Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यातील राजकीय वर्तुळातील घडामोडी अद्यापही सुरूच आहेत. निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले तर महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही बोलले जात आहे. अनेकदा त्यांची नाराजी उघडपणे समोरही आली. असे सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचे फोन दिल्लीतून टॅप केले जात असल्याची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीच हा खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर सत्ताधारी भाजप, शिंदे सेनेत याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या 'सामना'मधील रोखठोकमधून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्या मुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत. त्यामुळे शिंदे यांची पुरती कोंडी झाली असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. 'सामना'तून राऊत यांनी टीका करताच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
संजय राऊत यांनी बॉम्ब टाकताच भाजप (Bjp) व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सावध प्रतिक्रया आल्या आहेत. ठाकरे सेनेचे 20 आमदार कुठेही सोडून जाऊ नयेत म्हणून एकनाथ शिंदेंना टार्गेट केले जातेय, अशी टीका एकनाथ शिंदेंचे शिलेदार व माजी मंत्री रामदास कदम यांनी केली. राज्यातील कुठल्याच आमदारांचे फोन टॅप केले जात नाहीत.
सामनातून केवळ व्यक्तिगत आकसातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. राज्यातील महायुती सरकारचा कारभार सुरळीत सुरु असून त्याची कोणीही चिंता करण्याची गरज नसल्याचे कदम यांनी सांगत, राऊत यांनी केलेल्या दाव्यातील हवाच काढली.
दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी देखील राऊत यांनी केलेलया दाव्यावर टीका केली आहे. राऊत नेहमीच खोट्या बातम्या पेरत असतात. त्यामुळेत्यांनी केलेले आरोप मनावर घेण्याची गरज नाही. गेल्या अडीच वर्षाच्या काळातही राऊत यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात होते. मात्र, राज्यातील महायुतीचे सरकार मजबूत असल्याचे सांगत राऊतांच्या दाव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
राऊत यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर भाजप नेते नितेश राणेंनी चांगलेच फटकारले आहे. ‘शिंदे काय करताय? भाजपमध्ये काय चाललंय? पहिल्या दिवसापासून दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचे काम राऊत करत आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या घरात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते पहावं. स्वतःच्या पक्षात स्वतः स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षात अजून किती काळ राहणार याबद्दल संजय राऊत यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने मातोश्रीवर काळी जादू केली जातेय, असे म्हणत सामनातील रोखठोकवरून नितेश राणे यांनी राऊतांना हा टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांपासून टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत असल्याने राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. परंतु येत्या काळातही राज्यातील राजकारण वेगळ्याच दिशेने जाण्याचे संकेत मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे राज्याला एक स्थिर सरकार मिळेल, अशी आशा होती.
गेल्या सरकारच्या काळात असलेली राजकीय अस्थिरता संपेल, असे वाटत होते. मात्र, नवे सरकार आल्यापासून सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर केले जात असलेले आरोप-प्रत्यारोप पाहता येत्या काळात ही असे प्रकार सुरूच राहणार हे स्पष्टपणे दिसत असल्याने यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.