Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Congress announcement: काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेने ठाकरेंना मोठा झटका! दलित, मुस्लिम मते दुरावणार का?

Maharashtra political analysis News: काँग्रेसने आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल चार वर्षानंतर वाजले आहे. त्यामुळे सध्या तयारीला वेग आला आहे. विशेषतः महायुती व महाविकास आघाडीचे काय होणार हा प्रश्न सर्वांना सतावत असतानाच बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर लगेचच काँग्रेसने आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे.

दीड वर्षापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक एकत्र लढत महविकास आघाडीने राज्यात यश मिळवले होते मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने बाजी मारली होती. त्यावेळी महाविकास आघाडीला मोठे यश मिळवता आले नव्हते. मात्र, आता महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसने (Congress) उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत 'एकला चलो'चा नारा दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत त्यामुळे दलित, मुस्लिम मते दुरावणार का? असा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे बीएमसी निवडणुकीचे समीकरण बदलणार असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे.

चार महिन्यापूर्वी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. तेव्हापासूनच काँग्रेसने ठाकरेपासून अंतर राखायला सुरुवात केली होती. मात्र, व्होटचोरीच्या मुद्द्यावर मनसेसह महाविकास आघाडीने एकत्र मोर्चा काढला. त्यामुळे पुन्हा मनसे ही महाविकास आघाडीत येईल याची चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे सर्व पक्ष भाजपविरोधात ऐकत येतील असे चित्र दिसत होते.

दोन दिवसापूर्वी बिहार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकच दिवसात चित्र बदलले आहे. काँग्रेसच्या मुंबईतील एकदिवसीय शिबिरात स्वबळाचा नारा दिला. एवढंच नाही तर मनसेच्या खळ्ळखट्याक स्टाईलमुळेच मनसेसोबत युती करणार नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तर ठाकरेंना सोडण्याचे वेगळंच कारण असल्याचा टोला ठाकरेसेनेने देखील लगावला आहे. दुसरीकडे मात्र अजूनही राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आघाडीबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. ठाकरे बंधूंकडून आघाडीचा प्रस्ताव आला नसल्याचे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमके काय सुरु आहे. हे समजून येत नाही.

महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह

मुंबईतील दलित आणि मुस्लिम मतदारांचा एक मोठा हिस्सा पारंपारिकपणे काँग्रेसकडे किंवा भाजप-विरोधी आघाडीकडे झुकलेला असतो. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता आहे. येत्या काळात काँग्रेस स्वबळावर लढल्यास, ही 'सेक्युलर' मते उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विभागली जाण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना होऊ शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडी एकसंध राहिल्यास भाजपला प्रभावीपणे आव्हान देता येईल, अशी या मतदारांची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या बाहेर पडण्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, ज्यामुळे या वर्गातील मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढू शकते.

परप्रांतिय मतदार दुरावण्याची भीती

येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचे चित्र लक्षात घेतले तर ठाकरेंमुळे परप्रांतिय मतदार दुरावण्याच्या भीतीमुळेच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, स्वबळ अजमावणारी काँग्रेस मुंबई महापालिकेत आपला प्रभाव दाखवणार की घसरणीचा पाढा कायम ठेवणार? याचीच उत्सुकता मात्र दुसरीकडे कायम आहे.

मुस्लिम, दलित मते ठरणार निर्णायक

मुस्लिम मतांमध्ये विभाजन झाल्यास, ज्या वॉर्डांमध्ये मुस्लिम मते निर्णायक असतात, तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अडचणीत येऊ शकतात. त्यासोबतच दलित मते आंबेडकरी गट, स्थानिक आघाड्या आणि काँग्रेसमध्ये विभागली गेल्यास, त्याचा परिणाम ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जागांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने घेतलेला स्वबळाचा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी मोठा राजकीय पेच निर्माण करणारा असून, त्यांना आता दलित-मुस्लिम मतदारांना थेट आपल्याकडे खेचण्यासाठी येत्या काळात अधिक आक्रमक आणि ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT