Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Devendra Fadnavis : लोकसभेची 'एक्झाम' फडणवीसांना 'डिस्टिंक्शन' मिळणार ?

Uttam Kute

Pimpri News : लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे. तो म्हणजे केंद्रात मोदी-शाहांची,तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची परिक्षाच आहे. त्यात ते व त्यातही राज्यातील भाजपचे सवोच्च नेते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती मार्क्स मिळवणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या परिक्षेसाठी मोदी-शाह,फडणवीसांसह भाजपने देशपातळीवर मोठा अभ्यास केला आहे.त्यांची त्यासाठी महाराष्ट्रात,तर दोन वर्षांपासून तयारी सुरु होती.प्रचंड फो़डोफोडी त्यांनी केली.राजकीय पक्षच नाही,तर राजकीय़ कुटुंबही त्यांनी फोडली.

केंद्रात पुन्हा सत्तेची आणि मोदींच्या पंतप्रधान पदी विराजमान होण्याची हॅटट्रिक करण्यासाठी त्यांनी टोकाच्या विचारधारेच्या मंडळींना सोबत घेतले.त्यासाठी साम,दाम,दंड,भेद या सर्व हत्यांरांचा मुक्त वापर केला.त्यानंतरच ते या लोकसभेच्या पंचवार्षिक परिक्षेत नव्वद टक्के मार्क्स मिळवण्यासाठी सामोरे गेले आहेत.

फडणवीसांसारख्या अत्यंत धुर्त,मुत्सद्दी नेत्याने,तर या परिक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.त्यासाठी त्यांनी मोठा त्यागही केला. मुख्यमंत्रीपद पणास लावले. त्यावर पाणी सोडले.आपल्यापेक्षा निम्मेही आमदार नसलेल्या शिंदे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री त्यांना द्यावे लागले.त्यापूर्वी त्यांनी अत्यंत हुषारीने शिवसेनाच फोडली. त्यासाठ केंद्रातील आपल्या सत्तेची  मदत घेतली.याच शिवसेनेच्या जोरावर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्म्यावर भाजपने अगोदर ग्रामीण महाराष्ट्रात पाय रोवले.दोन खासदार ते केंद्रात सत्ता येईल एवढी ताकद निर्माण केली. राज्यात सत्तेत आले.नंतर अलगद युती तोडून शिवसेनेला बाजूला केले.तर, दोन वर्षापूर्वी ती फोडली.

शिवसेना फोडल्यानंतर फडणवीस आणि भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरुंग लावला. त्यांची ही दोन शकलं केली.अजित पवारांना राज्यातील सत्तेचे मधाचं बोट लावून आपल्याकडे वळवलं.त्यासाठी सत्तेच्या लालसेसह दडपटशाचाही वापर त्यांनी केल्याची चर्चा आहे. केंद्रात पुन्हा सत्तेत येऊन मोदींना पंतप्रधान करायचे या एकाच लक्ष्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यावरच ते थांबले नाहीत.तर,कुठलाही धोका नको म्हणून त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींवर तुटून पडलेले राज ठाकरे यांनाही चक्क आपल्या गळाला लावले.  

अशारितीने दोन मोठे राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख असलेली दोन कुटुंबे फोडून भाजप आणि फडणवीस या चाणक्याने राज ठाकरेंची मदत घेत लोकसभा परिक्षेची मोठी जय्यत तयारी केली. त्याचे पेपर सोडविण्य़ाचा एकदम ताण येऊ नये म्हणून त्यांनी ती महिनाभर सुरु ठेवली. तिचे व्यवस्थित सात टप्पे केले.त्यानंतर त्यांनी पेपर दिला.त्यात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवू,असे त्यांचा इरादा आहे. नव्वद टक्के गुण मिळविण्याचे मोठे टार्गेट ठेवल्यानंतर किमान साठ-सत्तर टक्के,तरी ते मिळतील,असे त्यांचे गणित आहे.

फडणवीस यांनी जीव तोडून या परिक्षेसाठी मेहनत घेतली आहे.मात्र,त्यातुलनेत तेवढे मार्क त्यांना मिळतात,हे पाहायचे आहे. कारण त्यांच्यासाठी ही दहावीची परिक्षा असून त्यावर त्यांचे करिअर अवलंबून आहे.पुढील राजकीय भवितव्याची दिशा त्यावरून ठरणार आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे दार यातून उघडले जाणार आहे. किंवा त्यातोडीचे पद केंद्रात मिळण्याचा मार्गही त्यातून खुला होणार आहे. दुसरीकडे या परिक्षेत अपेक्षित य़श तथा डिस्टींक्शनचे गुण मिळाले नाहीत, तर त्यांचा आतापर्यंत उधळलेला वारू रोखला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT