Mahayuti  sarkarnama
विश्लेषण

Mahayuti secret strategy: महायुतीचा गुप्त डाव उघड; ठाणे-पुण्यातील मैत्रीपूर्ण लढतीमागे 'ही' रणनीती!

Thane Pune friendly contest News : दोन दिवसापूर्वीच महायुतीने मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहेत तर पुण्यात व ठाण्यात महायुतीमधील मित्रपक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली आहेत. त्यातच महाविकास आघाडी व महायुती आघाडी करणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. दोन दिवसापूर्वीच महायुतीने मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहेत तर पुण्यात व ठाण्यात महायुतीमधील मित्रपक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

पुणे, पिंपरी महापालिकेत भाजप व एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार आहे तर ठाण्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदेची शिवसेना निवडणूक लढणार आहे. ठाणे, पुणे व पिंपरी महापालिकेत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असली तरी या लढतीमागे 'गुप्त' प्लॅन आहे. या रणनीतीबाबत राजकीय विश्लेषकानी 'सरकारनामा'शी बोलताना त्यांची मते व्यक्त केली आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीपुढे राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बंधू एकत्र आले तर त्यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या विरोधात मुंबईत निवडणूक लढवायची असेल तर महायुतीमधील मतविभागणी टाळून एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून एकसंध शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून भाजपचे कॉन्फिडन्स वाढले होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू युती करणार आहेत. मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाल्यास मुंबईतील समीकरण भाजपसाठी अवघड ठरणार असल्यानेच त्यांनी मुंबईत महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.

महायुती (Mahayuti) मुंबईत एकत्रित येत असली तरी ठाणे आणि पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. ठाणे आणि पुणे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये युती केल्यास महायुतीचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे, शरद पवारांकडे जाण्याची शक्यता गृहीत धरून महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचे प्लँनिंग करण्यात आले असल्याचे गुपित एका राजकीय विश्लेषकांनी उघड केले आहे.

महापालिकेची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या निवडणुकीची तयारी तीन पक्षाच्या नेत्याने आधीपासूनच केली आहे. मात्र, ऐनवेळी उमेदवारी न दिल्यास महायुतीमधील इच्छुक ऐनवेळी महाविकास आघाडीच्या गळाला लागला अथवा त्यानी बंडखोरी केली तर त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. त्यामुळेच आतापासूनच महायुतीकडून ताकही फुंकून पिले जात आहे. त्यामुळेच काही ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत होणार आहेत. युती करून स्थानिक पातळीवर पक्षातील कार्यकर्त्यांना अडचण होणार नाही याची काळजी महायुतीकडून घेतली जात असल्याचे एका राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे मोठे आव्हान महायुतीमधील तीन ही घटक पक्षांसमोर आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी जास्तीत जास्त संधी देण्यासाठी ठाणे आणि पुण्यात युती टाळण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकानी सांगितले.

महायुती केल्यास नाराजीची शक्यता

येत्या काळात महायुती केली तर जागांची तीन ठिकाणी विभागणी होणार आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचा महापूर येणार आहे. त्यामुळे नाराज असलेले हे नेते निवडणुकीच्या तोंडावरच उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणुक लढण्याचाही धोका आहे. त्यामुळे युती न करताही जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा महायुतीची ठाणे आणि पुण्यात रणनिती दिसत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, 'ही 'मैत्रीपूर्ण लढत' म्हणजे विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला जाळ्यात ओढण्याची आणि त्यांची ताकद विभागण्याची खेळी असू शकते. दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी लढल्यास, मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे महायुतीतील घटक पक्षांनाच होऊ शकतो. त्याशिवाय ज्या ठिकाणी अंतर्गत वादामुळे एका पक्षाला तिकीट देणे शक्य नाही, तेथे 'मैत्रीपूर्ण लढती'च्या नावाखाली दुसऱ्या पक्षातून बंडखोरांना संधी दिली जाणार असल्याने महायुतीचा बंडखोर महायुतीबाहेर जाणार नाही यासाठी ही रणनीती आखली आहे.

त्याशिवाय काही ठिकाणी विरोधी पक्षाची असलेली स्पेस ही महायुतीमधील मित्रपक्षालाच मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय ऐनवेळी सत्तास्थापनेसाठी नगरसेवकाची मदत लागल्यास निवडणुकीनंतर महायुती म्हणून हे मित्रपक्ष एकत्रित येऊ शकतात. त्याशिवाय निवडणूक लढण्यास तयार असलेला इच्छुक ऐनवेळी विरोधीपक्षाच्या हाताला लागू नये यासाठीच मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय समोर आला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचा हा केवळ दिखावा करण्यात येत आहे. यामागील मुख्य उद्देश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यात कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे. ही 'मैत्री' कोणाला फायद्याची ठरणार आणि कोणाला नुकसान पोहोचवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT