Mahesh Shinde, Shashikant Shinde, Shivendraraje Bhosale sarkarnama
विश्लेषण

Satara Political News : शिंदेसाहेब, कोरेगाव की जावळी हे एकदा ठरवाच..!

Umesh Bambare-Patil

Shashikant Shinde News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या गटाची जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी कंबर कसली आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते इच्छुक असले, तरी सातारा-जावळी मतदारसंघ त्यांच्या मनात घर करून आहे. सध्याच्या राजकीय स्थित्यंतराने त्यांना जावळीतून लढण्याची संधी आहे. त्यासाठी खुद्द जावळीकरांतूनच मागणी होऊ लागली आहे. कोरेगाव की जावळी या द्विधावस्थेत ते असल्याने शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. त्यांची ही द्विधावस्था वेळेत दूर झाली नाही, तर ‘तेलही गेलं तूपही गेलं...’ अशी अवस्था होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीला NCP जबाबदार असलेल्या भाजपला हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादीचा शरद पवार Sharad Pawar गट आता सक्रिय झाला आहे. जिल्ह्याची धुरा माजी मंत्री शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्यावर खांद्यावर आहे. त्यांनी स्वाभिमान सभेच्या माध्यमातून सातारा-जावळी मतदारसंघात काल केलेले शक्तिप्रदर्शन अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.

तब्बल १४ वर्षांनंतर आमदार शिंदेंचे पहिल्यांदा जावळी तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत झाले. त्यामागे जावळीकरांशी असलेले त्यांचे भावनिक नाते व जावळीचा सुपुत्र म्हणून त्यांच्याप्रति प्रत्येकाच्या मनात असलेले प्रेम हे कारण आहे. या शक्तिप्रदर्शनातून बहुतांशी जावळीकरांनी त्यांना ‘साहेब पुन्हा जावळीतून निवडणूक लढा’ अशी आर्त हाक दिली आहे.

२००९ मध्ये खासदार शरद पवारांच्या सांगण्यावरून आमदार शशिकांत शिंदेंनी कोरेगावातून शालिनीताई पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभूत केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीतही ते दुसऱ्यांदा कोरेगाव मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा नवख्या महेश शिंदे यांनी ६२३२ मतांनी पराभव केला.

या पराभवासाठी राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्याविरोधात सक्रिय होता. यानंतर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही पुरेशी मते असूनही केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. यातूनच ते कधी कधी स्वगृही येऊन जावळीतून लढण्याचे सूतोवाच करत आहेत.

शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीत असताना आमदार शिंदेंनी कधी जावळीतून निवडणूक लढण्याची भाषा केली नव्हती; पण शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्यानंतर शिंदेंपुढे कोरेगावसोबतच सातारा - जावळीचा पर्याय उपलब्ध झाला. राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर साताऱ्यातील राष्ट्रवादीही दुभंगली.

शरद पवार गटाची सर्व जबाबदारी आमदार शशिकांत शिंदेंवर आली. शरद पवार गटाची जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी आमदार शिंदेंनी कंबर कसली आहे. जरी ते कोरेगावातून इच्छुक असले तरी सातारा - जावळीही त्यांच्या मनात घर करून आहे. आताच्या राजकीय स्थित्यंतराने तर त्यांना सातारा-जावळीतून लढण्याची आयती संधी आली आहे.

त्यासाठी खुद्द जावळीकरांतूनच अशी मागणी होत असल्याने आमदार शिंदेंना केवळ खासदार शरद पवारांच्या आदेशाची औपचारिकता आहे; पण यासाठी स्वत: शिंदेंना विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सध्याची राजकीय गणिते प्रत्यक्ष निवडणूक लागण्याच्या वेळी बदललेली असणार आहेत. त्यामुळे आतातरी कोरेगाव की सातारा- जावळी? याबाबत आमदार शशिकांत शिंदेंच्या मनात द्विधावस्था आहे.

त्यामुळेच ते ठामपणे भूमिका घेत नाहीत. जिल्ह्यात आजही त्यांच्याच पक्षातील आणि विरोधी पक्षातील विरोधक त्यांना अडविण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण शरद पवार गटात एकमेव आमदार शशिकांत शिंदे हेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीची ताकद वाढवू शकतात, हे सत्ताधारी व विरोधकांनाही माहिती आहे. त्यामुळे शिंदेंना संभ्रमात ठेवून त्यांना अडविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा अजित पवार गट व भाजप, शिंदे गट शिवसेनेकडून होत राहणार आहे.

यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढविताना शशिकांत शिंदेंनी स्वत:साठी कोरेगाव की सातारा-जावळी सुरक्षित आहे, हे ठरवावे लागेल. त्यांना कोरेगावातून येणारी निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. कारण, आमदार महेश शिंदेंच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते अपात्र ठरले तर आमदार शशिकांत शिंदेंना मैदान मोकळे राहणार आहे.

पण, ते अपात्र ठरले नाहीत तर मात्र, कोरेगावात दोन शिंदेंची जबरदस्त लढत पाहायला मिळेल. सातारा-जावळीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी चांगलेच बस्तान बसविले आहे. दोन साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपलेसे केले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाची साथही त्यांना मिळणार आहे.

त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे विरोधात लढताना आमदार शिंदेंना जावळीसोबतच सातारा तालुक्यात बांधणी करावी लागेल. ही बांधणी एकट्याने होणार नाही. त्यांना खासदार उदयनराजेंची सोबत घ्यावी लागेल. त्यामुळे हेही तितके सोपे असणार नाही. विधानसभेसाठी लढताना त्यांना विधान परिषदेचा राजीनामा द्यावा लागेल.

त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना कोरेगाव किंवा सातारा-जावळी येथून निवडूनच यावे लागेल. अन्यथा तेल ही गेलं आणि....अशी अवस्था होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल.प रिणामी, आमदार शिंदेंना कोरेगाव की सातारा- जावळी? या संभ्रमातून बाहेर पडावे लागेल.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT