Mahayuti Politics : विधानसभा निकालानंतर गेले आठ दिवस महाराष्ट्र राजकीय घडामोडींनी अक्षरश: ढवळून निघालं आहे. या काळात महायुतीतलं मुख्यमंत्रिपदावरुनचं नाराजीनाट्य,खातेवाटपांसाठी रस्सीखेच, सत्तास्थापनेला होणारा विलंब तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून ईव्हीएम आणि निकालावरच संशय घेतल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं दिसून आलं.
त्यात आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. पण जसं बिहारमध्ये अवघ्या 43 जागा जिंकूनही 'जेडीयू'च्या नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपद खेचून आणलं. तसं महाराष्ट्रात तब्बल 57 जागा जिंकलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना का जमलं नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयात भाजप 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 57 जागांसह दुसर्या क्रमांकावर राहिली. तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही 41 जागांसह तिसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला. पण एवढं मोठं बहुमत मिळूनही महाराष्ट्राच्या राजकारणाच सत्तापेच निर्माण झालाच.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप आपल्या महायुतीतील मित्रपक्षांसह कशी डील करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. त्यातच निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीला टोकणारे आणि महायुतीतील सीएम पदाबाबत तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं सांगणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे सूर निकालानंतर हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली. त्यात शिंदेंच्या शिवसेनेनं तर थेट मुख्यमंत्रिपदावरच दावा ठोकला. यामुळे सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली.
लोकसभेतील लाजिरवाण्या पराभवानंतर महायुतीनं त्यात प्रामुख्यानं भाजपनं जोरदार तळागळापासून मोर्चेबांधणी केली होती. त्यात मध्य प्रदेश 'गेमचेंजर' ठरलेली लाडकी बहीण योजनाही आणली.तसेच सरकार आपल्या दारी या उपक्रमाद्वारे सरकारी योजनांच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवनवीन योजना,त्यांची तत्काळ अंमलबजावणी,लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणारा मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचं सरकार अशी निर्माण केलेली इमेज यासारख्या गोष्टींमुळे महायुतीची त्सुनामी आली आणि विरोधकांच्या आघाडीची वाताहत केली.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेआधीच महायुतीतील शिवसेनेनं भाजपवर आपला दबाव आणण्यास सुरुवात केली होती. अखेर या दबावतंत्राच्या खेळात दिल्लीश्वरांची एन्ट्री झाली. मग शिंदेंनी आपलं एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असं जाहीर केलं. या त्यांच्या माघारीनंतर देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं दिल्लीतील अमित शाहांच्या निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर बोललं जाऊ लागलं.
त्या बैठकीतल्या व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा चेहरा खुललेला पाहायला मिळाला तर शिंदेंचा चेहरा पडलेला दिसून आला. या बैठकीनंतर शिंदेंनी दिल्लीतून थेट सातारा जिल्ह्यातील त्यांचं दरे गाव गाठलं. एकीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच त्यांनी दरे गाव गाठल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं.
एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार का? त्यांचा नेमका सरकारमधला रोल काय असणार याविषयीचे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे. पण ते युती सरकारमधलं देवेंद्र फडणवीसांची प्रचंड कमांड असलेल्या गृहखात्यासाठी अडून बसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, बिहारमध्ये नितीश कुमारांना (Nitish Kumar) जे जमलं ते महाराष्ट्रात शिंदेंना जमू शकलं असतं का असा सवाल उपस्थित होतं आहे.
मात्र, बिहारमध्ये 2020 मध्ये 243 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाची युती झाली होती.युतीतच त्यांची निवडणूक लढवली. यावेळी भाजपकडून नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता.त्याच बोलीवर बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती झाली होती. त्याचमुळे दुसरा क्रमांकाचा पक्ष ठरूनही अवघ्या 43 जागा जिंकलेल्या नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं.कारण भाजपनं या निवडणुकीत 72 जागा जिंकल्या होत्या. पण बहुमतासाठी 126 आकडा गाठणं गरजेचं असल्यामुळे जेडीयूशी जुळवून घेण्याशिवाय पर्यायही नव्हता.
भाजपनं 2019 च्या विधानसभा निवडणुकीतून धडा घेत यावेळी मुख्यमंत्रिपदाचा शब्द कुणालाही दिला नव्हता असं सध्यातरी समोर येत आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजपनं 147 पैकी तब्बल 132 जागा जिंकल्या आहेत. आणि 288 जागांची विधानसभा असलेल्या महाराष्ट्रात 145 हा बहुमताचा जादुई आकडा आहे. तसेच भाजपला जवळपास 5 अपक्ष आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांचं संख्याबळ 137 वर पोचलं आहे.त्यामुळे 145 आकडा गाठणं भाजपला फार काही अवघड नाही.
तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच संधी साधत आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिंदेंची आणि त्यांच्या शिवसेनेच्या दबावतंत्राची डाळ काय शिजणार नाही हे आता अधोरेखित झालं आहे. त्याचमुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना जे शक्य झालं ते एकनाथ शिंदेंसाठी अवघड होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.