Kolhapur News : राज्यात बदललेल्या सत्तांतरामुळे सहकारातील संस्थांवर महायुतीचा डोळा आहे. सहकारावर असलेले काँग्रेससह राष्ट्रवादीतील वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपकडून रणनीती जात आहे. अशातच गोकुळ दूध संघावर (Gokul Dudh Sangh) महायुतीचाच अध्यक्ष करावा, असा दबाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकल्यानंतर त्याला बळी पडत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष झाले.
गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा या वादात नविद मुश्रीफ यांची वर्णी लागली. पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत संघावर महायुतीचाच अध्यक्ष असावा ह्या महाडिक यांच्या राजकीय विचाराचा विजय झाला असला तरी ' चीत भी मेरी और पट भी मेरी' करण्यात आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यशस्वी झाले आहे. पाटील आणि मुश्रीफ युद्धात हरले असले तरी तहात मात्र बाजी मारली हे नक्की.
गोकुळ दूध संघाची पुढील वर्षी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने संघावर महायुतीतील अध्यक्ष असावा, अशी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजप, शिवसेना पक्षातील प्रमुख नेत्यांची इच्छा होती. सध्या गोकुळ दूध संघामध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य नेत्यांची सत्ता आहे. प्रमुख नेते म्हणून आमदार पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्याकडेच पाहिले जाते.
आमदार पाटील आणि महाडिक गटाचे राजकीय वैर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गोकुळ मधील शेवटच्या वर्षीचा अध्यक्ष सतेज पाटील यांच्या मर्जीतला होऊ द्यायचा नाही. अशीच भूमिका महाडिक गटाची होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात गोकुळमध्ये समझोता एक्सप्रेस धावली. आणि शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर इचलकरंजीच्या प्रवासात जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांच्या झालेल्या चर्चात पुन्हा एकदा गोकुळच्या राजकारणांना उसळी घेतली.
त्यामुळे गोकुळ दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे. असा दबाव मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकला. सहकारातील आमदार सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची दोस्ती अभेद्य आहे. त्यामुळे ऐनवेळी अध्यक्षपदाचा चेहरा कोण देणार असा सवाल उपस्थित होता.
निवडणूक वर्षात महायुतीचा दुसरा चेहरा अडचणीचा ठरला असता, यातूनच अपरिहार्यता म्हणूनच नवीद मुश्रीफ यांचे नाव पुढे आले. मंत्री मुश्रीफ यांचा सुरुवातीला त्याला विरोध होता. पण सतेज पाटील यांनीच त्यांची समजूत काढली. एका अर्थाने मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या रणनितीचा विजय म्हणावा लागेल. शिवाय महाडिक यांचेही समाधान म्हणावे लागेल. शिवाय महायुतीच्या नावाखाली मुश्रीफ आणि पाटील जोडी फोडण्याचा डाव उधळला गेला.
वरिष्ठ स्तरावरून प्रचंड दबाव असूनही आमदार पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्या मत्स्युदी राजकारणामुळे दोघांचाही डाव सफल झाला. आतून महाडिक ही खुश झाले. आणि मुख्यमंत्र्यांचा ही शब्द पाळला. असेच चित्र निर्माण झाले. महाडिक यांनी कितीही पाटील यांना बाजूला करायचा प्रयत्न झाल्यास पाटील आणि मुश्रीफ यांची दोस्ती पाहता नवीद मुश्रीफ यांचे अध्यक्षपदाची निवड म्हणजे गोकुळच्या राजकारणात चीत भी मेरा और पट भी मेरी, हीच परिस्थिती पाटलांनी करून दाखवली आहे.
मावळते चेअरमन अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच राजीनामा देऊ, चेअरमन महायुतीचा व्हावा असे आदेश असल्याचे डोंगळे यांनी स्पष्ट केल्याने गोकूळचे संपूर्ण राजकारणच ढवळून निघाले. पण संचालकांच्या बैठकीच्या मागील 24 तासांत राजकारण 360 अंशात फिरले.
केडीसीसी बँकेंचे चेअरमनपद आपल्याकडे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेतृत्व आपल्याकडे आहे. स्वतः आमदार, मंत्री आहोत, गोकुळचे कारभारपण आपण करतो, मग मुलाला चेअरमन करायचा प्रश्नच येत नाही. मुलगा चेअरमन झाला तर सर्व पदे घरातच असा याचा उलटा राजकीय परिणामही होऊ शकतो.
शिवाय गोकुळच्या निवडणुकीत महाडिक कुटुंबियावर याच मुद्द्याला धरून टीका करण्यात आली होती. अशीच टीका आपल्यावर देखील होऊ शकते याचा विचार मुश्रीफ यांना होता. हे ते जाणून होते. त्यामुळे हसन मुश्रीफ हे नविद यांच्या नावाला तयार होणार नाहीत. त्यामुळे महायुती म्हणजेच शिंदे गटाकडेच हे पद जाईल, अशी अटकळ बांधून मोर्चेबांधणी सुरू झाली.
पण मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आमदार विनय कोरे यांनी देखील आपल्या गटाचा अध्यक्ष व्हावा यासाठी शब्द टाकला. जर असे झाल्यास महायुतीकडेच अध्यक्षपद जाईल, आपले नियंत्रण कमी होईल याची शक्यता जास्त असल्याने अखेर सतेज पाटील यांनीच मुश्रीफांची समजूत काढली आणि नवीद यांचे नाव पुढे केले.
त्यांचे नाव समोर आल्यानंतर गोकुळमध्ये महायुतीचाही अध्यक्ष झाला. आणि गोकुळमधील 'समझोता एक्सप्रेस' ही रुळावर व्यवस्थितपणे धावली. पुढील वर्ष निवडणुकीची असल्याने सतेज पाटील यांना काही मर्यादा येणार असल्या तरी त्यांनी या निवडणुकीत आपली थोडी का वाट असेना मोकळी व सोपी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.