Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis  Sarkarnama
विश्लेषण

NCP Ajit Pawar News : लोकसभेचा निकाल बाकी, तोच विधानसभेच्या जागावाटपावरुन अजितदादांचं दबावतंत्र?

Sachin Waghmare

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या सहा टप्प्यातील मतदान पार पडले. येत्या काळात केवळ सातव्या टप्यातील मतदान होणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार असल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसलेला नसतानाच आतापासूनच महायुतीमधील घटक पक्षात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याची चर्चा सुरु झाली आहे.

त्यातच सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) बैठकीप्रसंगी ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेला किती जागा हव्यात हेच जाहीरपणे सांगत या निमित्ताने दबावतंत्र वाढवला आहे. त्यावर, उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली असली तरी येत्या काळात महायुतीमधील तीन घटक पक्षात विधानसभेचे जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे दिसते. (Mahayuti News)

काही दिवसपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप पार पडले. यावेळेस घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट यांच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एका-एका जागेवरून रस्सीखेच पहावयास मिळाली.

या महायुतीच्या जागावाटपात भाजपने सर्वाधिक जागा लढल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा मिळाल्याने चांगलीच नाराजी पाहायला मिळाली. त्याच वेळी अजित पवार गटाची समजूत विधानसभा निवडणुकीला जादा जागा देऊ असे, सांगून काढण्यात आली. त्यामुळेच आतापासूनच विधानसभेच्या जागा वाढवून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस थोडीसी आक्रमक झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या महायुतीच्या जागावाटपात भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढवली. तर, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या तर अजित पवार गटाला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. तर, राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातील 1 जागा रासपच्या महादेव जानकर (Mahdev Jankar) यांना देऊ केली. त्यामुळे, सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ चार जागा आल्याने विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खिल्ली उडवली होती. त्याचमुळे आता मंत्री छगन भुजबळ यांनी जागावाटपाबाबत जाहीरपणे बोलत नाराजी व्यक्त केली.

भुजबळ यांच्या मते आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने राष्ट्रवादीला 80-90 जागा देण्याचा शब्द दिला असल्याचे सांगितले. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, यावेळेस हक्काचा वाटा मिळाला पाहिजे, असे म्हणत भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना जोर लावत दबाव वाढवला आहे.

भुजबळ यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकांचा धुराळा बसण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत चर्चा सुरू झाल्याचे दिसते. भाजपने 400 पारचा नारा दिला. त्यामुळे दलित समाजात संविधान बदलणार हे सर्वांपर्यंत पोहचलं गेलं. ते त्यांच्या मनातून काढण्यासाठी नाकी नऊ आले, असे भुजबळ यांनी सांगितले.

त्यासोबतच येत्या काळात लोकसभा निवडणूक संपली आहे, तोच विधानसभा निवडणूक सुरू झाली की लवकरच आचारसंहिता सुरू होतील. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे पुन्हा काम थांबतील. त्यामुळे माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांची कामे लवकर मंजूर करा, असेही भुजबळांनी यावेळी सांगितले.

या वेळी छगन भुजबळ यांनी जरी 80 ते 90 जागांवर दावा केला असला तरी यावर बोलताना भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याकडे विचारणा केली असता त्यावर, बोलताना फडणवीस यांनी महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील असे सांगून इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

त्यामुळे येत्या काळात फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापासूनच केल्या जात असलेल्या दबावाला झुगारून येत्या काळात चर्चेअंती निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमधील घटक पक्षात विधानसभेच्या जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळणार, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

SCROLL FOR NEXT