Maratha Reservation news Sarkarnama
विश्लेषण

Maratha Reservation Morcha : एकनाथ शिंदेंनी एकहाती मारले मैदान; तर फडणवीस अन् अजितदादांनी घेतली 'ही' काळजी

अय्यूब कादरी

Maratha Reservation News : मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणाची ऐतिहासिक लढाई जिंकली आहे. मुंबईच्या वेशीवरील वाशीत धडकलेल्या आंदोलकांनी त्यानंतर जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत आले आणि जरांगे पाटील यांच्याकडे आरक्षणाचा अध्यादेश सुपूर्द केला. या सोहळ्यात एकटे मुख्यमंत्री शिंदे ठळकपणे दिसत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पवार हे दोघेही दिसले नाहीत. मुख्यमंत्री शिंदे यांनी मैदान मारले, हे दाखवून देत असतानाच ओबीसी समाज नाराज होऊ नये, याची काळजीही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याद्वारे घेतली, अशी चर्चा आहे.

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. भाजपचे राज्यातील दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. छातीवर दगड ठेवून आम्ही हा निर्णय स्वीकारला, असे त्यानंतर काही दिवसांनी चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात म्हणाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सर्वकाही सुरळीत असताना, म्हणजे पुरेसे बहुमत असताना गेल्यावर्षी राष्ट्रवादीतील काही आमदार घेऊन अजित पवार हेही सरकारमध्ये सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर काही महिन्यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू झाले.

आंदोलन सुरू झाल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे-पाटील यांच्यात वाद-विवाद सुरू झाला. त्यावेळी अजितदादा अधूनमधून बोलले, मात्र बहुतांश वेळा शांतच राहिले. जरांगे-पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही खटके उडाले होते. त्यामुळे नंतर तेही शांत झाले. मराठा आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकट्यानेच सामोरे जात आहेत, असे चित्र निर्माण झाले किंवा तसे ते निर्माण केले गेले.

ओबीसी समाज सरकारवर नाराज होऊ नये, याची काळजी याद्वारे घेण्यात आली. मराठा नेता कोण, असा सुप्त संघर्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सुरू होता. त्याला शिंदे यांनी शेवटचे उत्तर देऊन टाकले आहे. महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हेच शक्तिशाली मराठा नेते आहेत, अशी प्रतिमा आता त्यांची निर्माण झाली आहे. दिल्लीश्वरांकडेही हा संदेश गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यभरात प्रचंड सहानुभूती मिळाली. त्यावर शिंदे आणि भाजपला तोड सापडत नव्हता. त्यातूनच अजित पवारांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्यात आले. तरीही फारसा फरक पडत नसल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय न्यायालयावर सोडून देण्यात आला.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती सरकारची डोकेदुखी ठरली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देऊन ती सहानुभूती संपुष्टात आणण्याचा निर्णायक डाव सरकारने खेळला आहे. त्यात यश येते की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सरकारने कोणताही निर्णय घेतला, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याला महाविकास आघाडी सरकारशी, विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जो़डतात. आमचे सरकार अमुक नाही किंवा महाविकास आघाडी सरकारने तमुक केले नाही, असा कायम त्यांच्या टीकेचा सूर असतो. त्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये ते महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते, हे शिंदे विसरून जातात. मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी झाल्यानंतर बोलतानाही शिंदे यांनी ही संधी सोडली नाही. आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही, असे ते बोलूनच गेले. उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही, म्हणून मराठा आरक्षण गेले, असे त्यांना ठसवायचे होते. मात्र त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आमचे सरकार देणारे आहे, या दाव्याची हवा काढून घेत मराठा आरक्षणाचा हा अध्यादेश नसून केवळ मसुदा असल्याचे सांगितले आहे.

ओबीसींनी हरकती दाखल कराव्यात, असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचेच एक कॅबिनेटमंत्री इतक्या महत्त्वाच्या विषयावर परस्परविरोधी विधाने कशी करू शकतात, त्यामागे उद्देश काय आहे, असे प्रश्न आता निर्माण होत आहेत. त्यामुळे आरक्षणाचा विषय न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाचा शक्तिशाली नेता, या शिंदे यांच्या प्रतिमेला टाचणी लावण्याचाही भुजबळ यांचा हा प्रयत्न असू शकतो. महायुती सरकार असे अंतर्विरोधांनी भरलेले दिसत आहे.

जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांची अशी परस्परविरोधी विधाने सातत्याने ऐकायला मिळाली आहेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation) विजयी सभेला पाठ दाखवत देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून दिला आहे. मराठा समाज खुश झाला असेल, तर ओबीसी समाज नाराज होणार नाही, याची काळजी घेण्याचा एक भाग म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या जल्लोषाकडे पाठ फिरवली.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT