Pm Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Loksabha Election 2024 : पराभूत होणाऱ्या जागा भाजप मित्रपक्षांना देणार?

Sachin Deshpande

Pm Nanendra Modi On NDA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 17 व्या लोकसभेतील अंतिम भाषण केलं. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप ३७०, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ( एनडीए ) ४०० जागा नक्कीच मिळतील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी ( Narendra Modi ) व्यक्त केला. 'एनडीए'तील मित्र पक्ष फक्त ३० जागांवर विजयी होतील, असं एकप्रकारे मोदींनी सांगितलं आहे. त्यामुळे भाजप मित्रपक्षांना पराभूत होणाऱ्या जागा तर देणार नाही ना? अशी भिती व्यक्त होत आहे.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून 'एनडीए'तील घटक पक्षांच्या वाट्याला कोणत्या जागा मिळणार? या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. लोकसभेला ( Loksabha Election 2024 ) 'एनडीए'तील पक्ष केवळ तीस जागांवर विजयी होतील, हा मोदींचा दावा मित्रांना सतर्क करण्यासाठी होता का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

संपूर्ण देशभरात विजयी होणाऱ्या ३० जागा 'एनडीए'च्या घटक पक्षांना सुटणार असतील, तर राज्यातील महायुतीच्या दोन पक्षांना केवळ प्रत्येक एक-एक विजयी होणारी जागा मिळेल काय? असा धक्कादायक अर्थ यातून निघताना दिसतो. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार पराभूत होणार की भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. अशीच परिस्थिती अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची देखील होईल. त्यांच्याबरोबर असलेले खासदार लोकसभेत जाणार की, राज्यसभेच्या मोजक्याच जागांवर अजित पवारांना समाधान मानावे लागेल काय, अशी चलबिचल मोठ्या नेत्यांमध्ये सुरू आहे. या स्थितीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या 'आरपीआय' या पक्षाला लोकसभेला विजयी जागा सुटतील की नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारत 'एनडीए'त सामील झाले आहेत. त्यामुळे भाजप नितीश कुमारांच्या जनता दल ( युनायटेड ) ला निवडणुकीत किती विजयी जागा देणार? हा विषय देशभरात चर्चिला जाईल. नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपद कायम ठेवत 'जेडीयू'ला फक्त एक जागा सोडून अन्य जागांवर भाजप मोठा भाऊ म्हणून दावा करेल काय? अशी भीतीही व्यक्त होत आहे. लोकजनतशक्ती पक्षाचे चिराग पासवान आणि 'जेडीयू'चा एक असे मित्रपक्षाचे दोनच खासदार लोकसभेला जातील, अस वर्तवण्यात येत आहे.

2014 मध्ये भाजपनं 282 जागांवर विजय स्थापन केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 21 जागा वाढत 303 जागांवर भाजपनं विजय मिळवला होता. तर, 'एनडीए'तील मित्रपक्ष 50 जागांवर विजयी झाले होते. आता मित्रपक्षांनी विजयी झालेल्या 50 जागा 30 होण्याचे संकेत पंतप्रधानांनी लोकसभेत दिले. यासह भाजपचे 303 सदस्य 370 होतील, असा दावा करत खासदारांची संख्या 67 या विक्रमी संख्येने वाढण्याचे संकेत दिले आहेत. हे संकेत देताना मित्र पक्षांच्या 20 आणि विरोधकांच्या 47 जागांवर भाजपनं दावा सुनिश्चित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT