Maharashtra News : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं तीन मोठ्या पक्षाचं बहुमतातलं महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापाठीमागं एकनाथ शिंदेंचं बंड कारणीभूत ठरलं. पण त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना जो नाराजी, कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप, निधीवाटपांत भेदभाव असे एक ना अनेक आरोप केले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये घडतेय की काय अशी साशंकता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना हे बंड किंवा राजकीय चाली खेळण्यात अपयश आलं तर महायुतीत देवेंद्र फडणवीसांसारखा (Devendra Fadnavis) एक चाणाक्ष आणि मुत्सद्दी राजकारणी उभा आहे. त्यामुळे त्यांनी एकीकडे महायुतीतले शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलं नाराजी, कुरघोडी,आरोप -प्रत्यारोपांचं तापलेलं राजकारण एका क्षणार्धात समृध्दी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यातील स्टेअरिंगच्या मास्टरस्ट्रोकनं संपवून टाकलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार पुन्हा प्रचंड बहुमतासर सत्तेत आलं आहे. पण या सरकारला विरोधी पक्षांकडून कुठलाही धक्का नसला तरी अंतर्गत कलहाच्या वादळाची धास्ती कायम असणार आहे. यामुळे हे दोन तलवारी एकाच म्यानात सांभाळणे फडणवीसांसाठी कसोटीचा काळ ठरणार आहे.
महायुतीत (Mahayuti) भाजप जरी सर्वाधिक जागांसह मोठा भाऊ म्हणून मिरवत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही आपआपल्या पक्षविस्तारासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. तसेच ही महायुती विधानसभेत यशस्वी ठरली, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आत्तापासूनच स्वबळाची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.
एकीकडे महायुतीत पहिल्यांदा खातेवाटप,मंत्रिपदं,पालकमंत्रिपदांवरुन नाराजीनाट्य रंगल्याचं लपून राहिलं नव्हतं. पालकमंत्रिपदाचा घोळ तर सरकारला सत्तेत येऊन सहा महिने उलटले असले तरी सोडवता आलेला नाही. रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणचे पालकमंत्रिपदाचा मुद्दा चार दोन दिवसांनी डोकं वर काढतोच. यातच आधी दबक्या आवाजात बोलली जाणारी निधीवाटपात मिळत असलेली सापत्नपणाची वागणूक आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समोरच चर्चेला आणली.
महायुतीत अजित पवार नको ही भूमिका आजपर्यंत वारंवार शिवसेनेच्या नेत्यांनी उघड उघड बोलून दाखवली आहे. आता त्याची धग थेट रायगडपर्यंत पोहोचली. सुनील तटकरेंना असलेला टोकाचा विरोध अजितदादांवरही येऊन ठेपला.त्यामुळे महायुतीतली शांतता पुन्हा एकदा दुभंगली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार या प्रमुख नेत्यांनी सरकार आणि महायुती मजबूत असल्याचं अनेकदा ठणकावून सांगितलं आहे.पण त्यांच्याकडून आपआपले मंत्री, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवर घालण्यासाठी त्या त्या पातळीवर प्रयत्न न केल्याचे दिसून आलेले नाही. या नेत्यांच्या शांततेनं उलट या वादाला आणखीच हवा मिळाल्याचे दिसून येतं.
समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत एकाच गाडीतून प्रवास केला. सुरुवातीला एकनाथ शिंदेनी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं. त्यावेळी शिंदेंच्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस होते. तर अजित पवार मागच्या सीटवर बसले होते. समृद्धी महामार्गावरून शिंदेनी काही वेळ गाडी चालवली. त्यानंतर गाडीचं स्टेअरिंग मुख्यमंत्री फडणवीसांनी हाती घेतलं.
फडणवीसांनी या एकत्रित प्रवासातून त्या त्या पक्षातील युतीत एकमेकांचे मन दुखावतील असे वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांना जो काही मेसेज द्यायचा होता तो अगदी योग्य पध्दतीनं दिला. समृध्दी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण सोहळ्यावेळी त्यांनी‘ आम्ही तिघेही एकत्रित गाडी चालवतोय, काही काळजी करू नका असं त्यांनी सांगितलं.
तसेच आम्ही तीन शिफ्टचे ड्रायव्हर आहोत. आमचं ड्रायव्हिंग चांगलं आहे. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे. आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवतोय’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर अर्धी अर्धी चालवायची अगोदरच ठरलेलं असल्याची मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली.
खरंतर प्रत्येक वादावर सोल्युशन काढण्यात देवेंद्र फडणवीसांचा हातखंडा आहे.ते प्रत्येेत गोष्टी योग्य पध्दतीनं हाताळतात. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांसोबत दीर्घकाळ काम करण्याचा त्यांचा अनुभवही तसा दांडगा आहे. आता अडचण येतेय ती स्थानिक पातळीवरच्या नेते, पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या मानसिकता, इगोची. भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी असो वा शिंदेंची शिवसेना या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतले तडे जाणार नाही हे जरी खरं असलं तरी युतीतल्या एकोप्याला धोका पोहचू शकतो. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील प्रत्येक पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.