'वर जाऊन खेळावे लागले आहे.

पूनम महाजन यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपवण्याचा विचार पक्षाने केला असावा, असे तावडे म्हणाले आहेत. पक्षाने 2019 मध्ये मलाही उमेदवारी नाकारली होती, असेही ते म्हणाले आहेत. याचा अर्थ असा की पूनम महाजन यांच्यावर भविष्यात पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक जबाबदारी येऊ शकते. पंकजा मुंडे या सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत.

भविष्यात पूनम महाजन यांच्यावरही पंकजा यांच्यासारखी संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तावडे याबाबत ठोस बोललेले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी डिवचले नसते तर कदाचित भाजपकडून पूनम महाजन यांच्याबाबत काहीच माहिती दिली जाण्याची शक्यता नव्हती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल, मात्र प्रचारात आणि नॅरेटिव्ह सेट करण्यात यावेळी भाजपची दमछाक होत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये विरोधकांना आपल्या तालावर नाचायला लावणारा भाजप या निवडणुकीत मात्र विरोधकांच्या तालावर नाचत असल्याचे दिसत आहे

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT