Asaduddin Owaisi and Navneet Rana Sarkarnama
विश्लेषण

Navneet Rana Vs Asaduddin Owaisi: 15 मिनिटं, 15 सेकंद पोलिसांना बाजूला सारा म्हणणाऱ्यांचा बंदोबस्त समाज कधी करणार?

अय्यूब कादरी

Loksabha Election 2024 News : राजकीय नेते एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरतात. एकमेकांचे उट्टे काढतात, डाव-प्रतिडावही टाकत असतात. त्याचे कुणाला काही वाटत नाही, कारण तो राजकारणाचा एक भाग असतो. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारांत वाढ होते. निवडणूक संपली की बहुतांश राजकीय नेते हे सर्व विसरून जातात.

गेल्या काही वर्षांपूर्वी प्रक्षोभक भाषणांसाठी ओळख असलेल्या नेत्याने मात्र ध्रुवीकरणासाठी नवाच प्रकार राजकारणात आणला. त्या आमदाराने 2013 मध्ये केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याला तितकेच प्रक्षोभक उत्तर एका महिला खासदाराने 2024 च्या निवडणुकीत दिले आहे.

अकबरुद्दीन ओवेसी असे या नेत्याचे नाव. ते 'एमआयएम'चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे लहान बंधू असून, हैदराबादेतील चंद्रायनगुट्टा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी एमआयएमने सातत्याने ध्रुवीकरणाचा प्रयोग केला आहे. मागे 2013 मध्ये अकबरुद्दीन यांनी अत्यंत वादग्रस्त असे वक्तव्य केले होते.

हिंदू आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन एमआयएमसह उजव्या विचारसरणीच्या पक्षांनाच त्यामुळे फायदा झाला होता. ''15 मिनिटांसाठी पोलिसांनी बाजूला सारा, मग आम्ही मुसलमान दाखवू की कुणामध्ये हिंमत आहे," असे अत्यंत वादग्रस्त, दोन समाजांत तेढ निर्माण करणारे वक्तव्य अकबरुद्दीन यांनी केले होते. मतांची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हैदराबाद लोकसभा मतदारसंघात असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi ) यांची लढत भाजपच्या माधवी लता यांच्याशी होत आहे. माधवी लता याही आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात ओवेसी यांनी भाजपचे डॉ. भगवंत राव यांचा 2,82,185 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्येही ओवेसी यांनी भाजपचे राव यांचा 2,02,454 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये ओवेसी यांचे मताधिक्क्य वाढले होते.

या दोन्ही निवडणुकांत मोदी लाट असतानाही ओवेसी यांचा विजय झाला होता. या लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघ असून, भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा सिंह वगळता सर्व आमदार एमआयएमचे आहेत. 1984 पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघात सतत एमआयएमचे खासदार निवडून आलेले आहेत. असदुद्दीन ओवेसी हे सलग पाचवेळी विजयी झाले आहेत. ही त्यांची सहावी टर्म आहे. त्यापूर्वी सलग सहावेळा त्यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी हे निवडून आले होते.

2024 च्या निवडणुकीत काँग्रेसने समीर वलीउल्लाह यांना उमेदवारी दिली आहे. भाजप आणि एमआयएमच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणात काँग्रेस बाजूला फेकली गेली आहे. भाजप आणि एमआयएमचा (AIMM) प्रचार असा असतो की, काँग्रेस स्पर्धेत येऊच शकत नाही. धार्मिक ध्रुवीकरणाची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत.

या निवडणुकीतही तसेच वातावरण आहे. मुस्लिमांना ओवेसी फार आवडतात, असे चित्र जमिनीवर दिसत नाही.मात्र, भाजपचा उमेदवार निवडून आला तर आपले कसे होणार, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे ओवेसी बंधूंचा मार्ग सुकर होतो. मतदारसंघातील अनेक भागांत रस्ते, कचऱ्याची मोठी समस्या आहे, मात्र ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे हे मुद्दे बाजूला पडतात.

महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या हैदराबादेत भाजपच्या माधवी लता यांच्या प्रचाराला गेल्या आहेत. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या 2013 मधील वक्तव्याला त्यांनी 2024 मध्ये उत्तर दिले आहे. ''पोलिसांना फक्त 15 सेकंद बाजूला सारा, मग हे दोन्ही भाऊ कुठून आले आणि कुठे गेले हे त्यांनाही कळणार नाही,'' असे वादग्रस्त विधान राणा यांनी केले आहे. निवडणुकीच्या पूर्वी नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यातही शाब्दिक चकमक झाली होती.

त्यानंतर आता नवनीत राणा यांनी हैदराबादेत जाऊन खासदार इम्तियाज जलील यांच्या पक्षप्रमुखांनाच आव्हान दिले आहे. नवनीत राणा यांना खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही लगेच उत्तर दिले आहे. ''आम्ही तयार आहोत, आम्ही घाबरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकार आहे, त्यांनी 15 सेकंद नव्हे, एक तास घ्यावा. तुमच्यामध्ये किती माणुसकी शिल्लक आहे हे आम्हाला पाहायचे. आम्हाला सांगा कुठे यायचे आम्ही तेथे पोहोचू,;; असे खासदार ओवेसी म्हणाले आहेत.

काँग्रेस उमेदवार समीर वलीउल्लाह यांनी नवनीत राणा आणि ओवेसी या दोहोंच्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाजप (BJP) आणि एमआयएमच्या जातीयवादी राजकारणामुळे हैदराबाद शहराची प्रतिमा मलीन झाली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. काँग्रेस उमेदवार म्हणतात ते खरे आहे, मात्र त्यांचा आवाज मतदार ऐकतील याची शक्यता कमीच आहे.

महागाई, बेरोजगारी हे मूळ मुद्दे बाजूला पडले आहेत. हैदराबादेत याची तीव्रता अधिक आहे. धार्मिक ध्रुवीकरण केल्याशिवाय हैदराबादेत एमआयएम आणि भाजप राजकारण करूच शकत नाहीत, असे चित्र दिसत आहे. टोकाचे धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या अशा पक्षांना, नेत्यांना समाजात थारा असावा का, याचा विचार आता मतदारांवर सोडायला हवा.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT