Sharad Pawar, Rahul Gandhi Sarkarnama
विश्लेषण

Congress and NCP Sharad Pawar News : ...अन् काँग्रेस,शरद पवार यांच्या पक्षाला आले 'अच्छे दिन'!

अय्यूब कादरी

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील हवा बदलायला सुरुवात झाली. गेल्या पाच वर्षांत झालेल्या पक्षफुटींचा फटका भाजप आणि महायुतीला बसणार किंवा नाही, याबाबत संभ्रम होता. त्यामुळे अनेक नेते काठावर होते. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर हा संभ्रम दूर झाला आणि काठावरील नेत्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे रिघ लागली.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे येणाऱ्या अर्जांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसकडे राज्यभरातून अडीच हजार अर्ज आले आहेत. यात विदर्भ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यातील इच्छुकांची संख्या मोठी आहे.

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकासारखाच 'स्ट्राइक रेट' विधानसभा निवडणुकीतही कायम राखण्याचा चंग बांधला आहे. एकट्या पुणे शहरातील आठ मतदारसंघांसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडे 41 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यानिमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) 13, राष्ट्रवादी काँग्रेसला 8 आणि शिवसेनेला 9, अशा महाविकास आघाडीला एकूण 30 जागा मिळाल्या. सांगली मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. ते विजयी झाले आणि त्यांनी काँग्रेससोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसच्या जागांची संख्या 14 आणि महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांची संख्या 31 झाली.

राज्यात 'मिशन 45' ची काही वर्षांपासून तयारी करणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वीच्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाला 7 तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली.

महाविकास आघाडीची ताकद किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यासाठी निवडणुकीपूर्वीचे राज्यातील राजकीय वातावरण आणि निवडणूक प्रचारादरम्यानचे चित्रही पाहावे लागेल. निवडणुकीच्या आधी महायुतीतील तिन्ही पक्षांनी हवा तयार केली होती. उद्धव ठाकरे यांचे 40 आमदार त्यांना सोडून गेले होते.

शरद पवार यांच्या पक्षालाही फुटीची लागण झाली आणि त्यांचेही 40 आमदार त्यांना सोडून गेले. काँग्रेसचे तर कशातच काही नाही अशी अवस्था होती. दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याने काँग्रेसचा हात सोडून भाजपचा आश्रय घेतला होता. याशिवायही काँग्रेसच्या अन्य काही बड्या नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महाविकास आघाडीला लोकसभेच्या 48 मतदारसंघांत उमेदवार मिळतील किंवा नाही, अशी शंका होती. महायुतीच्या नेत्यांकडून तसा प्रचारही सुरू करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल 18 जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या जोडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही प्रचाराचे मैदान गाजवत होते.

भाजपच्या 105 आमदारांच्या जोडीला शिंदे आणि अजितदादांचे प्रत्येकी 40 आमदार होते. महाविकास आघाडीकडे होते ते फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या तरुण नेत्यांची फळी. या सर्वांचे बळ आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास, याच्या बळावर महाविकास आघाडीने मैदान मारले. शरद पवार यांनी 10 उमेदवार उभे केले आणि 8 विजयी झाले. काँग्रेसने 17 जागा लढवून 13 जिंकल्या.

उद्धव ठाकरे यांचा 'स्ट्राइक रेट' तसा...

उद्धव ठाकरे यांचा 'स्ट्राइक रेट' तसा कमी म्हणावा लागेल, मात्र त्यांच्याकडे ना पक्ष होता, ना चिन्ह होते ना आमदार होते. अशीच स्थिती शरद पवारांचीही होती, पण त्यांनी जास्त जागांचा अट्टाहास न करता आपले उमेदवार हमखास निवडून येतील असेच मतदारसंघ घेतले. उद्धव ठाकरे यांना असे करणे शक्य झाले नाही.

महायुतीतील मोठा भाऊ बनण्याच्या नादात त्यांचा 'फोकस' चुकला आणि 21 जागा लढवून त्यांना फक्त 9 जिंकता आल्या. उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या 9 जागाही कमी आहेत, असे म्हणता येणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःला, आपल्या पक्षाला पुन्हा उभे केले आहे.

महाविकास आघाडीला मिळालेले यश, शरद पवार आणि काँग्रेसला मिळालेले यश पाहता या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची रांग लागली आहे. देशपातळीवर या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे पुनरुज्जीवन झाले आहे. त्यात महाराष्ट्राने महत्वाची भूमिका बजावली आहे. काँग्रेसला 2019 च्या निवडणुकीत केवळ एक जागा मिळाली होती, तर शिवसेना- भाजप युतीने 41 जागा जिंकल्या होत्या.

या निवडणुकीत महायुतीला 17 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे इच्छुक या दोन पक्षांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. वाढत असलेल्या इच्छुकांच्या संख्येमुळे महाविकास आघाडीबाबत वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT