PM Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

PM Narendra Modi Analysis : मोदीजी, उशिरा का होईना समाजाला दिलासा, विश्वास दिलात, हे बरं झालं!

अय्यूब कादरी

Lok Sabha Election Analysis : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाले आणि भाजपकडून प्रचारात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचे मुद्दे येऊ लागले. पहिल्या दोन टप्प्यांत आपली कामगिरी चांगली राहणार नाही, असे कदाचित भाजपला वाटले असणार. मतदान केंद्रांवर सकाळी मुस्लिमांच्या रांगा दिसून येऊ लागल्या आणि मतदानाची टक्केवारी घटू लागली. त्यामुळे मुस्लिमांचे मतदान अधिक होत आहे आणि ते आपल्या पारड्यात पडत नाही, असे भाजपला वाटले असणार.

राजस्थानमधील जालोर आणि बंसवाडा येथे 21 एप्रिल रोजी झालेल्या जाहीर प्रचारसभांमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याची सुरुवात केली. काँग्रेस सत्तेत आली तर तुमची मालमत्ता, सोने आणि अन्य मौल्यवान वस्तू मुस्लिमांच्या नावे करणार आहे, असे ते म्हणाले. जास्त मुले असणारे आणि घुसखोर असाही उल्लेख त्यांनी केला. काँग्रेस (Congress) ओबीसींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देणार, अशीही टीका त्यांनी केली होती. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. (Latest Political News)

मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा लयास नेली, अशीही टीका त्यांच्यावर झाली. कर्नाटकमध्ये मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण (OBC Reservation) देण्यात आले आहे. ते काँग्रेसनेच दिले, असे मोदी सातत्याने सांगत आहेत. खरेतर, तो निर्णय एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) सरकारने घेतला होता. या निवडणुकीत हा पक्ष एनडीएमध्ये आहे, म्हणजे भाजपसोबत आहे. (Latest Marathi News)

या सर्व बाबी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत, असा दावा मोदी यांच्याकडून करण्यात आला. काँग्रेसने तो फेटाळून लावला. मोदी यांच्या दाव्यानंतर लाखो लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा डाऊनलोड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आपला जाहीरनामा समजून सांगण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदी यांची वेळ मागितली होती, मात्र ती मिळाली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचारात ध्रुवीकरणाचा मुद्दा आणून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका झाली. त्यांचा तो प्रयत्न समाजालाही आवडला नसल्याचे दिसून आले. देशभरातील हजारो लोकांनी याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) ई-मेलद्वारे तक्रारी करून पंतप्रधानांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. वक्तव्य केले होते मोदींनी आणि निवडणूक आयोगाने नोटीस बजावली भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना.

मोदींनी आता मुस्लिमांना आणि संपूर्ण समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मी कधीही हिंदू-मुस्लिम केले नाही, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. लोकांनी अधिक मुलांना जन्म देऊ नये, असे आवाहन मी जेव्हा करतो, तेव्हा मी मुस्लिमांविषयी बोलतोय असे त्यांना का वाटते, असे मोदी त्या मुलाखतीत म्हणाले आहेत. अधिक मुलांची समस्या गरीब हिंदू कुटुंबांतही आहे. ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सक्षम नाहीत. मी कधीच हिंदू-मुस्लिम नाव घेतले नाही, असेही मोदींनी स्पष्ट केले आहे.

उमेदवार एकदा निवडून आला की तो सर्वांचा प्रतिनिधी असतो, त्याला मत दिलेल्यांचा आणि न दिलेल्यांचाही. ही बाब पंतप्रधांनाना तर प्रकर्षाने लागू होते. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. ते कोण्या एका पक्षाचे किंवा विशिष्ट जाती-धर्माचे नसतात. शांततामय सहजीवन कायम राहील, याची काळजी पंतप्रधानांनी घेणे अपेक्षित असते.

गेली दहा वर्षे देशात भाजपची स्पष्ट बहुमताची सत्ता आहे. काँग्रेसचा जीव गुदमरलेला आहे. असे असतानाही गेल्या दहा वर्षांत केलेली कामे सांगायचे सोडून भाजप नेते काँग्रेसवर टीका करत आहेत, ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातही अनेक प्रचारसभा घेतल्या आहेत. काही सभांमध्ये त्यांनी मुस्लिमांचा मुद्दा आणलाच आहे.

शिक्षण, नोकरी आदी बाबींत मुस्लिमांची अवस्था काय आहे, हे समाजाला, देशाला माहीत आहे. विविध योजना राबवून मोदी मुस्लिम समाजाला सक्षम करू शकले असते. पण तसे झाले नाही, ते काँग्रेसच्या काळातही झाले नाही. काँग्रेसने आमचा वापर फक्त मतांसाठी, अशी खंत मुस्लिम समाजाच्या मनात घर करून बसलेली आहे. भाजपकडून ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात आहे, काही नेत्यांकडून भीती दाखवली जाते, त्यामुळे कदाचित मुस्लिमांची मते काँग्रेसला मिळत असावीत. गेल्या दोन निवडणुकांतील काँग्रेसची स्थिती पाहता, मुस्लिम काँग्रेसलाच मत देतात किंवा भाजपच्या विरोधात मतदान करतात, असेही म्हणता येणार नाही.

मी जेव्हा हिंदू-मुस्लिम करायला लागेन तेव्हा सामाजिक जीवनात राहण्यायोग्य नसेन, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांनी हे विधान मनापासून केले असेल तर ते समाजासाठी, शांततामय सहजीवनासाठी ते दिलासादायक ठरणार आहे. मी कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद होऊ देणार नाही, हे माझे वचन आहे. सबका साथ सबका विकास हा माझा मंत्र आहे. मला काही चुकीचे दिसले की मी लगेच बोलतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुलाखतीत म्हणाले आहेत.

मतदानाचे चार टप्पे झाले आहेत. त्या अर्थाने मोदींचा हा दिलासा थोडा उशीरा आला आहे. सर्वच मुस्लिमांना काँग्रेसबद्दल फार प्रेम वगैरे आहे, असे म्हणता येईल का, हाही प्रश्न आहे. भाजपचे लोक ध्रुवीकरण करतात म्हणून मुस्लिमांना पर्याय शिल्लक राहत नसावा. चार टप्प्यांत मुस्लिमांची एकजूट दिसून आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी असा संदेश सुरुवातीलाच दिला असता तर..? मोदींना दिलासा तर दिला आहे, मात्र तो निवडणुकीच्या मध्यात आल्यामुळे समाज विश्वास ठेवणार का, हाही प्रश्न आहेच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT