Ayodhya Ram Mandir Sarkarnama
विश्लेषण

Ayodhya Ram Mandir : सत्तेसाठी आज ना उद्या काँग्रेससह 'इंडिया'लाही म्हणावेच लागेल ‘सबके राम, जय श्रीराम’!

Sachin Deshpande

Pranpratistha Ceremony : अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून अनेक वाद सुरू आहेत. त्यातील एक वाद हा चार धर्मपीठांचे शंकराचार्य यांनी उपस्थित केला. अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा सनातन धर्माला अनुसरून नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरा वाद हा भाजपा आणि संघपरिवाराने हा सोहळा ‘हायजॅक’ केल्याचा आहे.

यामुळे इतर राजकीय पक्षांचे नेते या सोहळ्याला गैरहजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अयोध्येतील राम मंदिर हे एकशे दहा कोटींहून अधिक भारतीयांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा विषय आहे. त्यावरून निर्माण झालेले हे नकारात्मक सूर ‘राम का नाम बदनाम न करो’ असे विरोधकांना सांगणारे आहे.

महात्मा गांधी यांनीदेखील अंतिम क्षणी ‘हे राम’ म्हणत रामाविषयीची त्यांची आस्था प्रगट केली होती. अशी सर्व पार्श्वभूमी असताना देशातील कोट्यवधी लोकांच्या जनभावना प्रभु श्रीरामात गुंतल्याने विरोधकांनादेखील अयोध्येला भेट देत ‘ सबके राम, जय श्रीराम’ म्हणावे लागेल, अशी परिस्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राष्ट्रपती यांना का निमंत्रित केले नाही, हा पहिला मुद्दा उपस्थित केला गेला. राम मंदिर ट्रस्टने निश्चित केल्याप्रमाणे प्रमुख पाहुणे येणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्याचा अनेकांचा आरोप आहे. रामजन्मभूमी आंदोलनाचे शिल्पकार संघाचे प्रचारक आणि इतिहास संकलन समितीचे मोरोपंत पिंगळे, त्याचबरोबर सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा, दोन वेळा झालेली कारसेवा यात सर्वच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटना अग्रेसर होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशात सरसंघचालकांना बोलावले यात गैर काय? संघ उघड उघड म्हणत नसला तरी भाजपा हा संघाचा अविभाज्य भाग आहेच. भाजपाची केंद्रात सत्ता असताना पंतप्रधान, सरसंघचालक येणार ही वास्तविकता सर्वांना मान्य करत स्वीकारावी लागेल.

रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी यांनी यात्रेचे सारथी हे नरेंद्र मोदी होते. त्यांच्या हातून राममंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे, हे ईश्वरी कार्य असल्याचे सांगत या सोहळ्याला शुभेच्छा देत सर्व चर्चांना विराम दिला.

विविध धर्मपीठांचे चार शंकराचार्य यांनी अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा ही सनातन धर्माला अनुसरून नाही, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी राममंदिर उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला. त्यांचा बहिष्कार टाकणे, हा त्यांचा अधिकार आहे. पण मंदिर ट्रस्ट देखील सनातनी आहे, हे देखील लक्षात ठेवावे लागेल.

हे लक्षात ठेवताना त्यांनी देखील साधु, संत आणि महंतांसोबत चर्चा करुनच निर्णय घेतला असेल. शंकराचार्य यांच्या विरोधाला आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी इतिहासात तिरुपती मंदिर, मदुराई आणि तिरुवन्नामलाई मंदिराचे दाखले देत ते अर्धवट अवस्थेत असताना तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याचे सांगितले. त्यामुळे या वादावर तसा आपसुकच पडदा पडल्याचे चित्र आहे.

काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या पक्षाने राम मंदिर उभारणीसाठी स्वातंत्र्यानंतर लगेच पुढाकार घेतला असता तर, हा मुद्दाच कधी भाजपा राजकीय मुद्दा झाला नसता. दोन खासदार असलेला राजकीय पक्ष सत्तारुढ झाला नसता.

काँग्रेसच्या हातून हा राजकीय मुद्दा सुटला ही चूक काँग्रेसने मान्य करावी. त्यामुळेच भाजपाच्या या राजकीय दृष्ट्या यशस्वी मुद्द्याचे साक्षीदार न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे उद्घाटन सोहळ्याला जाणार नाहीत.

काँग्रेसचे स्थानिक नेते त्याच बरोबर उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी काँग्रेस पक्षाचे झेंडे खांद्यावर घेत अयोध्येतील शरयु नदीत स्नान करत रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यामुळे आम्ही जाणार नाही, हा काँग्रेसचा देखावा स्पष्टपणे उघड झाला.

दुसरीकडे शरद पवार यांनी ते उद्घाटन सोहळ्यानंतर जाणार असल्याचे सांगत यावर पडदा टाकला. शरद पवारांनी एका पत्रकारपरिषदेत सर्वांनी आत्मसात करण्याचा विषय सांगितला, तो म्हणजे ‘धर्म ही वैयक्तिक आचरणाची बाब आहे.’ या एका वाक्यातच सर्व विषय पवारांनी संपविला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देशात धर्म सर्वोच्च झाल्यास स्वातंत्र्य राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली. त्यांची ही भीती राजकीय असू शकते. फारुख अब्दुला यांनी राम गीत गात रामाबद्दल असलेली श्रद्धा जाहीर केली. अरविंद केजरीवाल यांना देखील अयोध्येला जायचे आहे. केजरीवाल यांनी तर अधिक रेल्वे गाड्या अयोध्येसाठी सोडण्याची मागणी केली.

अयोध्येत रामजन्मभूमीत राम मंदिर निर्माण हा भाजपाचा ‘पॉलिटिकल अजेंडा’ होता. त्या आधारे त्यांनी जनतेला मते मागितली. पुढेही ते मागतील. त्यामुळे भाजपा तो सोहळा ‘हायजॅक’ निश्चितच करेल. हा ‘पॉलिटिकल अजेंडा’ पर्णत्वास जाताना साहजिकच त्याचे राजकारण होणार आणि येत्या लोकसभा निवडणुकीत उपयोग देखील घेणार.

त्यामुळे इतर राजकीय पक्षांनी त्या सोहळ्याला विरोध करणे हे संयुक्तिक नाही. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे केवळ भाजपाचे नाही तर ते संपूर्ण हिंदूंचे मंदिर आहे. त्यामुळे आज नाही तर उद्या अयोध्येत भाजपाच्या राजकीय विरोधकांना भेट देत सर्वांसोबत जय श्रीरामाचा नारा द्यावा लागेल ‘सबके राम, जय श्रीराम’

Edited By : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT