Narendra Modi, Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Onion Political Role : गल्ली ते दिल्ली, सर्वच राजकारण्यांचा कांद्यानं केला वांदा ! आतापर्यंत कुणाकुणाला रडवलं...

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : गाव असो वा शहर सर्वच नागरिकांना कांद्या प्रिय... मात्र या कांद्याचे दर पडले वा वाढले तर राज्य असो वा केंद्र, महाराष्ट्र असो वा दिल्ली... सर्वच राजकारण्यांना धडकी भरल्याचाही इतिहास सांगतो. भारतात कांद्याने काही सरकार पाडले तर काहींच्या विजयात हातभार लावल्याची उदाहरणे आहेत. कांद्याच्या दराचा फटका माजी पंतप्रधान वाजपेयींसह शरद पवार, सुषमा स्वराज यांनाही बसला आहे.

आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या आहेत. यातच टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत तर कांद्याचे दर गडगडले आहेत. यामुळे ग्राहक आणि उत्पकांसह तोडगा काढून हे सरकार कांद्याला खूश करते की या सरकारला कांद्याची खप्पामर्जीला सामोरे जावे लागणार याकडे देशाचे लक्ष आहे. (Latest Political News)

जेवणात रंगत आणणारा कांदा सामान्य ग्राहकांना स्वस्त असेल तर चेहऱ्यावर आनंदाश्रू तर महाग झाल्यावर चिंताश्रु आणतो. कांदा महागला की तुमचे महिन्याचे बजेट बिघडलेच म्हणून समजा. महिलांसाठी तर कांदा हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने कांद्याची महती फक्त घरातच थांबत नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्यांना कांदा जसा हसवतो-रडवतो तसाच मोठ-मोठ्या राजकारण्यांच्याही डोळ्यातून कांदा पाणी काढतो, तर कुणाला खुर्ची मिळवून देतो, अशी अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत.

कांद्याला स्वयंपाक घरात जशी महत्वाची भूमिका आहे, तशीच राज्य आणि देशातील राज्यकर्त्यांच्या चढ-उतारातही तो 'हिरो' वा 'व्हिलन'ची भूमिका वठवतो. तुम्हाला आठवत असेल, 'पॉवरफुल' नेते शरद पवार 'यूपीए' सरकारमध्ये देशाचे कृषी मंत्री होते, त्यावेळी ते निफाड येथे आले होते. निफाड म्हणजे कांद्याचे आगार.. मात्र त्यावेळीच कांद्याच्या भाव पडल्याने शेतकऱ्यांत आणि शेतकरी संघटनांत असंतोष उफाळला होता. त्यावेळी ऐन सभेत काही शेतकऱ्यांनी पवारांच्या दिशेने कांदे फेकून या प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.

भारतीय सत्तेच्या राजकारणात कांदा पूर्वापार प्रसिद्ध आहे. आणीबाणीच्या निर्णयामुळे इंदिरा गांधींना पायउतार व्हावे लागले आणि देशात मोरारजी देसाई यांचे जनता पक्षाचे सरकार आले. देसाईंचा कार्यकाल संपत असताना देशात कांदा प्रश्न पुढे आला. त्यावेळी राजकारणातील मातब्बर इंदिरा गांधींनी ही समस्या 'इनकॅश' केल्याचे बोलले जाते. परिणामी पुन्हा एकदा इंदिरा सरकार देशात बहुमताने सत्तेचे आले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातही कांद्याचा तुटवडा जाणवला. किमती प्रचंड वाढल्या होत्या. सरकारचे धोरण चुकले की काय असा प्रश्न उपस्थित झाल्याने देशातील जनता संतापली. या संतापलेल्या लोकांनी चांगले काम करूनही वाजपेयींच्या नेतृत्वातील सरकारला पुन्हा सत्तेवर बसवण्यास नकार दिला. त्यावेळी परमाणू प्रयोगात कांद्याचे गुणधर्म अडचणीचे असल्याने लाखो टन कांदा जमिनीत गाडला गेल्याची चर्चा होती. परिणामी परमाणू कार्यक्रम यशस्वी करूनही वाजपेयींना कांद्याच्या तुटवड्याचा फटका बसला.

दिल्लीत सुषमा स्वराज्य मुख्यमंत्री असताना त्यांचेही सरकार कांद्याने उलथवले आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित पुन्हा सत्तेत आल्याचे बोलले जाते. एकूणच कांद्याने गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वच राजकारण्यांना धडकी भरवली असल्याचा इतिहास आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात महागाई, मणिपूर, रोजगार आदी प्रश्नांवर विरोधकांनी रान पेटवले आहे. आगामी निवडणुकीत सरकारविरोधात महागाईच्या प्रश्नाला विरोधक कांद्याचा 'तडका' कसा देतात हे पहावे लागले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT