पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला समर्थन देण्याचे आश्वासन दिले होते. ऑपरेशन सिंदूरनंतरही काँग्रेस मोदी सरकारच्या भूमिकेशी सहमत होती. पण भारत-पाकिस्तान तणाव संपल्यानंतर आता राजकारण सुरु झाले आहे.
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरुन काँग्रेसमध्ये मतभिन्नता आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेपासून अलिप्त राहून काँग्रेसला एकाकी पाडल्याचे दिसते.
भारत-पाकिस्तान तणाव निवळल्यानंतर काँग्रेस अन् भाजपमध्ये तू-तू-मैं-मैं सुरु झाले आहे. दोन्ही पक्षाकडून खालच्या स्तरावर टीका होत आहे. आयटी सेल मैदानात उतरल्यानंतर आता काँग्रेस-भाजपमध्ये पोस्टर वॅार सुरु झाले आहे. आगामी निवडणुकामध्ये 'ऑपरेशन सिंदूर'हा राजकीय मुद्या होईल का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
भारत-पाकमधील तणाव कमी झाल्यानंतर भाजप सरकारवर काही प्रमाणात टीका झाली. अजून काही दिवस पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता, असे भाजप समर्थकांसह अनेकांचे मत होते. हा विषय संपत असतानाच 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याचा विषय काँग्रसने पुन्हा उकरुन काढला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे सत्ताधारी अन् विरोधक यांच्यात जुंपली होती, तसाच प्रचार आता पहलगाम हल्ल्यानंतर होत असल्याचे चित्र आहे. पहलगाम हल्लानंतर भारत-पाकिस्तान तणाव निर्माण झाला, भारताने त्याला करारा जवाब दिला, पण लवकरच दोन्ही देशात युद्धबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे काही भाजपसमर्थकांसह काँग्रेसनेही या मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेच्या दबावाखाली मोदी सरकारने युद्धबंदीचा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. या विषयावर संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली.
या मु्द्दांवरुन आरजेडी नेता तेजस्वी यादव आणि सीपीआई यांनीही काँग्रेसच्या या मागणी पाठिंबा दिला आहे, पण अन्य विरोधी पक्षांना एक पाऊल मागे घेत राहुल गांधी अन् खर्गे यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही.
राष्ट्रहिताशी संबधीत अशा विषयावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी चुकीची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. अधिवेशनाऐवजी सर्वपक्षीय बैठक बोलवून चर्चा करा, असा सल्ला पवारांनी दिला आहे.
शरद पवार यांच्याप्रमाणेच अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्या मागणीकडे कानाडोळा केला आहे. पण राहुल गांधी यांची मागणी काँग्रेसचे नेते लावून धरत आहेत. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी या मुद्दावर काँग्रेसला साथ न देण्याचे ठरवल्यामुळे काँग्रेस पार्टी एकाकी पडली असल्याचे दिसते.
केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी राहुल गांधींनी हा मुद्दा उचलून धरला आहे. यावर अनेक प्रश्न ते सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत. भाजप नेते त्यांना सडेतोड उत्तर देत आहेत. दोन्ही पक्षाकडून सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरु झाले आहे. आगामी काळात 'ऑपरेशन सिंदूर'हा राजकीय विषय होऊ नये, असे अनेकांचे मत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.