Ex MP Shivaji Kamble
Ex MP Shivaji Kamble Sarkarnama
विश्लेषण

Dharashiv Lok Sabha : शिवाजीबापू कांबळेंची ठाकरेंना पुन्हा भेट, महायुतीचे काय राहणार उत्तर?

अय्यूब कादरी

Dharashiv News : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीतीतल राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी गावोगावी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. जाहीर सभाही घेतल्या जात आहेत. प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आता घडामोडी वाढू लागल्या आहेत. आगामी काळात त्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातीव बार्शी विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. कडाक्याच्या उकाड्यामुळे प्रचारासाठी फिरताना उमेदवार आणि कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. अशाही वातावरणात उमेदवार, नेते बेरजेचे राजकारण करत आहेत. सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत. धाराशिव मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी शिल्लक राहिलेल्या 12 दिवसांत उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ वाढणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीबापू कांबळे यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नांदेड येथे हा प्रवेश पार पडला.यावेळी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य माणसांना आमदार, खासदार, मंत्री करण्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाते.

मूळचे बार्शी (जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेले शिवाजीबापू कांबळे हे त्यापैकीच एक. ते दोनवेळा (1996 आणि 1999) उस्मानाबादचे खासदार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवाजीबापू कांबळे यांनी भाजपच्या राज्य कार्याकारिणीवर 10 वर्षे काम केले आहे. यावेळी भाजप धाराशिवचे माजी शहराध्यक्ष प्रदीप मुंडे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

उस्मानाबाद मतदारसंघातून शिवाजीबापू कांबळे यांनी 1996 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर काँग्रेसचे अरविंद कांबळे यांचा पराभाव केला होता. 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद कांबळे यांनी त्यांचा पराभव केला. शिवाजीबापू कांबळे यांनी 1999 ची निवडणूक जिंकली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कानिफनाथ देवकुळे यांचा पराभव केला होता. खासदारकीची टर्म संपल्यानंतर ते फारसे चर्चेत राहिले नव्हते. मतदारसंघातही त्यांचा फारसा संपर्क राहिला नव्हता. आतापर्यंत उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

एकमेकांची खिल्ली उडवली जात आहे.शिवाजबापू कांबळे यांच्या शिवसेना (ShivSena) प्रवेशाने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून दुसरा अंक सुरू करण्यात आला आहे. शिावाजीबापू कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशाचा खासदार राजेनिंबाळकर यांना किती फायदा होईल, हे निकालानंतर समजेल. असे असले तरी महायुतीकडून याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या हंगामात अनेक नेते पक्षांतर करत असतात. त्याचा संबंधित उमेदवाराला फायदा होईल की नाही, हे निकालानंतर कळते.असे असले तरी प्रचाराच्या काळात पक्षांतरामुळे संबंधित उमेदवाराच्या बाबतीत वातावरणनिर्मिती होत असते. धाराशिवमध्ये तगडी लढत होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) अर्चनाताई पाटील या दीर-भावजयीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. महाविकास आघाडीचा फक्त एकच आमदार आहे. सामान्य लोकांच्या संपर्कात राहणारा खासदार,अशी राजेनिंबाळकर यांची प्रतिमा आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. महायुतीत एकवटलेल्या दिग्गज नेत्यांचा सामना खासदार राजेनिंबाळकर कसा करतात,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT